अष्टकवर्ग - पुनर्तपासणीसाठी एक वरदान.

 


अष्टकवर्ग - पुनर्तपासणीसाठी एक वरदान.

💢 फलादेशासाठी  ज्योतिषशास्त्र हा मूळ पाया असून, त्याची मूळ रचना आपल्या ऋषिमुनींनी, त्यांचे अनुभव, चिंतन, साधनेच्या आधारावर केली आहे. बदलत्या काळाच्या ओघात, अनेक विद्वानांनी, त्यात, संशोधनाद्वारे मोलाची भर घातली आहे.

  💢   प्रारंभी, मूळ समजले जाणारे, रवि चंद्रादि सात ग्रह असले तरी, त्यात  कालांतराने, राहू-केतू या पातबिंदूंची,  भर पडली आहे. सोयीचे व्हावे म्हणून, आपण त्यांचा, सातत्याने " ग्रह " म्हणून उल्लेख  करतो. राहू केतू मुळे, इतर ग्रह निश्चितच प्रभावित होऊन, त्यांच्या फळाची दिशा बदलते, हे सिद्ध झाल्यानंतर,  फलज्योतिषात नवग्रहांचा, विचार व्हायला लागला.

💢 कालांतराने प्रजापती, नेपच्यून, प्लुटो  या ग्रहांचा शोध लागल्याने, व अनेक विद्वान ज्योतिषांनी, त्यांचा अभ्यास करून, त्यांची फलिते निश्चित केल्याने, आज मितीस फलकथनासाठी, त्यांचाहि समावेश केला गेला आहे.

💢 काळानुसार संकल्पना बदलतात. फलिताच्या दृष्टीने, ज्योतिष विद्वानांनी त्याचा पण विचार केला आहे. असे हे शास्त्र,  दिवसेंदिवस, वृद्धिंगत होत आहे. ही समाधानाची बाब आहे.

💢 आज कृष्णमूर्ती पद्धती, लाल 'किताब, हस्तरेषा असा ज्योतिष शास्त्राचा, बहुविध शाखांनी विस्तार झालेला असला तरी, ग्रहांचा स्वभाव, कारकत्व याबाबत, जे मूळ सिद्धांत आहेत, ते कधीहि बदललेले नाहीत व बदलणारहि नाहीत.

💢 याच मूळ तत्वांचा आधार घेऊन, अंकावर आधारित असलेल्या, "अष्टकवर्ग " पद्धतीवर आज बोलणार आहोत.

💢 नावाप्रमाणेच " अष्टकवर्ग " पद्धती लग्न, रवि, चंद्र, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनी असे 7 ग्रह व 1 लग्न, कुंडलीच्या माध्यमातून,  काय फळे देतील ? हे अंकांच्या भाषेत, अष्टक वर्ग पद्धतीत सांगितले जाते.

एखाद्या भावाचे गुण , व त्या भावात असलेल्या ग्रहाचा, त्या भावाच्या फलात, कितपत सहभाग आहे ? हे त्याने दिलेल्या गुणांच्या, गणिती भाषेत सांगितल्यामुळे, या पद्धतीत अधिक सुबोधता आली आहे.

💢 यामुळे फळाचे आकलन, उत्तम रित्या व स्पष्टपणे होते.

💢 गणितीय भाषा असल्याने, यात, पण, परंतु अशा शंकाचे प्रमाण, अत्यल्प असते.

💢 अर्थातच फळाचे आकलन, चटकन होत असले तरी, आपणास, या पद्धतीचा कितपत सराव आहे ?, यावरहि आकलनाचा वेग, अवलंबून आहे

💢 अष्टकवर्ग ही स्वतंत्र, स्वयंभू अशी पद्धत नसून, मूळ ज्योतिष्य शास्त्राचे ते एक अंग आहे, असे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल.

💢 कारण ग्रहाचे स्वभाव, मूळ कारकत्व, भावेशत्व हे जे मूळ शास्त्रात सांगितलेले आहेत. त्याच अनुरोधाने अष्टक वर्गात, विचार करावयाचा असल्याने, मूळ पाया म्हणून वैदिक ज्योतिष शास्त्रातील मूळ तत्वांचे सखोल अध्ययन हवे. तरच अष्टक वर्गातून पडताळा, घेताना कुठलीहि संदीग्द्धता राहणार नाही.

💢 प्रथम वैदिक पद्धतीने, प्रचलित नियमानुसार, एखाद्या भावाचे चिंतन केले असता, त्यांच्या फळाची सकारात्मक /नकारात्मक अथवा सामान्य, अशी दिशा लक्षात येते,
व त्या भावाच्या फळाची, संकल्पना मनात स्थिर होते.

💢आपण अनुमानित केलेल्या फळाचा, अंदाज जर बरोबर असेल, तर अष्टक वर्गातील, त्या भावाच्या गुणांवरून,  त्यास दुजोरा मिळावयास हवा. तो जर मिळत नसेल, तर त्या भावाचे वाचन करताना, आपल्या नजरेतून, काही बाबी सुटल्या आहेत, असे म्हणावे लागेल व पुनरावलोकन करावे लागेल. असे केल्यास, आपले कुठे दुर्लक्ष झाले?, हे आपल्या ध्यानी येईल.

💢 जोपर्यंत आपल्याला, आपण चुकलो असे कोणी सांगत नाहीत , तो पर्यंत आपण योग्यच करतो आहोत, अशी आपली धारणा असते.
       आपली चूक होऊ नये, असे प्रत्येकास वाटतं असते. त्यातून फलादेश, तर अत्यंत संवेदनशील विषय आहे. जातकाच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची डोळ्यात तेल घालून, दक्षता घ्यावी लागते.
       ज्योतिष्य हा व्यवसाय, पूर्णतया जनविश्वासावर आधारित आहे. ती विश्वासार्हता  कायम रहावी, यासाठी पुनरनिरीक्षण  करणारी, व ज्योतिष्याचा खरा साथीदार असणारी, अष्टकवर्ग, ही एकमेव व्यवस्था आहे, असे म्हणावे लागेल

💢 इथे प्रश्न उपस्थित होतो की, अष्टकवर्ग ही पद्धती, एवढी उपयुक्त असल्यावर, तिचा सर्रासपणे वापर होताना, कां दिसत नाही ?
याला कारणहि तसेच आहे.
ही पद्धती गणितावर आधारित असल्या ने, प्रत्येक भिन्नाष्टकाचे तक्ते बनविणे, सर्वाष्टक तक्ता बनविणे, हे थोडे किचकट व वेळखाऊ काम असते. व जे कठीण असेल ते टाळणे., सोप्यात सोप्या पद्धती निवडणे, हा मनुष्य स्वभाव आहे.

      त्यामुळे, या पद्धतीचा वापर कमी झाला.बऱ्याच ज्योतिष्य प्रेमींना,  अष्टकवर्ग ही एक उपयोगी पद्धती आहे, हे माहीतहि नाही -नव्हते.

💢 परंतु आता संगणक युगात सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, हवे ते तक्ते चटकन व आयते मिळतात. कुठलीहि आकडेमोड करावी लागत नाही. हा नवीन तंत्रज्ञानाचा, या पिढीस मिळालेला शुभाशीर्वादच आहे, असे म्हणावे लागेल.

💢 ऑन लाईन मोफत कोर्स द्वारा, श्री. ज्योतिष्य सायंटिफिक संशोधन केंद्र, जळगावच्या माध्यमातून, संचालिका ज्योतिष्याचार्या आ. डॉ.ज्योतीताई जोशी, अष्टकवर्ग पद्धतीच्या प्रचारासाठी, अथक प्रयत्न करत आहेत , हे इथे गौरवाने नमूद करावेसे वाटते.

💢 वैदिक ज्योतिष शास्त्राचा, पक्का अभ्यास न करता, केवळ अष्टक वर्गाद्वारे निर्णय घेणे, केव्हाहि धोक्याचे आहे. झटपट निर्णय घेण्यासाठी, संबंधित मूळ भावाच्या ग्रहस्थितीचा पूर्ण विचार न करता, केवळ अष्टक वर्गाच्या आधाराने फलित सांगणे, निश्चितच धोक्याचे आहे. अशा निर्णयामुळे, एखादे वेळी निर्णय चुकून,ज्योतिषी तोंडघशी पडण्याची शक्यता असते. कारण, कुंडलीत बरेचदा केवळ एका ग्रहस्थितीवरून वा भावावरून, कधीहि योग्य फलकथन करता येत नाही.

        प्रत्येक बाबतीत निर्णय घेताना, कुंडलीचा, सर्वांगीण विचार करावाच लागतो.

💢 वैदिक ज्योतिष्य पद्धतीत, प्रत्येक ग्रहास एकपाद, द्विपाद, त्रिपाद अशा विविध दृष्टी असल्या तरी, फलादेश करताना शनी, मंगल, गुरु वगळता,  इतर ग्रहांच्या, फक्त 7 व्याच दृष्टीचा विचार करावा, असा दंडक घालून दिलेला आहे.

💢 अशी मर्यादा, अष्टक वर्गात आढळून येत नाही.

💢 प्रत्येक ग्रहास, प्रत्येक भावाच्या फळाबाबत, आपला कमी -जास्त असलेला सहभाग, नोंदवण्याची मुभा प्राप्त झाली आहे.

💢 कोणताहि ग्रह,एखाद्या भावास, शून्य गुण देऊन,आपली नाराजी प्रगट करु शकतो तसेच, कमाल 8 पैकी 8 गुण देऊन, आपले भरघोस सक्रिय सहकार्यहि,  व्यक्त करु शकतो.

💢 हे अष्टक वर्गाचे एक, आगळे -वेगळे वैशिष्ट्य आहे.

💢 अष्टक वर्गात राहू केतू या महत्वपूर्ण ग्रहांचा प्रत्यक्ष समावेश नाही. परंतु महादशा -अंतर्दशा यांचा विचार करता, विशोतरी महादशेनुसार, आयुष्यातील  18 वर्षाचा काळ राहूचे अधिपत्यात असून, 7 वर्षाचा कालावधी, केतूच्या अखत्यारीत आलेला आहे.

💢 या ग्रहांच्या महादशा, अंतर्दशा कशा जातील ? हे अष्टकवर्ग पद्धतीत, आपण
राहू केतूचा, या अष्टक वर्गात समावेश नसल्याने, प्रत्यक्ष रित्या पाहू शकत नाही.

💢 तरी पण, अष्टक वर्गात, राहू हा शनिसम व केतू हा मंगळसम मानून, राहूचे फल पाहताना, संबंधित भावास, शनीने जे गुण दिले असतील, ते राहूचे मानावे व मंगळाने जे गुण दिले असतील, ते केतुचे मानावे, असा दंडक घालून या समस्येचे निराकरण केले आहे.

💢 या संकेतनुसार  शनी व राहू, मंगल व केतू, यांच्या गुणधर्मात, किती साम्यता
आहे, हेहि अधोरेखित होते.

💢 बरेचसे जातक, असे असतात की, त्यांना फक्त त्यांच्या समस्येचे  उत्तर हवे असते. कुठल्याहि ज्योतिषीय परिभाषेत, त्यांना रस नसतो.

💢 तर काही बहुश्रुत व चौकस जातक असे असतात की, ज्योतिष्याचा शब्द अन शब्द, ते व्यवस्थित समजून घेतात. त्यांना त्या विषयात रूची निर्माण झालेली असते. अशा जातकांना अष्टक वर्गाद्वारे केलेला, फलिताचा पडताळा फारच मानवतो. ज्योतिषी,जिज्ञासू जातकाचे,अष्टक वर्गाच्या माध्यमातून, फलिताचे आकलन, चांगल्या प्रकारे करु शकतो.

💢  ज्योतिष्यास, त्याने केलेले, फलकथन बरोबर आहे की नाही ? याचा पडताळा, घेण्यासाठी, मदतीला धावून येणारी " अष्टक वर्ग " ही एकमेव बहुआयामी, मौलिक पद्धती आहे.

= पुंडलिक दाते, अकोला

⚛️ वरील लेख " भविष्य दर्पण " या ज्योतिष्य विषयक मासिकातून एप्रिल 21 च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.



Comments

  1. नाइस तो रीड thank u for such a valuable information

    ReplyDelete
  2. खूप छान शब्दरचना आणी माहीती, विनयशीलता खूप भावली

    ReplyDelete
  3. पण अष्टक वर्ग गुण आणी त्यावरून भविष्य कसे वर्तवायचे याचेही विवेचन करावे

    ReplyDelete
  4. खुप आवश्यक माहिती दिली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली