मेरी आवाज ssssही पहचान है
" मेरी आवाज sss हि पहचान है... "
भारताच्या मानबिंदू , आवाजाची दैवी देणगी प्राप्त असलेल्या, गानसम्राज्ञी, लता मंगेशकर, दि.6 फेब्रुवारी 2022 रोजी, आपल्याला सोडून गेल्या. ही आपल्या देशाची अपरिमित हानी आहे. जागतिक कीर्ती प्राप्त केलेल्या, गानकोकिळा, लता दीदी यांच्या निधनामुळे, भारतीय सिनेसृष्टी, संगीतजगत पोरके झाले आहे. लतादीदी मूर्तिमंत सरस्वतीच होत्या. लतादीदींचे गाणे ऐकले नाही, असा भारतीय शोधुन सुद्धा, सापडणार नाही. राष्ट्रीय स्तरावर, वेगवेगळ्या माध्यमातून, अनेक बहुमान मिळवणाऱ्या, त्या एकमेव महिला होत्या, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या कार्याचा गुणगौरव करताना, शब्द थिटे पडतात. अशा या महान व्यक्तित्वास मानाचा मुजरा.
दि.06 फेब्रुवारी 2022 रोजी, सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी, मुंबई येथील इस्पितळात, त्यांची प्राण ज्योत मालवली. मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. मनुष्याचा जन्म झाल्यावरोबरच काळाचे घडयाळ सुरु झालेले असते. ही नियती आहे
💢 कोटचक्र 💢
⚛️ कोटचक्राची उपयुक्तता ⚛️
जर एखादी व्यक्ती मरणाच्या उंबरठ्यावर असेल किंवा अत्यंत भयानक अपघात झाला असेल, तर ती व्यक्ती कितपत सुरक्षित आहे की, तिच्या जीवनास धोका आहे? हे पाहण्यासाठी, अगदी निर्वाणीच्या काळात, अत्यंत संवेदनशील स्थितीत, या कोटचक्राचा उपयोग करतात. लतादीदींच्या बाबतीत कोटचक्र काय अंदाज दाखविते, ते आपण पाहू.
◾️ ज्या व्यक्तीसाठी कोटचक्र पहावयाचे आहे, तिच्या चंद्राचा राशींस्वामी हा कोटस्वामी असतो. लतादीदींचा चंद्र कर्केत असल्याने, कोटस्वामी चंद्र ठरतो. कोटस्वामी प्रत्यक्ष जीव मानला जातो.
◾️ चंद्र ज्या नक्षत्रचरणात असतो, असतो तो नक्षत्रचरणस्वामी, जातकासाठी कोटपाल असतो. दीदींचा चंद्र 16 अंश 24 कला असल्याने, तो मंगळाच्या नवांशात असल्याने, मंगळ कोटपाल झाला. कोटपाल जीवाचा रक्षणकर्ता असतो.
◾️ खालील आकृतीत दाखविल्यानुसार, एकात एक अशा 3 चौकोनातून, कोटचक्र तयार होते. यातील बाहेरचा चौकोन “प्राकार” म्हटल्या जातो. मधला चौकोन “मध्य” संबोधला जातो. तर सर्वात आतील चौकोन “स्तंभ” म्हटला जातो. चौकोनाच्या बाहेरील भाग, “बाह्य” म्हटल्या जातो. तो अत्यंत असुरक्षित समजला जातो. कोटस्वामीने स्तंभात राहणे व त्याचवेळी कोटपालाने बाह्य राहणे हें सर्वात सुरक्षित समजले जाते. याउलट कोटस्वामी बाहेर व कोटपाल स्तंभाजवळ ही अत्यंत असुरक्षित स्थिती होय. कोटपाल बाह्य भाग सोडून, जेवढा स्तंभाच्या अधिक जवळ असेल तेवढी, त्याची कर्तव्यपरायणता कमी होईल. तसेच कोटस्वामी जेवढा स्तंभापासून दूर जाईल, तेवढा तो असुरक्षित असेल. कोटपालाने बाह्य भागात असावे.. गौणत्वाने प्राकारात असला तरी ठीक. पण तो मध्यात वा स्तंभजवळ असणे चिंतायुक्त असते. कोटस्वामी स्तंभाजवळ असल्यास सुरक्षित असतो.. तो मध्य भागात असता सुरक्षिततेचे प्रमाण कमी होते. प्राकारात असता ती अधिक कमी होते व बाह्य भागात कोटस्वामी असल्यास, तो पूर्णपणे असुरक्षित असतो.
▪️ कोटचक्राचा प्रवेश ईशान्येकडून होत असून, प्रथमतः जातकाचे जन्म नक्षत्र लिहिले जाते. नंतर, दाखविलेल्या मार्गानुसार ( अभिजित धरून ) सर्व नक्षत्रे क्रमवार, कोटचक्राच्या मार्गानुसार लिहिली जातात.
◾️ ज्या दिवशीची, वेळेची स्थिती पहावयाची असेल, त्या दिवशीचे गोचर ग्रह, ज्या नक्षत्रात आहेत, त्या नक्षत्राजवळ, कोटचक्रात लिहिण्यात येतात. त्यावरून कोटस्वामी कुठे आहे व कोटपाल कुठे आहे ते पाहिले जाते. व त्यांच्या स्थितीवरून, व्यक्ती सुरक्षित की असुरक्षित यांचा अंदाज घेतला जातो.
◾️ लतादीदींच्या बाबतीत, मृत्यूसमयी, कोटपाल मंगळ, पूर्वाषाढा नक्षत्रात, म्हणजे प्राकारात होता व कोटस्वामी चंद्र रेवती नक्षत्री, पूर्णपणे कोटचक्राच्या बाहेर, कोटचक्राच्या पश्चिम द्वारावर असुरक्षित स्थितीत होता. हे कोटचक्राच्या माध्यमातून, स्पष्टपणे लक्षात येते.
असे हे अनमोल रत्न काळाने आमच्या पासून हिरावून घेतले. वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून, त्यांचा आवाज पिढ्यान पिढ्या, त्यांचा स्मृती सुगंध दरवळत ठेवणार. आज जरी त्या , काळाच्या पडद्याआड गेल्या तरी, प्रत्येकाच्या मनात, त्या स्मृतिरूपाने आहेत. अशा थोर देवीस विनम्र अभिवादन
हा लेख "भविष्य दर्पण", मार्च 2022 या ई- मासिकात प्रसिद्ध झाला आहे.
Comments
Post a Comment