असावे घरटे आपुले छान
💢 असावे घरटे आपले छान 💢
ही ओळ केवळ एक कवि कल्पना नसून, प्रत्येकाच्या मनातील भावना आहे. आपल्या स्वतंत्र मालकीचे, सर्व सुख सुविधांनी पूर्ण, शहरातल्या नावाजलेल्या भागात, रेल्वेस्टेशन, बस स्टॅन्ड, शाळा, भाजीबाजार, ऑफिस अशा सर्व सोयी, एका हाकेच्या अंतरावर, किंवा एका फरलांगावर असणारे, मनमिळावू शेजार असणारे, तळमजल्यावर, आपले पक्के घर असावे, असे मनोमन प्रत्येकाला वाटत असते.
अर्थात, आपल्या मनातील भावनेला मूर्त स्वरूप देण्याचे काम, आपले नशीब व आपले प्रयत्न यावर अवलंबून असते. यात नशिबाचा, पूर्वसंचिताचा, ज्योतिष शास्त्रीय भाषेत, जन्मकुंडलीतील चतुर्थ भावाच्या फलाचा, सहभाग अधिक असतो.
गृहसौख्य हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे, कुंडलितील चतुर्थ स्थान त्यास बहाल झाले आहे. मानसिक समाधानाचा कारक चंद्र, व ऐहिक सुखाचा कारक रजोगुणी, विलासी , शुक्र ग्रह गृहसौख्याचे कारक ग्रह आहेत. ज्यांचे कुंडलीत हे दोन्ही ग्रह, राशीनुसार बलवान असून, कोणत्याहि पाप ग्रहाने विद्ध नसतील, व त्यांचा चतुर्थस्थानाशी शुभ संबंध असेल तर, अशा जातकांना उत्तम प्रकारचे गृहसौख्य मिळते.
◾️ काही लोकांना वडिलोपार्जित घरे असतात, गावातच वा शहरातच नोकरी उद्योग असतो. वडिलोपार्जित घरातच त्यांचे जीवन व्यतीत होते. त्यामुळे घर, किंवा घराची चिंता काय असते ? हे त्यांना माहिती नसते.
◾️ काही लोक अत्यंत परिश्रमाने तारुण्यात पै पै गोळा करून, स्वखर्चाने, जसे जमेल तसे, घर बांधतात. त्यात स्वपराक्रमाचा गोडवा असल्याने, त्यांना आपले घर, स्वर्गासमान भासते.
◾️ काही लोकांचे योग असे असतात की, त्यांचा उमेदीचा सर्वकाळ, भाड्याच्या घरात जातो. उतारवयात त्यांचे घर होते. त्यांना टक्कल पडल्यावर कंगवा मिळावा, असा थोडाफार अनुभव येतो.
◾️ काही लोकांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याच एवढ्या असतात, की सेवानिवृत्तीनंतरहि त्यांचे घर होत नाही.
◾️ काही व्यावसायिक वृत्तीचे असेहि लोक पाहिले आहेत, की जे सुरुवातीस घर बांधतात, नंतर पैसे कमवण्याच्या दृष्टीने, ते विकतात. पुन्हा प्लॉट घेतात, पुन्हा बांधतात. " हम पंछी डाल डाल के " अशी त्यांची वृत्ती असल्याने, ते लवकर एका घरात स्थिर होत नाहीत.
◾️ काही लोकांना, शेजारपीडा असते. संपूर्ण प्रदेशात त्यांनी कुठेहि घर घेतले, तरी त्यांना शेजार मनासारखा मिळत नाही. " शेजाऱ धर्म " एक तर यांना पाळता येत नाही. किंवा शेजारी पाळत नाहीत. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, खरा शेजार असतो." शेजार हा अर्धा नातेवाईक असतो " ही भावना, काही काही लोकांच्या, केवळ कल्पनेतच राहते. कधी कधी तर, शेजारी शत्रुवत वागतात. त्यामुळे घर उत्तम असले तरी, जोड्यातील खडा, जसा दर पावला गणिक चावतो, तसे त्यांच्या गृहसौख्यावर विरजण पडते . शेजाऱ्याशी पटत नाही म्हणून, घर बदलणारे, वा शेजाऱ्याशी कोर्ट कचेरी करणारे, असे अनेक लोक पाहण्यात येतात.
◾️ शेजार हा आपण तृतीय स्थानावरून पाहतो. जे चतुर्थाचे व्ययस्थान आहे. त्यामुळे तृतीयस्थानास हि अत्यंत महत्त्व आहे.
वृश्चिक लग्न वर्गोत्तम असून, नवमांशात शनि स्वराशीचा चतुर्थात, व भाग्यात कर्केचा चंद्र असल्याने, फलात थोडी सुधारणा होऊन, घर बांधले गेले. परंतु अपेक्षा कृत, त्याचा आकार लहान असल्याने, वाढत्या व्यापामुळे, ते आता कमी पडत आहे. दुसरी घरे विकत घेण्यासाठी बरेच वर्षे, बरेचसे प्रयत्न केलेत. परंतु त्यात यश आलेले नाही. वरील ग्रहस्थितीमुळे, शेजारसुख मिळत नाही. त्यामुळे वास्तुसुख हरवले आहे. ◾️ देशक्राण कुंडलीतही लग्नेश व तृतीयेत अष्टमात असून, राहू -नेपच्यूनयुक्त मंगळाच्या दृष्टीत आहे. D-3 कुंडलीतहि, चंद्र वृश्चिक राशीचाच असून त्यासोबत हर्षल हा विक्षिप्त व सनकी ग्रह तृतीयस्थानास, प्रतिसाद देणाऱ्या भाग्यस्थानात आहे.
◾️ काही लोकांना स्वतःचे घर असते, पण, जीवनाचीच घडी कशी असते की, त्यांना उदरनिर्वाहासाठी जीवनभर इतरत्र वा परदेशी फिरावे लागते. स्वतःच्या वास्तूचा ते उपभोग घेऊ शकत नाहीत. " अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा " या वर्गवारीत, हे लोक मोडतात.
ही एक परदेशगमनाची कुंडली ( कुंडली क्र 2) आहे.
◾️ याबाबत अजून एक अनुभव सांगतो. एक जातक अधिकारी हुद्यावर होते. त्यांनी घर बांधताना खूप पैसा खर्च केला व दुमजली घर अशा प्रकारे बांधले की, त्यांच्या बंगल्यात सिनेमाचे शूटिंग व्हावे.
त्यांचा एकुलता एक मुलगा मुंबई सोडावयास तयार नाही. दोन मुली आहेत, त्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या आहेत. आता एवढ्या मोठ्या अवाढव्य बंगल्यात, पती-पत्नी दोघेच राहतात. सेल्फ कन्टेन्ट रचना असल्यामुळे, घराचा उर्वरित भाग,भाड्यानेहि देता येत नाही. " उगाच मूर्खासारखा घर बांधत बसलो " असे एक वेळ, त्यांनी बोलून दाखविले.
◾️ त्यांच्या लग्नी कर्के चा हर्षल असल्यामुळे , काहीतरी, इतरांपेक्षा, विशेष आगळे-वेगळे असावे, ही भावना, व त्यातून घराची निर्मिती. चतुर्थात तुळेचा शनी असल्याने, उतारवयात, अवाढव्य घर पण, एकलकोंडेपण व औदासिन्याची छाया मात्र कायम राहिली.
⚛️ वर वर्णन केलेले, हे गृहसौख्याचे बाह्यरूप झाले. गृहसौख्याचा अंतररूपाचा विचार, आपण कुटुंबातील सदस्यांच्या स्वभावावरून वरून करू शकतो.
पती-पत्नीचे पटत नसेल, वडील-मुलगा यांच्यात मतभेद असतील, भावा भावांचे विचार वेगळे असतील, कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे नसेल, ज्येष्ठांचा जर यथोचित आदर होत नसेल तर, अंतर्गत गृहसौख्याचा अभाव आहे, असे म्हणता येईल.
ठोकळ मानाने, बिछान्यावर पडल्या पडल्या, जर सुखाने आपण गाढ झोपेत जात असाल तर, आपल्याला गृहसौख्य आहे, ही गृहसुखाची सर्वात सोपी व्याख्या आहे, असे म्हणता येईल.
हा लेख " भविष्य दर्पण " मासिक, फेब्रुवारी -2023 मध्ये प्रकाशित झाला आहे.
= पुंडलिक दाते, ज्यो.अलंकार -9421755299
Comments
Post a Comment