7️⃣1️⃣
💢 अंतरंग ग्रहयोगांचे 💢
💢 पुरातन काळात ज्योतिष शास्त्र ही विद्या, गुरुकुलात, आचार्यांच्या माध्यमातून ग्रहण केली जात होती. हे विद्यार्जनाचे आद्य रूप होय. आजच्या काळात, वेगवेगळ्या शिकवणी वर्गाच्या माध्यमा तून, ज्योतिष शास्त्राचा बरचसा प्रचार व प्रसार दिवसेंदिवस होत आहे,ही या शास्त्रासाठी, गौरवाची बाब आहे. हे गुरुप्राप्तीचे आधुनिक रूप होय.
💢 ज्योतिष शास्त्र विषयक सर्व ग्रंथसंपदा हेहि , गुरुचे प्रतिरूपच आहे . ज्ञानार्जनासाठी आपण पुस्तकांचा पुरेपूर वापर करतो. एखादी बाब, आपल्याला नीट कळली नसल्यास, आपण ती वारंवार वाचतो. त्यावर मनन करतो. त्यामुळे जे ज्योतिष अभ्यासक आहेत, त्यांचे कडे ग्रंथसंपदा भरपूर असते.
पण सर्व बाबी, केवळ वाचनावरून समजत नाहीत, ही या पद्धतीतील , एक मोठी त्रुटी आहे. आपल्याला काही शंका असल्यास, आपण ती पुस्तकांना विचारू शकत नाही. तसेच एखादा मुद्दा समजावून सांगताना, तो नीट आकलन व्हावा या हेतूने, बोलताना, शब्दावर जो दाब दिला जातो, तो छापील साहित्यात, आढळत नाही.
या शास्त्रात, प्रत्येक ओळ अन ओळ, ही महत्वाची असते.
काही ठराविक मुद्दे , ठळक अक्षरात छापले जातील. परंतु इतर विवरणहि तितकेच महत्वाचे असल्याने, काय व किती बाबी ठळक छापणार, यालाहि मर्यादा आहेतच.
अभ्यासू व मनन करणाऱ्या ज्योतिष प्रेमी अभ्यासकास, केव्हा ना केव्हा, काहीतरी शंका उत्पन्न होणारच. अशा वेळी प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज भासते व त्याकरता या क्षेत्रातील, अनुभवी गुरुजींकडे, याचना केली जाते.
या जाणिवेतूनच " गुरु बिना ज्ञान नही ! " ही म्हण प्रचलित झाली असावी. प्रत्यक्ष समोरासमोर बसून, विषयाशी तद्रूप होऊन, विस्तृत चर्चेतून, नि :शंक अध्ययन करण्याची मजा, काही औरच असते.
💢 आधुनिक काळानुसार, संगणकीय प्रणाली, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे जसे व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, ऑन लाईन क्लासेस तसेच, या क्षेत्रासाठी उपलब्ध असणारे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स, फार मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे, यांनाहि गुरुचे तिसरे पूरक प्रतिरूपच म्हटले पाहिजे.
💢 या सर्व अभ्यासास, जोड पाहिजे ती प्रदीर्घ अनुभवाची. कुठल्याहि क्षेत्रातील ज्ञान, ऐकून वाचून, मिळू शकते, पण त्याची प्रचिती व अनुभूती होण्यासाठी, अनुभवच आवश्यक असतो.वाचन श्रवणाद्वारेप्राप्त केलेले, ज्योतिष्यविषयक सिद्धान्ता चे ज्ञान, जोपावेतो कुंडलीतून, पडताळले जात नाही तोपर्यत, मनास चैन पडत नाही. व जेव्हा अनेक कुंडल्यातून, त्याचा पडताळा येतो. तेव्हा तो सिद्धांत, अधिक ठळकपणे, स्मृतीत घर करून बसतो. कुंडलीच्या पार्श्वभूमीत, तो अनायासे लक्षात राहतो. त्याकरिता वेगळे पाठांतर करण्याची, आवश्यकता राहत नाही. म्हणूनच, कुंडलीशास्त्राचा अभ्यास करताना, वाचन -मनन व त्यासोबतच, त्याचवेळी, कुंडलीचे आकलनासाठी, सतत प्रयत्नरत असणे, फार महत्वाचे आहे.
▪️हस्तरेखाशास्त्राचे मार्गदर्शकहि, अभ्यासा सोबतच, शेकडो हात पाहण्याचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा सूक्ष्म बारकावे लक्षात येतात, असे निक्षून सांगतात, ते एवढ्यासाठीच.
💢 जसजसा अभ्यास वाढत जातो व त्यासोबत, अनेक कुंडल्या पहाण्याचा सराव वाढत जातो, तसतसे, प्रत्येक योगाच्या फळाची, विविध अंगेहि पहावयास मिळतात. त्यासाठी फक्त उत्कंठा असणारी संशोधक दृष्टी, व चिकाटी हवी. वेग वेगळ्या कुंडल्यांचा लग्नवार संग्रह हवा. जातकाच्या जीवनात घडलेल्या घटनांचा, ग्रहांच्या माध्यमातून, संक्षिप्त कां होईना ? तपशील हवा. फावल्या वेळी, त्या संग्रहातील समान योगावर, सखोल चिंतन हवे. त्यामुळे योगाच्या, फल देण्याच्या, वेगवेगळ्या प्रवृत्ती लक्षात येतात. व आपली विवेचन शक्ती, अधिक सुदृढ होत जाते. फलादेशाचा अंदाज व्यक्त करताना, त्याला आत्मविश्वासाची जोड लाभते. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे, नव्हे मी स्वतः, याच मार्गाचा अवलंब केला आहे व अजूनहि, सातत्याने करतो आहे.
उदाहरणा दाखल, काहि योगांबाबत मला आढळ लेली फल विविधता, नमूद करीत आहे.
💢 संतानसुख नसणे.
(अर्थात विवाहितांसाठी )
1. पती पत्नीत, गर्भ धारणेत व्यत्यय आणणारी, ग्रहस्थिती असणे.
2. जन्मतः व्यंग असलेली संतती होणे व आपल्यालाच तहहयात, तिचे लालन- पालन करावे लागणे.
3. संतती व्यसनाधीन, छंदीफंदी होऊन, आपल्याला कोर्ट-कचेरी , पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागणे. ▪️पालकांच्या मर्जीविरुद्ध पळून जाऊन आंतरधर्मीय विवाह उरकणारी संततीहि याच गटात मोडते.
4. संततीचा असामयिक मृत्यू होणे.
5. तात्विक मतभेदापायी, तसूभरही न पटणे. ▪️लाखो रुपयाची मालमत्ता असूनहि, वृद्धाश्रमाच्या आधाराची गरज भासणे.
6. संतती जन्मापासूनच, आपल्यापासून दूर (बहुधा आजोळी ) असणे. परस्पर तिकडेच शिक्षण घेऊन परक्या स्थळी, वा परदेशात निघून जाणे.
▪️अशास्थितीत, ती आपल्याला पैसा भरपूर पाठवेल पण, ज्या वयात आधाराची खरी गरज असेल, त्या वयात, आपल्या अंतकाळी, संतती आपल्या जवळ असेलच, याची खात्री नसते.
💢 पंचमेश राहूने दूषित असता,
1. संततीत व्यंग असू शकते.वा
2. लवकर संतती होत नाही. ▪️ देवधर्म, नवस -सायास करावे लागतात.
3. वीर्यदानातून प्राप्त झालेली, सरोगसी द्वारा उत्पन्न झालेली, संततीहि याच सदरात गणली जाईल.
4. बरेचदा कन्याधिक्य असल्याने, पुत्र नसल्याची बोचणी राहू शकते. वा
5. आपत प्रसंगी, सख्या पुत्राऐवजी, मानसपुत्र कामाला येऊ शकतो .
अशी अनेकविध फले संतती सुख नाही, या सदरात मोडतात. )
💢 विरहयोग :
जोडीदाराची, काहि काळाकरिता कां होईना ? पण ताटातूट होणे, हे या योगाचे स्वरूप आहे. त्यामुळे दोघांचे पटणार नाही, असा सरळ -सरळ अर्थ घेतला जातो. बऱ्याच अंशी ते खरेहि होते.
▪️ पण, परिणाम जरी विरह असला तरी, दरवेळी हेच कारण असेल, असे समजू नये.
1.यावर्षी विवाह ठरणे व काहि कारणामुळे तो लांबणीवर पडून पुढच्या वर्षी होणे.
2. एकदा कुठल्या स्थळाशी, दोन्हीकडून पसंती होऊन विवाह जुळणे व नंतर काहि कारणाने, तो विघटित होणे. यात साखरपुडा झालेला असलाच पाहिजे, असे आवश्यक नाही.
▪️ केवळ संबंधित नातेवाईकांना, संबंध जुळल्याचे माहिती होणे व नंतर फिस्कटल्याचे माहिती होणे, एवढे मात्र अपेक्षित आहे.
3.एखाद्या वेळी, मुलगा व मुलगी यांनी, एकमेकांना, परस्पर, मनोमन पसंत केले आहे. पण ती इच्छा वास्तवात उतरु शकली नाही, तर तोहि विरह योगच म्हटला पाहिजे.
4. काहि वेळा, अशा स्थळी बदल्या होतात, की दोघांना एकत्र राहणे, शक्य नसते.
▪️ पती -पत्नी दोघेहि नोकरीं करीत असल्यास, असे बरेचदा दिसून येते. हाहि विरह योगच होय.
5. दोघांपैकी एकास, अस्थायी परदेश गमनाचा योग असणे, हेहि विरह योगास कारणीभूत ठरु शकते.
6. रविबल -गुरुबलाचा अभाव असून, शुक्र दूषित असता, विवाहपूर्व जर अवैध संबंध असले, तर विवाहानंतर, त्यास पायबंद बसतो. अशा घटना तुरळक प्रमाणात आढळतात वा उजेडात येतात . हाहि विरहयोग म्हणावा लागेल.
7. केवल पालकाच्या मर्जीस मान देऊन, स्वतः च्या प्रेमाचे बलिदान करणारे, जातक या सदरात मोडतात.,
▪️ एका अर्थी हा योग, तसा जातकाचे पथ्यावर पडणाराच म्हटला पाहिजे. कारण, अशा रीतीने जर हा विरहयोग फलित झाला, तर त्याच्या पुढील भावी जीवनात, वादळे येणार नाहीत, असे गृहीत धरता येते.
▪️ पण असे निदान करण्यापूर्वी, जातकाचे द्विस्वभाव लग्न आहे कां ? चंद्र वा सप्तमेश, द्विस्वभाव राशीत आहे कां ? हे पाहणे, व कुंडलीतील इतर ग्रहस्थितीचाहि आढावा घेणे, आवश्यक असते .
▪️ काहि जातकाचे ग्रहयोग, एवढे क्रूर असतात, की अशा घटना वारंवार घडतात. समाजात, 2/3 वेळा लग्न करावे लागले, असे जातकहि आढळ तात.
8. शेवटी दोघांचे पटले नाही, म्हणून विभक्त होणे. हा विरह योग आहेच.
9. वैधव्य / विधुरता, हेहि विरह योगाचे क्रूर रूप आहे.)
💢 कुलदीपक योग
▪️हा योग जर बालकाच्या पत्रिकेत असेल, तर तो बालक, कुळाचे नाव उज्ज्वल करणारा ठरतो. अशी सर्व साधारण धारणा असल्याने, पालक आनंदित होतात.
1. जातक एवढा कर्तृत्ववान निघतो, की खरोखर, त्यांची दिगंत कीर्ती होते. एखाद्या क्षेत्रात तो एवढी प्रगती करतो, की त्या क्षेत्रातील त्याचे प्रभुत्व जगन्मान्य होते.
2. त्याला अजून इतर भावंडे असली तरी, त्याचे कर्तृत्व, याचे मानाने, खूप खुजे भासते. याच्या तेजाने, त्यांचे कर्तृत्व झाकोळून जाते.
3. कधी -कधी, तो माता पित्यास, एकुलती एक संतती असल्याने, व इतर योगांची साथ नसल्याने, " कुळाचा दिवा ", केवळ वंश विस्तारक म्हणूनहि तो " कुलदीपक योग " होतो.
4. हा योग, साहस कारक, मंगळाच्या स्थितीवर आधारित असल्याने, इतर ग्रहस्थितीचाहि आढावा घेणे, फार आवश्यक असते. कारण, या साहसाला जर विधायक वळण असले, तर तो कुलदीपक योग सार्थकी लागतो.
▪️ याउलट, इतर ग्रहस्थिती विरोधी असता. या साहस- धैर्याचा, अनुचित उपयोग करून, या योगाचे विकृत स्वरूप नजरेस येते. अशा जातकास प्रारंभी खूप कीर्ती मिळते, पण जेव्हा, कीर्तीस मात देणाऱ्या, अशुभ ग्रहांच्या, गोचर -दशा विदशा येतात, त्यांच्या कुप्रभावाने, अधोगतीस प्रारंभ होतो.
अशा स्थितीमुळे जातक, यशाच्या अत्युच्च शिखरा वर पोहोचून, एकदम रसातळाला जातो . म्हणून प्रथम कुळाचे नाव उज्ज्वल केले, व नंतर कुलास काळिमा फासला,असे होऊ शकते. " कोण होतास तू ? काय झालास तू ? " या गाण्याच्या ओळी, अशा जातकास तंतोतंत लागू होतात.
चारित्र्य नेस्तनाबूत झाल्याने, मेल्याहून मेल्यासारखी, त्यांची स्थिती होते. समाजात त्यांची किमत, शून्य होते. त्यामुळे कुलदीपक योग पहाताना, त्यास विरोध करणारी ग्रहस्थिती आहे कां? हे पहाणेहि तेवढेच महत्वाचे आहे .
💢 अशी ग्रहयोगाची, बहुरंगी फले देण्याची पद्धती आहे. असे अजून, बरेच योग सांगता येतील. पण विस्तार भयामुळे, अधिक लिहिण्याचा, मोह आवरतो.
💢 तात्पर्य, ग्रहयोगांचे हे मर्म, केवळ पुस्तकी वाचन करून, लक्षात येत नाही. जेव्हा बऱ्याच कुंडल्यांचा अभ्यास केला जातो, जातकाच्या जीवनातील घटना व ग्रहयोग यांची सांगड घालताना, फलादेशाचे, असे दिशापरिवर्तन लक्षात येते.
त्यामुळेच अनुभवानेच ज्ञानाला समृद्धी प्राप्त होते, असे म्हणावे लागेल .
🔼 वरील लेखातील माझे विचार माझे वाचन, अनुभव व मनन शक्तीवर आधारित आहेत. ते आपणा सर्वाना अवगत व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच आहे.
🎯 लेख आवडल्यास तसे, " कॉमेंट्स बॉक्स " मध्ये कळवावे. म्हणजे मला अधिक लिहिण्यास उत्तेजन लाभेल. 🙏🌺🌺🌺
Comments
Post a Comment