कारावास योग भाग -1

 


" कारावास  योग " - पूर्वार्ध

💢  " योग " या शब्दाचा,  व कुंडलीचा अगदी जवळचा संबंध आहे. किंबहुना, आयुष्यातल्या कुठल्याही घटनेचेयोग, कसे आहेत ? हे पाहण्यासाठीच  कुंडलीचा वापर होतो.

▪️काही योगांची  गणना,  शुभयोगात, तर काही योगांची गणना, अशुभयोगात होते. त्यातून,  शुभयोगांची, कुंडलीच्या माध्यमातून चर्चा झाल्यास, जातकाचे  मन आनंदित होते  . तद्वतच, काही अशुभ  योग जर आढळून आले, तर मनात चिंतेचे सावट, व  चेहऱ्यावर विषाद  निर्माण होतो.   ही प्रतिक्रिया, मनुष्य स्वभावसुलभ आहे.

▪️पण मानवी जीवनाचे वस्त्र,  जसे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले  असते  तद्वतच,  कुंडलीत शुभ - अशुभ योगांची गुंफण झालेली असते,  हेहि  तेवढेच खरे आहे.

▪️ असे काही अशुभ योग, जेव्हा ज्योतिष्याच्या  नजरेस येतात तेव्हा, " खरे  लपवू नये व खोटे पण बोलू नये,"  या न्यायाने,  जातकास पचनी पडेल,  अशा स्वरूपात,  त्या योगांची कल्पना देणे,  यात त्याचे  खरे कसब असते.

▪️कुंडलीत राजयोग,महाभाग्ययोग,  पंचम महापुरुष योग अशा अनेक विध शुभयोगांचा अभ्यास केला जातो. त्याच बरोबर, अस्वास्थ्य योग, वैधव्य योग अल्पायु योग, असे अनेकविविध,  नकारार्थी योगहि  अभ्यासले जातात.

▪️ परंतु,  केवळ योगच  पाहून चालत नाही. त्या रोगाशी संबंधित असणारे ग्रह,  किती बलवान आहेत, त्यावरुन, त्यायोगाची फलधारणाशक्ती,  निश्चित करावी लागते.

▪️तसेच बरीच वर्षे, बऱ्याचशा  कुंडल्या  पाहण्याचा सराव केल्यानंतर,  अनुभवाने,  त्या योगाचे,  स्वरूप स्पष्ट होते.

▪️ हे विधान स्पष्ट करण्यासाठी,  अशुभ योगापैकी, " कारावास योग ",  याबद्दल, या योगात काय गुपित दडलेलं आहे  मी, माझ्या शब्दात,  व्यक्त करतो.

▪️कारावास योगाचा उल्लेख, काही लोक " बंधन योग " असाहि  करताना दिसतात. या योगाचे नामाभिधानानुसार,  जातकास तुरुंगवास होणे,  असा याचा,  सरळ-सरळ अर्थ निघतो.

▪️कुंडलीच्या स्थानविशेषाबाबत,  असे म्हणता येईल की,  कुंडलीचे व्ययस्थान  हे,  मोक्ष,  साधना,  परदेश गमन,  परोपकार केल्याने मिळणारी कीर्ती,  या  सकारात्मक बाबी सोडल्या,   तर सजा,  दंड, बदनामी, उशीर, खर्च, दुर्लौकिक ,  अशी अवांछनीय फले,  देणारेहि  स्थान आहे.

▪️स्थूलमानाने, व्ययभावाचा स्वामी,  ज्यास्थानी असतो,  वा ज्या भावेशाबरोबर युति - दृष्टीयोग करतो, त्या भावासंबंधी नुकसानकारक फले निर्माण होतात. तसेच,  ज्या भावाचे स्वामी,  व्ययभावात असतील त्या भावापासून सुद्धा,  नुकसान कारक  फल  मिळण्याची  संभावना असते. हे एक  व्ययस्थानाचे, आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.

▪️थोडक्यात, मनुष्य जीवनात आपली पत, प्रतिष्ठा, पैसा, कीर्ती, यासाठी अनिष्ट फले,  या बाराव्या स्थानापासून मिळतात. 

▪️कारावास वा बंधन योग, मुख्यत्वे,  व्ययेश वा व्ययस्थानापासून पहिला जातो.

▪️अनुभवाच्या आधारे. नाण्याला जशा  दोन बाजू असतात तद्वतच, याहि योगाच्या दोन बाजू आहेत, हे प्रकर्षाने लक्षात येते .

▪️कारावास योग कुंडलीत दिसल्यानंतर, सर्व प्रथम,  हे लक्षात घ्यावयास हवे,  की या योगाची फले, आपल्या कर्मावर आधारित आहेत. आपली  कर्मे, जर पूर्णपणे विधायक असतील,  तर या योगाची,  काळजी करण्याचे कारण नाही.

▪️आपण जर आपल्या व्यक्तित्वाची काळजी घेणारे असाल, त्यासंबंधी जागरूक असाल,  तर ही शक्यता बरीच कमी होते.

▪️ बालकांच्या कुंडलीत, असे काही संकेत असले तर पालक, विशेषतः आई फार चिंतित होते. त्यासाठी कुंडलीतील इतर ग्रहांचा सुद्धा, विचार करणे आवश्यक आहे.

▪️जातकास जर गुरुबल उत्तम असेल, विशेषतः गुरु धर्मत्रिकोणात असून, राशीं अंश दृष्ट्या सबल,  व पापदृष्टिविरहित असेल,  तर ती व्यक्ती सदाचरणी, स्वतः च्या व्यक्तित्वाची जपणूक करून,  समाजात आदर प्राप्त करून घेणारी असते.

▪️तसेच आपल्याला, रविचे बाबतीतहि म्हणता येईल. कुंडलीत रवि,  राशींदृष्टया बलवान असेल, पापग्रह दृष्टिविरहित असेल तर ती व्यक्ती, आत्माभिमानास जपणारी असते. कारण आपण रविस आत्मबलाचा, राजसत्तेचा, औदार्याचा कारक ग्रह मानतो. अशा  जातकाकडून समाजविघातक, बेकायदेशीर कृत्य होणे अपेक्षित नसते.

▪️मग प्रश्न उद्भवतो की, हा कारावास योग, कशाने फलीभूत होऊ शकतो.?

▪️या बाबत,  स्थूल मानाने, असे  म्हणता येईल की, ▪️रवि जर राहूने बिघडलेला असेल,  तर दोन प्रकारे जातकावर प्रभाव दिसतो. ▪️त्याला आत्माभिमान नसतो, काही वेळा तो निर्लज्ज असतो. समाज काय म्हणेल ?,  याची त्याला तमा नसते. अशी वृत्ती असेल,  तर ती अपराधास पोषक ठरणारी असते. तर ▪️काही जातकात त्यांचा बरेचदा,  अकारण,  पाणउतारा होतो. लोक आपल्या पात्रतेचे,  योग्य मूल्यमापन करत नाहीत,  अशी त्यांची तक्रार असू शकते .

▪️तृतीय स्थानहि  काही वेळेस,  कारावासास चालना देणारे ठरते. कारण हे पराक्रमाचे, कागदपत्रांचे स्थान आहे.

▪️तृतीयेश जर व्यय भावात असेल तर, कोणाविरुद्ध, अंगलट येईल अशी जाहीर टीका टिप्पणी करणे., बेकायदेशीर कागदपत्रावर हस्ताक्षर करणे, जाहीर सभेत कुणाची निंदा करणे, चौर्य कर्म करणे, या बाबी अहितकारी ठरु शकतात.

▪️तृतीय स्थान बंधुस्थान असल्याने, शेजारी वा धाकटे बंधूचे प्रताप,  आपल्याला,  अडचणीत आणू शकतात.

▪️या बरोबरच,  आपण कुणासोबत मैत्री करतो. हा भागहि  तेवढा महत्वाचा आहे. 
" समान शीले व्यसनेषू  सख्यम ". या सुभाषितांचा अर्थ,  विचाराअंति ,  किती गहन आहे ? ,  हे लक्षात येईल. म्हणूनच  पारखून मित्रता वाढवली पाहिजे,  हेहि  तेवढेच सत्य आहे. चुकीच्या मैत्रीमुळे,  कितीतरी जातक,  अडचणीत आले आहेत,  असा अनुभव येतो. 

▪️मैत्रीचा व्यापक अर्थ घेतल्यास, उद्योग धंद्यात भागीदार निवडताना, विशेष दक्षता घ्यायला हवी. भागीदाराचेहि  ग्रहमान पहावयास हवेत. भोळसट पणामुळे एखाद्या व्यवसायात,  भागीदारावर विसंबून,  आंधळा विश्वास ठेवल्यास, तो काहीतरी अवैध व्यवहार करतो. व  आपण भागीदार असल्या मुळे, बदनामीचे लांछन आपल्या प्राक्तनी येते. आपला स्वतः चा  काही रोल नसतांना, आपण " बळीचा बकरा " बनतो.  अशी अनेक उदाहरणे,  आपण समाजात पहातो. हेहि कारावास योगाचे फलित सांगता येईल.

, ▪️चोरीचा मुद्धेमाल, अवैध सामुग्री, आंधळा विश्वास ठेऊन,  आपण सांभाळणे  वा आपल्याला माहिती नसताना,  आपल्या घरात, शिवारात, आपल्या क्षेत्रात सापडणे,  हेही आपणास,  त्रासदायक ठरु शकते. यात आपले विचार चांगले असूनही, केवळ भोळेपणामुळे,  आपण अडचणीत आलेले असतो.

▪️ज्यांचे कुंडलीत,  शनी मंगळाचा दृष्टियोग, युतीयोग आहे, तो क्रूर नक्षत्री आहे, या दोन ग्रहांपैकी एक व्यय, कष्ट भावाचा स्वामी आहे, अशा स्थितीत राग, शत्रुत्व अशा कारणामुळे,  व्यक्तीस कारावास घडू शकतो.

▪️शनी राहू युति,  या स्थानाशी संबंधित असल्यास, अंशात्मक असल्यास,  असा योग येऊ शकतो.

▪️रवि -शनी, चंद्र -शनी, हेहि  योग या  " बंधन योग " या क्षेत्रात मोडतात.

▪️असे काही कुंडलीतून आढळल्यास, जो तो, त्याला जी माहिती मिळेल,  त्या आधाराने,  त्यासाठी उपाय योजना करतो. 
काही दिवसापूर्वी, गोरखपूरसंबंधी,  वर्तमानपत्रातून, ज्यांना कारावास योगाची शक्यता सांगितली आहे. ते लोक श्रद्धेने जेलच्या कॅंटीनमध्ये जाऊन तेथे भाकरी खाऊन येतात. अशी बातमी आली होती. म्हणजे " मी जेलमध्ये जाऊन आलो ". अशी खानापूर्ती करण्याचा,  तो एक प्रयत्न आहे, असे म्हणता येईल. पुन्हा प्रत्यक्षपणे जेलमध्ये जाण्याची पाळी येऊ नये,  यासाठी ही उपाययोजना असते.

▪️सहज म्हणून सांगतो, अंदमानात गेल्यावर,  हल्ली राष्ट्रीय स्मारक म्हणून गौरवप्राप्त असलेले सेल्युलर जेल,  जेव्हा पहावयास गेलो. तेव्हा,  तेथील काही उघड्या सेल मध्ये,  काही प्रवाशानी,  स्वतः ला  2 मिनिट  कोंडून घेऊन,  स्वतः चे गजापलीकडील, फोटो काढून घेतले. ते पाहताना, अजाणतेपणी, याचाहि ,  हा का रावासपूर्तीचा प्रयत्न असेल काय ?,   अशी   उगाच मनात, शंकेची पाल चुकचुकली.

  ▪️ज्योतिषशास्त्राचा एक सर्व सामान्य सिद्धांत असा आहे कि. कुठलीहि घटना, केवल एका योगावरून, घडेलच असे नाही. ती घटना निर्माण होण्यास,  इतर ग्रहस्थितीहि  सानुकूल स्थिती निर्माण करत  असेल तरच,  तशी घटना घडते. म्हणजे इतर ग्रह स्थितीचा विचार करणे हे ओघाओघाने  आलेच.

   ▪️वरील सर्व मुद्द्यांची आतापावेतो आपण एकच बाजू पहिली. त्यामुळे,  या योगाची दुसरी बाजू पहाणेहि, तेवढेच अगत्याचे आहे.

▪️समाजात गुन्हेगारीचे प्रमाण किती आहे.? याचा विचार करणेहि  क्रमप्राप्त आहे.

▪️उदाहरणादाखल, आपण जर 100 कुंडल्या विचारात घेतल्या व  कारावासा संबंधी,  आपण संग्रहित केलेल्या योगांची,  पडताळणी,  आपण जर  त्या कुंडल्यातून केली,  तर असे निदर्शनास येईल कि, जवळपास 30-40 पत्रिका, या सदरात मोडतात.

▪️मग समाजात गुन्ह्याचे प्रमाणहि , लोकसंख्येच्या तुलनेत,   30-40 टक्के असायला हवे. पण असे दिसत नाही.

▪️मग हे योग चुकीचे आहेत कां ?  तर ते  मुळीच चुकीचे नाहीत.

▪️ ते आहेत, पण त्याचे स्वरूप बदललेले आहे.  
▪️ मग हे बदललेले स्वरूप कोणते ?  

▪️बारावा भाव,  जसे सजा, दंड, बदनामी दुर्र्रलौकिक दाता आहे, तसाच तो अवांछित  खर्च करणाराहि  आहे.

▪️ आरोग्य बिघडले असता, जीवनात बरेचदा, काही विशिष्ट काळासाठी आपल्याला रुग्णालयात नाखुशीने,  भर्ती व्हावे लागते. त्यासाठी होणारा खर्च,  आपल्यावर लादला जातो.

     त्या काळासाठी,  आपल्या खाण्या पिण्यावर, आहारा विहारावर  निर्बंध घातले जातात. आपण आपले,  सर्व सामान्य जीवन,  जगू शकत नाही.

      ड्रेसधारी वार्ड बॉय, नर्स यांचा आपल्यावर,  खडा पहारा असतो.

      काही काही  आजारात, हात वा पाय बांधले जातात. ते साखळदंड नसतात, तर प्लास्टर असू शकते. 

       विशिष्ट मुदतीपर्यंत,  पलंगास खिळून राहावे लागते. कधी -कधी उठण्या बसण्याची, झोपताना कड बदलण्याचीहि मनाई असते.  शरीराची चिर -फाड केली जाते. सुया टोचणे,  हे तर नेहमीचेच आहे.

       अधून -मधून डॉक्टरची व्हिजिट सर्व व्यवस्थित आहे कि नाही,  याची दाखल घेते.

      जेलर साहेबांच्या राऊंडशी,  या व्हिजिटचे, बरेचसे साम्य वाटते.


तिथे  चारित्र्यात सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्न केले जातात,  तर येथे आपले आरोग्य सुधारणेसाठी. 

       जेलमध्ये असलेली व्यक्ती, त्यांची मुदत संपल्याशिवाय,  स्वतः च्या मर्जीनुसार, घरी परतू शकत नाही. तद्वतच हॉस्पिटलमधून,  आपण आपल्या मर्जीनुसार,  घरी येऊ शकत नाही.

       जेलमध्येही कैद्यांचे रेकॉर्ड असते. तसेच हॉस्पिटलमध्येहि,  आपले रेकॉर्ड असते. अशा अनेकविध बाबी, प्रत्यक्ष तुरुंगवास व हॉस्पिटलायझेशन यात साम्य दाखविणाऱ्या आहेत.

💢 म्हणजेच जे जातक,  गुन्हेगारी वृत्तीचे नाहीत,  ते कधीकाळी,  हॉस्पिटल मध्ये भर्ती होण्याचीच  शक्यता अधिक असते. त्यामूळे,  या योगाचा,  केवळ  एकाच अंगाने, विचार करून चालत नाही.

💢 चंद्र शनी योगाचे स्वरूप, यापेक्षा  थोडे वेगळे आहे.

▪️हा योग अंशात्मक, क्रूर नक्षत्री असता, जातकास,  काही मानसिक शल्य असू शकते. जीवनात अशी काही स्थित्यंतरे असतात, कि ती व्यक्ती,  समाजात मिसळणे टाळते.

▪️अशा व्यक्ती विरक्त व एकांतप्रिय असतात. म्हणजेच त्या आपले स्वतः चे विश्व निर्माण करतात. व त्यातून बाहेर पडत नाहीत, त्यात स्वतः ला कोंडून घेतात. 

▪️म्हणून या योगास " वीष योग " म्हटले आहे, ते उगीच नाही.

▪️काही व्यक्ती,  मनोरुग्णहि  असू शकतात.

▪️अतिशय वेडाचे झटके येत असल्यास,  इतर कुटुंबीय, त्यास कोंडून ठेवतात वा मनोरुग्णालयात भर्ती केले जाते.

▪️काही व्यक्तींच्या जीवनात,  मनास हादरा देणाऱ्या, अशा काही घटना घडतात,  वा शरीर वा चारित्र्यात, असे काही व्यंग निर्माण होते कि, त्या समाजात मिसळणे टाळतात. वा समाज त्यांच्याकडे,  तिरस्कृत नजरेने पाहतो.  हाहि एक कारावास वा बंधन योग नव्हे कां ?

▪️काही योग,  एवढे बलशाली असतात कि, गुन्हेगारी प्रवृत्ती असता, ते तुरूंगाची हवा खाऊ घालतातच. यात गुन्हेगारी प्रवृत्ती,  यास खतपाणी घालते.

▪️कुठलीहि , गुन्हेगारीसंबंधित कौटुंबिक  पार्श्वभूमी नसताना, वर नमूद केल्यानुसार,  इतर ग्रह प्रतिकूल नसताना,  पाल्याच्या कुंडलीत कारावास योग आहे, म्हणून कुंडली जाळून टाकणारे  पालकहि,   मी पाहिलेले आहेत.

▪️त्यामुळे कारावास योगाचे,  अंतरंग समजून घेणे,  तेवढेच महत्वाचे आहे. 

                == पुंडलिक दाते, अकोला 
                             9421755299



      

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली