परिचय बहुरूपी राहुचा
💢 मनुष्य जन्माचे वेळी, ग्रहांच्या आकाशस्थ स्थितीनुसार, ते ग्रह मनुष्या च्या जीवनावर काय, व कसा प्रभाव टाकतील, याचे निदान करणारे शास्त्र, म्हणजे ज्योतिष शास्त्र होय. तत्कालीन ग्रहस्थितीचा अभ्यास करून, मनुष्याच्या जीवनाचे स्वरूप कसे असेल, याचा अगोदरच अंदाज काढणे, हे गूढ असल्याने, यास गूढशास्त्र असेही मानतात
💢 प्रत्येक शास्त्रात कालपरत्वे नवनवीन संशोधन होते, नवनवीन सिद्धांत मांडले जातात, त्याच्या सत्यतेचे परीक्षण केले जाते, व ते पारखून अंगिकारलेहि जातात.
तसेच या शास्त्राचेही आहे, हे शास्त्र त्यास अपवाद नाही. या तत्वाच्या अनुषंगानेच रवि, चंद्र, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनी, या मुख्य 7 ग्रहांच्या मालिकेत, राहू व केतू या दोन छेदनबिंदूना, अंतर्भूत करून " नवग्रह " विचारार्थ घेण्यास प्रारंभ झाला. त्यात पुन्हा हर्षल, नेपच्युन, प्लूटो या आधुनिक 3 ग्रहांची भर पडून ग्रहमंडळात हल्ली 12 ग्रह विचारात घेतले जातात.
💢 पृथ्वीची भ्रमणकक्षा व चंद्राची भ्रमणकक्षा, यांच्या छेदनबिंदूस राहू- केतू असे म्हणतात. ते छेदनबिंदू असल्याने त्यांना ग्रह म्हणणे योग्य नाही, असेहि या शास्त्राचे खंडनकर्ते म्हणतात. पण विषयात सुलभता यावी, या दृष्टीने ग्रह, तारे, छेदनबिंदू या सर्वांस, ज्योतिष शास्त्रात ग्रह संबोधले आहे, असे याबाबत म्हणता येईल.
💢 राहुचा विचार करताना राहुविषयीची पौराणिक कथा, राहुची फळे स्पष्ट करताना फार महत्वाची ठरते. या कथेमध्येच राहूचे वैशिष्ट्य दडलेले आहे. या कथावैशिष्ट्या चा फलकथनात कसा सहभाग आहे हे मी माझ्या परीने स्पष्ट करतो, ते वाचून विस्मय वाटेल यात शंका नाही.

◾️समुद्र मंथन समयी, दानवसेनेतील स्वरभानू हा राक्षसाने, अमृत प्राशनासाठी देवाचे, मायावी रूप धारण केले. तो मूळचा राक्षस असल्याने, व राहू केतू हे त्याचेच परावर्तित रूप असल्याने, त्यास पापग्रह मानले आहे. तो देवगणी ग्रह नव्हे.
◾️दानव सेनेतील हा स्वरभानू राक्षस अमृत प्राशनासाठी, देवाचे रूप धारण करून, देवांच्या पंगतीत शिरला. त्याने धारण केलेले रूप मायावी होते , म्हणून वेषांतर करणे, नटण्यामुरडण्याची आवड असणे, मनातल्या भावना चेहेऱ्यावर दिसू न देणे, जादूगारी, अद्भुत तांत्रिक कला, आजच्या काळात, चमत्कृतीपूर्ण अशी संगणकीय विद्या, राक्षस असल्याने, तांत्रिक अघोरीं विद्या, मद्य, मायाजाल, परकीय विद्या, पाशवी विद्या वा तत्सम व्यवसाय वा या बद्दलची रुची, राहू प्रभावित जातकात पहावयास मिळते . राहू हा गूढाचा कारक असल्याने, ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासासाठी, तो उपयुक्तच म्हणावा लागेल.
◾️असुर असून, मोठ्या चतुराईने देवात मिसळून, अमृत मिळवणे, हा एक जुगारच होता. जुगारात यश व अपयश यातील रेषा, खूपच धूसर असते. म्हणून, राहूस जुगाराचा कारकहि मानले आहे. राजकारण हाहि एक जुगारच आहे, कोण, केव्हा, कशी खेळी खेळेल, हे सांगता येत नाही. म्हणून राहु प्रभावित व्यक्तीत, हे सर्व कौशल्य असू शकते व त्या बळावर ती उत्तम कूटनीतिज्ञ होऊ शकते.
◾️अमृत मिळवण्यासाठी, बेमालूम वेषांतर करणे, ही क्रिया कूटनीतीक व पूर्णतः राजकारणी आहे. त्यामुळे कर्मस्थानात जर राहू असेल, तर जातक या क्षेत्रीं पारंगत होतो. हे निदान सहसा चुकत नाही.

◾️या अर्थाने, राहू हा परधर्मीय होता, या विशेषत्वामुळे, बरेचदा जातकास, षष्ठात राहू असता, परधर्मियांकडून सहकार्य मिळते, या सिद्धांताचा बोध होतो.
◾️याच कथेत, समुद्र मंथनातून जशी अमृताची उत्पत्ती झाली, तशीच वीषाचीहि झाली. म्हणून राहूस, वीषाचा कारक म्हणून पहिले जाते. वीष विक्री ही मेडिकल क्षेत्रातील बाब असल्याने, दशमात राहू असता, व्यक्ती मेडिकल व्यावसायिक हि असू शकते.
◾️राहू बेमालूम वेषांतर करून, देवात शिरला आहे, हे, रवि व चंद्राने, भगवान विष्णूच्या लक्षांत आणून दिल्यामुळे, रवि व चंद्राशी, राहू -केतुचे वैर, नव्हे हाडवैर निर्माण झाले. त्यामुळेच चंद्र राहू, -रवि राहू युत्या -दृष्टी योग, लक्ष्यवेधी अशुभ फळे निर्माण करताना दिसतात.
▪️ जन्मकुंडलीच्या प्रथम स्थानी राहू असलेल्या कुंडलीस वा चंद्राचे चतुर्थात राहू असलेल्या कुंडलीस "शापित कुंडली "असेही म्हणतात.
◾️भगवान विष्णूनी, या राक्षसाचा शिरच्छेद केला, त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले. उंची कमी झाली. हे वैशिष्ट्य बरेचदा, फार मोठ्या पदावर गेलेल्या, पण उंचीने कमी असलेल्या जातकाच्या, लग्नी राहू असल्याचे, अनुभवास आले आहे.
◾️या दानवांचे भगवान विष्णूनी शिरच्छेद केल्या मुळे, ते शरीर दोन भागात विभागल्या गेले . वरचा शिरोभाग, हा राहू असून उर्वरित शरीर, केतू म्हणून ओळखल्या जाते . शिरच्छेदापूर्वी घशात अमृत अस ल्याने, राहुचा प्रभाव केतूंपेक्षा अधिक बलशाली असल्याचा प्रत्यय येतो.
◾️राहू हा डोक्याचा भाग असल्याने, लग्नी राहू असता, त्या बालकाच्या जन्म काळी, त्याच्या मातेस, अधिक प्रसवकष्ट झालेले असतात वा बाळाचा जन्म, सिझरिंगने झालेला असतो. हा राहू क्रूर नक्षत्री असता, हे निदान सहसा चुकत नाही. हा राहू दूषित असता, शिरोरोग संभवतो. बरेचदा थोडे परिश्रम वाढले कि, डोकेदुखीचाही त्रास संभवतो.
💢 कथानकाच्या अनुषंगाने, ही राहूची वैशिष्टये, विनासायास लक्षांत राहतात. जे या क्षेत्रात अगदीच नवीन आहेत. त्यांना या तपशिलाचा खूपच चांगला उपयोग होईल.
💢 मुळात कुंडलीत दिसणाऱ्या ग्रह स्थितीचा आधार हा पूर्व जन्मीचे संचित, सुकृत, प्रारब्ध हाच आहे. जन्मकालीन ग्रह स्थितीनुसार आपल्या प्रथम श्वासापासून ते अंतिम श्वासापर्यतच्या जीवनाची रूपरेषा ठरलेली आहे. व त्यानुसार जीवन भोगाव याचे आहे असे असले तरी, इतर ग्रहांच्या तुलनेत, राहूस पूर्वजन्माचा दोषदर्शक ग्रह, या दृष्टीने अधिक महत्व दिले जाते. व राहू मुळे निर्माण होणाऱ्या व्याधी, या आधिदैविक व्याधी, पूर्व जन्मातील दोषामुळे निर्माण झाल्या आहेत, असे समजले जाते.
💢 ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून,
▪️राहू हा पापग्रह असून तो रवि चंद्र, यांचा शत्रू असून, मंगल व गुरु राहूस सम आहेत. बुध, शुक्र, शनी, आदी पापग्रहांचा मित्र आहे.
▪️मुख्य सात ग्रहांना जशा स्वतःच्या राशीं आहेत तशा, राहू केतू यांना स्वतःच्या राशीं नाहीत. कर्क ही राहूची मूळ त्रिकोण रास, मिथुन ही उच्च रास, वृषभ ही स्वरास तर धनु ही नीच रास मानतात . राहू मिथुनेत 15 अंशावर असणे परम उच्चांशी, व धनु राशीत 15 अंशावर असणे, परम निच्चांशी समजले जाते.
▪️नक्षत्र चक्रातील आर्द्रा, स्वाती व शत तारका या नक्षत्रांचे अधिपत्य राहूकडे आहे.
▪️विशोत्तरी दशेनुसार राहूची महादशा 18 वर्षाची असते.
▪️राहू केतू सदैव वक्रीच असतात.
▪️कुंडलीत ते नेहमी समोरासमोर असतात. ( ही स्थिती कुंडलीत दिसत नसल्यास कुंडली चुकीची आहे असे खुशाल समजावे )
▪️एका राशीतून भ्रमण करण्याचा, राहू केतूचा, कालावधी दीड वर्षाचा असतो.
▪️राहू अंध असतो असा उल्लेख काही जुन्या पुस्तकात आढळतो. तर काही, सर्व ग्रहांना असलेली, राहूस स्वस्थाना पासून सातवी दृष्टी मानतात. तर काही आधुनिक ज्योतिषी, राहूस गुरूप्रमाणे पाचवी, सातवी व नववी दृष्टी मानतात. त्यामुळे याबाबत, स्वानुभव फारच महत्वाचा ठरतो
▪️राहूच्या प्रसन्नतेसाठी गोमेद नावाचे रत्न धारण करतात. मलय चंदन ही वनस्पती राहूपीडा शमनार्थ धारण केली जाते.
▪️राहू हा विषारी ग्रह असून, तो कालसर्प योगात, सर्पाचे मुख समजण्यात येतो, तर केतू सापाचे शेपूट समजण्यात येते. कुंडली त राहू पीडित असता, सरपटणाऱ्या प्राण्या पासून, विषारी प्राण्यापासून पीडा संभवते.
▪️राहू वडिलांचे वडील म्हणजे आजोबांचे (दादा) प्रतिनिधित्व करतो तर केतू आईचे वडील आजोबाचा (नाना) दर्शक मानतात.
▪️राहू नैऋत्य दिशेचा कारक समजला जातो. काही ज्योतिषी राहूची आग्नेय दिशा मानतात.
💢 प्रत्येक ग्रहाचे आपापले वेगळे वैशिष्ट्य असते. जसे मंगळाचे विवाह समयी " मंगळ विचारासाठी ", शनी महाराजाचे " साडेसाती " साठी, हे ज्योतिष्याचे जुजबी ज्ञान असणारांनाहि माहिती असते, तद्वतच राहूसाठी कालसर्प योग, राहु काळ, व रवि -चंद्र ग्रहणे ही वैशिष्ट्ये सांगता येतील.
💢 कालसर्प योग :
▪️ जन्म कुंडलीत राहू व केतू हे नेहमी समोरा समोर असतात. जेव्हा रवि, चंद्र, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सात ग्रह राहू व केतूच्या एकाच बाजूस असतात, तेव्हा पूर्ण कालसर्प योग होतो असे मानले जाते. जेव्हा यापैकी एक ग्रह एका बाजूस व इतर ग्रह दुसऱ्या बाजूस असतील तर त्यास " काल सर्प योगाची छाया " आहे, असे मानले जाते.
▪️ या योगाचा विचार करताना हर्षल, नेपच्युन, प्लूटो या ग्रहांचा विचार केला जात नाही. त्यामागे, कालसर्प योगाच्या संकल्पनेनंतर, या ग्रहांचा शोध लागला त्यामुळे, यांचा विचार अभिप्रेत नाही, असे सांगितले जाते.
▪️ हा योग प्रगतीस बाधा आणणारा आहे. हा योग असला तरी, वयाच्या 42 नंतर, याचा प्रभाव राहत नाही, असेहि सांगितले जाते.
▪️ याबाबत अनेक मत मतांतरे आहेत. व त्यावर वेळोवेळी चर्चाहि होत आहेत. त्यामुळे या विषयात फार नावीन्य उरलेले नाही.
▪️त्र्यंबकेश्वर क्षेत्रीं याची शांतिपूजा करण्याची प्रथा आहे. ज्यांना नाशिकला जाणे शक्य नाही ते जवळ च्या नदीसंगमा वर वा शिवालयात पूजाअर्चा करून घेतात. भगवान शिवाची उपासना यासाठी श्रेयस्कर मानली जाते. या बाबत अनेक मतप्रवाह आहेत. एवढे मात्र खरे कि कुठलीही उपासना श्रद्धापूर्वक असली तरच ती सफल आहे. श्रद्धेशिवाय केलेली उपासना केवळ सोपस्कार ठरतो.
▪️ हा योग कोणत्या स्थानापासून सुरु होतो त्याप्रमाणे, त्यांचे नामाभिधानहि केले गेले आहे. त्यानुसार अनंत, कुलित, वासुकी, शंखपाल, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कोटक, शंखचूड, घातक, शेषनाग ही नांवे आहेत.
▪️ या योगाची रचना एवढी सोपी आहे कि, एकदा वाचल्यानंतर, नवशिके ज्योतिषी, वा सामान्य जनांना सुद्धा हा योग चटकन ओळखता येतो.
💢 राहुकाळ :
▪️ हा काल साधारणपणे दीड तासांचा असून, हा शुभ कार्यास निषिद्ध समजला जातो. दक्षिण भारतात हा काळ खूप महत्वाचा मानतात. कोणत्या दिवशी किती वाजता राहू काल आहे हे सहसा क्षेत्रीय पंचांगात दिलेले असते.
💢 रवि व चंद्र ग्रहणे :
▪️ प्रत्येक पौर्णिमेस रवि व चंद्र हे एक मेकांसमोरील राशीत असतात तर दर अमावास्येस, ते एकाच राशीत असतात. जेव्हा त्यांच्याशी, राहुचा युति -प्रतियोग होतो, तेव्हा ग्रहणे होतात. ही खगोलीय घटना असली तरी, रविग्रहणकाळात रवि व चंद्र ग्रहणकाळात चंद्र, हे बलहीन होतात.
▪️रवि आत्मबलाचा व चंद्र मनोबलाचा कारक असल्याने, या काळात बालकाचा जन्म असता, आत्मबल व मनोबल याबाबत,कुंडली दुर्बल ठरु शकते.
▪️जेव्हा ही ग्रहणे खग्रास असतात तेव्हा, अधिक गंभीर परिणाम मिळण्याची शक्यता असते. खग्रास चंद्रग्रहणातला जन्म असता, बालक मतिमंद असू शकते. अशा 2/3 कुंडल्या, माझ्या पाहण्यात आल्या आहेत. एका कुंडलीत, डोक्याचा एवढा भीषण अपघात पाहण्यात आला आहे, कि जणू त्या जातकाचा पुनर्जन्म झाला आहे, असे म्हटले तरी हरकत नाही. ▪️ खग्रास ग्रहणापूर्वीचे व नंतरचे, 3 दिवसही अनिष्ट मानतात. ग्रहणकाळी जन्म असता, शांतिपूजा सूचित केली जाते.
▪️संपूर्ण वर्षभरात कोणती ग्रहणे केव्हा होतील? , ती कुठून दिसतील? , त्या ग्रहणाचे वेध, स्पर्श, मध्य, मोक्ष यासंबंधीची, पुर्ण माहिती, क्षेत्रीय पंचांगात दिलेली असते.
▪️ ज्या स्त्रिया गर्भार असतात, त्यांच्या साठी ग्रहण काळात, काय पथ्ये पाळावीत ? , काय करावे ? , काय करू नये ? याची घरातील वयस्कर अनुभवी स्त्रियांकडून वा गुरुजींकडून, माहिती दिली जाते. या काळात गरोदर स्त्रियांनी घरातील कामे करणे, विशेषतः भाजी चिरणे, अशा गोष्टी टाळाव्यात. यामुळे जन्मास आलेल्या बालकाचा, ओठ फाटलेला असणे, कानाची पाळी चिरलेली असणे, अशी व्यंगे जन्मतः बालकात येऊ शकतात असा समज आहे. त्यामुळे हा काळ, त्यांनी देवघरात बसून, ईश्वर चिंतनात घालवणे, केव्हाही श्रेयस्कर असते.
▪️ग्रहण काळात मांत्रिक लोक, नदी -तलावात उभे राहून, ओलेत्या अंगाने, आपल्या मंत्राचा निष्ठेने जप करतात. त्यामुळे ते मंत्र, सिद्ध होऊन अतिशय प्रभावशाली होतात, अशी धारणा आहे.
▪️यावरून ग्रहण ही किती आगळीवेगळी खगोलीय घटना आहे हे ध्यानी येईल.
💢 राहू वैगुण्याचा कारक आहे. तो ज्या ग्रहासमवेत असतो, वा ज्या ग्रहाच्या प्रतियुतीत असतो. त्या ग्रहाच्या कारकत्वा त न्यूनता निर्माण करतो. राहूने दूषित झालेला ग्रह, ज्या भावाचा स्वामी असतो, त्या भावाची फळेही, या राहू सानिध्याने प्रभावित होतात. ही युति वा प्रतियुती, जर अंशात्मक योगात असेल तर, अधिक उग्र फळे मिळण्याची संभावना असते.राहु प्रभावित ग्रहाच्या, फलादेशाच्या दृष्टीने, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.
राहू सानिध्याने, ग्रह फळावर कसा परिणाम होतो, हे थोडक्यात पाहू.
💢 रवि व राहू :
रवि हा ग्रह आत्मसन्मानाचा कारक समजला जातो. रवि गृहमंडळातील श्रेष्ठ ग्रह असल्याने, ग्रहमंडळाचे राजपद रवी कडे आहे. कुटुंबातील सर्व श्रेष्ठ सदस्य वडील असल्याने, रवीच्या कुंडलीतील स्थिती वरून, पितृसुखाचा अंदाज घेतात.
रवि, चंद्र यांच्या प्रकाशाने सर्व सृष्टी दृश्यमान होते. तसेच तेजस्वी तारा म्हणून शुक्राचीहि गणना होते. त्यामुळे या 3 ग्रहांना दृष्टी सुखाचे कारक म्हणूनही विचार केला जातो.
शरीरातील हाडे, हृदय, यावरही रवीचा अंमल आहे.
स्त्रियांचे बाबतीत विवाहानंतर घरात पतीचे वर्चस्व समजले जाते म्हणून स्त्री कुंडलीत पति सुखासाठी रवीचाही विचार होतो.
असा हा रवि ग्रह राहूने दूषित असल्यास, त्या व्यक्तीस त्याच्या अपेक्षेनुसार योग्य मानसन्मान मिळत नाही. वा त्याच्या योग्यतेचे योग्य ते मूल्यमापन केले जात नाही अशी त्याची तक्रार असते. कधी कधी त्याचा दोष नसताना, विना कारण त्याचा अपमान होतो.
रवि राहू युतीत बरेचदा जातक गुरुबल नसता, समाजमनाची पर्वा न करणारा, कुठलाही विधि निषेध नसणारा, क्वचित निर्लज्जही असू शकतो. हाडाचे व दृष्टीचे व हृदयाचे विकार होऊ शकतात. रवीचा षष्ठ स्थानाशी संबंध असता हे तीव्रतेने जाणवू शकते. वडिलांपासून हवे तसें सहकार्य मिळत नाही. नोकरीं धंद्यातही हवा तसा जम बसत नाही. स्त्री कुंडलीत पतीकडून हवे तसें मानसिक सुख मिळत नाही. अर्थात हे सर्व अंदाज स्थूल स्वरूपाचे आहेत. जातकाचे दशमस्थान दशमेश बलवान असता, एवढी तीव्रता जाणवणार नाही. स्त्री जातकास सप्तम स्थान व सप्तमेश बलवान असता, या योगाची तीव्रता कमी जाणवेल.
रवि पित्याचा कारक व राहू पूर्व जन्मीचा दोष दर्शक ग्रह असल्याने, पूर्वी कुठल्या तरी जन्मात, आपण वडिलांची त्याच्या उतारवयात, आपले कर्तव्य असताना, आपण व्यवस्थित देख भाल केली नाही. त्यामुळे, त्यांचा झालेला तळ तळाट, याजन्मी शाप रूपात, रवि राहू रूपाने प्रकटला आहे, असे याचे स्पष्टीकरण केले जाते. ज्यांच्या पत्रिकेत असा योग असेल, त्यांनी आपल्या वागण्या बोलण्यात अतिशय दक्ष असावे कि जेणे करून, अपमानास्पद प्रसंग ओढवणार नाहीत. हा सर्वोत्तम उपाय म्हणता येईल.
💢 जन्मदात्या पित्याचा कधीहि अपमान वा उपमर्द करू नका. त्यांना आदराची वागणूक द्या. नियतीने असा संदेश ग्रहतार्यांच्या माध्यमातून दिला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
💢 चंद्र व राहू
▪️चंद्र मनाचा तसेच मातृसुखाचा कारक ग्रह आहे. चंद्र बलवान असता व्यक्ती आनंदी, हसतमुख, कोणत्याही संकटात न डगमग णारी, धैर्यशील असते. अशा व्यक्तीस मातृसुख उत्तम मिळते पण हाच चंद्र राहूने दूषित असेल तर द्विधा मन स्थिती होणे, मन उद्विग्न राहणे, शुल्लक कारणाने मानसिक शांतता भंग होणे. क्रूर नक्षत्री असता, अंशात्मक युति, दृष्टीत असता मानसिक विकार होणे, वेड, मिरगी येणे, मातृचिंता असणे अशी ऋणात्मक फळे मिळण्याची संभावना असते. त्यातून चंद्र हा जलराशीचा अतिशय संवेदनशील ग्रह आहे. पापग्रहाच्या सानिध्याने तो दूषित होतो. जेवढ्या पापग्रहाची चंद्रावर दृष्टी असेल तेवढा तो अधिकच दूषित होत जातो.
▪️ हा चंद्र राहू सानिध्यात असता, पूर्व जन्मी मातेकडे दुर्लक्ष केल्याने मातेचा तळतळाट, चंद्र राहू रूपाने, कुंडलीत स्थापित झाला आहे, असे समजण्यात येते. हा ग्रहण योगहि समजण्यात येतो.
मनोबल वाढविणे, मनाची सहिष्णुता वाढवणे या सारखा उत्तम उपाय दुसरा नाही.
▪️ मातेचे मन कधीहि दुखवू नका. दुधाचे पांग फेडा असा या योगाच्या माध्यमातून संदेश मिळतो.
💢 मंगल राहू
▪️ मंगल हा ग्रह धाडशी, लढवैय्या, शूरतेचा, यांत्रिक विद्येचा, मैदानी खेळ, क्रीडा याचा कारक आहे. मंगळ हा रक्त वर्णीय ग्रह असून, तो रक्ताचाहि कारक आहे. त्या मुळेच जेव्हा लढाऊ प्रवृत्ती जागृत होते तेव्हा " रक्त सळसळते "असा शब्दप्रयोग होत असावा. मंगळास धाकट्या भावंडांचा कारक ग्रह, मानले आहे.
▪️ असा हा मंगळ, राहूने दूषित झाल्यास, जातकात शूरतेचा अभाव असू शकतो. वा शक्ती बलाचा वापर, अवैध कार्यासाठी होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रात यास " अंगारक योग " असे म्हटले आहे. मैदानी खेळाची आवड नसू शकेल. यांत्रिक विद्येतही अपयश संभवते.
▪️ षष्ठस्थानाशी संबंध आल्यास, रक्त दूषित झाल्याने, त्वचा विकार संभवतात. डोक्यात कोंडा होणे अशा व्याधी सापडतात. धाकट्या भावाशी पटत नाही. बरेचदा जातकच, भावंडात सर्वात धाकटा असतो. याचाही अर्थ धाकट्या भावंडांचे सुख नाही, असाच होतो . धाकटे भावंड असल्यास, पुढे मागे वितुष्ट येऊ शकते.
▪️भावाभावात वादाचे कारण, साधारणपणे पैतृक संपत्ती असते. असा योग दिसल्यास, व मुलाचे पालक विचारावयास आल्यास, भावा भावात वाद विकोपास जाऊ नये म्हणून, त्यांना, स्वतः च्या हयातीत संपत्तीची वाटणी करून द्या, असा सल्ला देणे, केव्हाहि हितावह ठरेल .
▪️मागच्या कुठल्या तरी जन्मात, जातकाने धाकट्या भावाच्या संपत्तीचा अपहार करून, त्याच्यावर अन्याय केला असावा. त्याचा झालेला तळतळाट, मंगळ राहू रूपात, पत्रिकेत स्थापित झाला अशी या बाबत, कारण मीमांसा केली जाते.
▪️ हा ग्रह ज्या भावाचा स्वामी असतो, त्या भाव फळात उणीव निर्माण होते. या योगामुळे शारीरिक व्याधी उत्पन्न झाल्यास वैद्यकीय उपचारास प्राधान्य असावे.
▪️ धाकटा भाऊ पुत्रासम असतो. स्वार्थाने आंधळे होऊन त्यावर कधीहि अन्याय करू नका. असा बोध या योगापासून मिळतो.
▪️ बुध हा ग्रह बुद्धीचा व मुख्यत्वे वाणीचा कारक आहे . बुधावरून मातुल सुख पाहतात. बुध त्वचेचा कारक मानला जातो. बुधावरून चरबीही विचारात घेतली जाते. अर्थातच बुध बिघडल्यास या बाबत अशुभ फळे निर्माण होऊ शकतात. वाणींदोष तर चटकन नजरेत भरतो. वाणी दोषाचेही विविध प्रकार सांगता येतील.
▪️ लावालाव्या करणे, नको ती गोष्ट नको तिथे सांगणे, एकाच घटनेचे पुन्हा पुन्हा वर्णन करणे. चर्चा करताना मूळ मुद्दा वगळून इतर माहिती देणे. असंबद्ध बडबड करणे, बढाया मारणे. अर्धवट माहिती देणे, अस्पष्ट शब्दोच्चार, तोतरे बोलणे, बोलताना थुंकी उडणे, काळ वेळेचे बंधन न पाळता निरस विषयावर बोलत बसणे, कडवट- उपरोधी भाषा प्रयोग असे कितीतरी वाणींदोष सांगता येतील. वरील कुठलाही दोष व्यक्तित्वास मारक होय.
▪️ वरील दोष जर आपल्यात आढळत असेल तर स्वभाव परिवर्तन व वाणी नियंत्रण केलेले बरे.
▪️ पैशापेक्षा शब्द लाखमोलाचे आहेत. त्याचा फार तोलून मापून वापर करा असे तर या योगास सुचवायचे नाही ना ? हो !नेमके तेच, या योगास म्हणावयाचे आहे.
💢 गुरु राहू
🔸शिक्षण व संततीचा कारक असणारा हा सात्विक ग्रह जेव्हा राहूच्या युतीत येतो तेव्हा त्यास " चांडाळ योग " असे म्हटले जाते. सात्विक व पाशवी प्रवृत्ती इथे एकत्र आल्या सारखे असते. यामुळे गुरुच्या फला त वैगुण्य निर्माण होते. यामुळे शिक्षणात व संतती होण्याबाबत अडचणी, अडथळे, विलंबासारखी फळे मिळण्याची शक्यता असते.
🔸 शालेय जीवनात विद्यार्थ्याने शिक्षकाना एखादी शंका विचारल्यास, " मी शिकवत होतो तेव्हा, तुझे कुठे लक्ष होतं ? असा प्रतिप्रश्न ऐकणारे विद्यार्थी या गटात मोडतात असे म्हणता येईल. काही विद्यार्थ्यांना, विषय नीट समजला कि नाही याची, शिक्षक जातीने, आपणहून, खात्री करून घेतात, तर काही विद्यार्थ्याना, लक्ष कुठे होतं ? म्हणून प्रतिप्रश्न विचारून त्याचे मनोबल खच्ची करतात. हे साधे उदाहरण, विद्यार्थ्यांचे गुरुबल कसे आहे ? याचे निदर्शक आहे, असे म्हणता येईल.
🔸 कुण्डलीतील संततिभावास पुत्रभावहि म्हटले जाते. या युतीमुळे बऱ्याचशा जातकांना कन्या संतानच असते. वा संतान प्राप्तीसाठी, ईश्वरी आराधना करावी लागते. देवतेच्या आशीर्वादाने, कृपाप्रसादाने, संतती प्राप्ती होते. क्वचित काळी मानस पुत्रहि संतति सुख देताना आढळतो, वा संतान दत्तक घ्यावी लागते.
🔸 अर्थात संतती हा विषय स्त्री वा पुरुष एकट्याचा नसून, दोघांच्या ग्रहस्थिती चा संयुक्तिक परिणाम असतो. त्यामुळे एखाद्याच्या पत्रिकेत संतान स्थिती, चिंता जनक असली, तरी जोडी दाराची कुंडली याबाबत शुभ प्रभाव दाखवत असेल, तर निश्चितच, अडचणीचे प्रमाण कमी होईल. या उलट, उभयता, दोघांच्या कुंडलीत अडथळे असले, तर याबाबत ऋणात्मक फळे मिळण्याचीच शक्यता अधिक वाढते.
🔸त्यामुळे, केवळ एकाची कुंडली पाहून निदान करणे, निश्चितच एकांगी होईल.
🔸 थोडक्यात, गुरु कुंडलीस अकारक ग्रह व अशुभ भावात असता, जातक ढोंगी उपासक असू शकतो. त्याचे चारित्र्य भ्रष्ट वा दुधारी, दुटप्पी, असू शकते , तो भोग विलासी असू शकतो .
🔸 या उलट, गुरु कारक ग्रह असून, शुभ भावात असता, ती व्यक्ती आध्यात्मिक विषयात रममाण होणारी, विरक्त प्रवृत्तीची, इतरांना मार्ग दर्शन करून समाजात मानाचे स्थान मिळवणारी असू शकते.
💢 पूर्व जन्मी गुरु वा गुरुतुल्य व्यक्तीची अव हेलना केली, अपमान, उपमर्द केल्यामुळे,त्याचा शाप गुरु राहू रूपात, कुंडलीत आढळतो, अशी या योगामागे धारणा आहे.
💢 वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, मार्गदर्शक व्यक्तीचा मनोभावे सन्मान करा. त्यांचा कधीहि अनादर करू नका. हाच या योगाचा मौलिक संदेश म्हणता येईल.
💢 शुक्र राहू
🔸शुक्र ऐहिक सुखाचा, स्त्रीसुखाचा, भोग विलासाचा, सौन्दर्याचा, वासनेचा , कलांचा कारक आहे. शुक्राची चांदणी सर्व ताऱ्यानंमध्ये अधिक तेजस्वी दिसत असल्याने रवि चंद्र हे जसे दृष्टीचे कारक मानतात तद्वतच,शुकालाहि दृष्टीचा कारक मानतात. शुक्राचा अंमल वीर्यबीजावरहि आहे. असा हा शुक्र राहुच्या दृष्टी योगात वा युतीयोगात असता, त्याच्या गुणधर्मावर विपरीत प्रभाव पडतो.
🔸जातकात दृष्टी दोष असू शकतो. तिरळेपणा असू शकतो.
🔸 दुर्दैवाने रवि, चंद्र, शुक्र तिन्हीहि बिघडलेले असतील, तर अकाली डोळ्याचे दुर्धर आजार होऊन, दृष्टी जाते.
🔸वासनेत विकृती येते त्यामुळे वैवाहिक जीवनहि अशांतच असते.
🔸रविबल, गुरुबल नसता, वर्तन, स्वैर असू शकते. हे कलाकार असतील तर, यांच्या कलाकृतीतहि विकृतीचा अंश, अनुभवास येऊ शकतो व ती चित्रकला, मूर्तिकला, नाटक, सिनेमे वादग्रस्त ठरु शकतात. क्वचित काळी वीर्यशक्तीचा हि अभाव असू शकतो.
🔸ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार कुठलाहि युति-दृष्टियोग अंशात्मक असल्यास, त्या योगाचे फळ, पूर्ण ताकदीने मिळते, मग ते शुभ असो वा अशुभ
🔸तसेच ग्रह जर क्रूर नक्षत्री असले, तर ते शरीर स्वास्थ्यास निश्चित त्रासदायक असतात. हे नियम या योगासही लागू होतात.
🔸 कुठल्या तरी पूर्वजन्मात, जोडीदाराचा अनन्वित छळ केल्यामुळे, त्याचा तळतळाट, शुक्र राहू रूपात, कुंडलीत स्थापित होतो अशी या योगा मागे धारणा सांगितली जाते.
💢 जोडीदारावर कधीहि अत्याचार करू नका. त्याचाहि भावनेचा विचार करा. आदर करा. हेच या योगाच्या माध्यमातून सुचवायचे आहे, असे म्हणता येईल.
💢 शनी राहू
शनी व राहू हे दोन्ही पापग्रह असून परस्परात मैत्री असणारे ग्रह आहेत. शनी व राहू योगाची अशुभ फळे, सहसा चुकत नाहीत. त्यामुळे ही युति ज्या स्थानी असेल वा शनी ज्या स्थानाचा स्वामी असेल, त्या स्थानाची वाट लावल्या शिवाय राहत नाही.
प्रत्येक ग्रहाची, गोचरीने जेव्हा तो मूळ कुंडलीतील त्याच्या विद्यमान असलेल्या राशीतून भ्रमण करतो, तेव्हा त्याचे संभावित फळ देण्याची प्रवृत्ती असते. तसेच प्रत्येक ग्रह त्याच्या महादशेत- अंतर्दशेतहि, फळ देण्याची संभावना असते. एखाद्या ग्रहाची महादशा वा अंतर्दशा सुरु असताना, त्याचे गोचरी नेहि कुंडलीतील त्याच्या असलेल्या स्थानावरून भ्रमण असेल, तर त्या काळात, त्या ग्रहाची शुभा शुभ फळ देण्याची शक्यता, अधिकच बळकट होते.
शनी महाराज एका राशीत अडीच वर्षे व राहू एका राशीत दीड वर्ष असतो. काही लोकांच्या आयुष्यात, कधीतरी, 2/3, अशा काही दुर्घटना घडतात, कि त्यांचा ठळकपणा, ते जीवन भर विसरू शकत नाही. अशा ताकदीचे फळ देण्याची, या योगाची प्रवृत्ती असते.
शनी वयस्कर ग्रह असल्याने, या युतीमुळे, उतार वयात त्रास होऊ शकतो. शनी वायु तत्त्वीय ग्रह असल्याने, श्रवण शक्ती मंद होते.
🔹प्रथम स्थानात, ही युति, आयुष्य मर्यादित करणारी,
🔹द्वितीयात, अप्रिय वाणी व धनदारिद्र्य, दृष्टिदोष देणारी,
🔹तृतीयात शेजार -बंधू सुखास मारक, बहिरेपणा देणारी,
🔹चतुर्थात मातृसुखास हानिकारक, स्थावरात कोर्ट कचेरीस खर्च करणारी, स्त्री जातक असता, स्तनदुग्धाचा अभाव असणारी, वडिलोपार्जित पण निरुपयोगी स्थावर असणारी,
🔹पंचमात असता शिक्षण व संतान बाबत चिंता निर्माण करणारी,व निम्न स्तरीय व्यक्तीवर प्रेम जडवणारी व प्रेमप्रकरणात अपयश देणारी
🔹 षष्ठस्थानात मातुलसुखास मारक, नातेवाईकां कडून नुकसानकारक, कर्जबाजारीपणा, दीर्घकाळ रेंगाळणारे क्रॉनिक आजार ( साधारणपणे उतार वयात ) देणारी,
🔹 सप्तमात, वैवाहिक सुखास मारक, पुन र्विवाहास उद्युक्त करणारी, वा पुन- र्विवाहाचा जोडीदार मिळण्याची संभावना दर्शवणारी, जोडीदारात जातीभेद, शाखा भेद दर्शवणारी.
🔹 अष्टमात खितपत मरण देणारी, अंतिम समयी विपन्न अवस्था दर्शक.
🔹नवमात वडिलांचे सुखास मारक, यात्रा प्रवासात नुकसान करणारी, स्त्री पत्रिकेसाठी दीर -नणंद /तर पुरुषपत्रिकेसाठी साळा -साळी यांच्या भल्या करिता झळ सोसणारी, वा या नातेवाईकांचे सुख नसणारी.
🔹दशमात, उद्योग धंद्यात अडथळा आणणारी, पितृसुखास हानिकारक,
🔹लाभात मित्र अभाव, वडील भावाचे सुख नसणारी,
🔹 व्ययात अनावश्यक खर्च वाढवणारी, दृष्टिदोष, बहिरेपणा, पायाचे आजार देणारी. अशी सर्व साधारण फळे मिळण्या ची संभावना असते.
💢 मागच्या कुठल्या तरी जन्मात, एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर, त्याच्या प्रेताचे अंत्य संस्कार करण्याची, आपली जबादारी असताना, ती व्यवस्थित पार न पाडणे, प्रेताचे हाल होणे, त्यात कीड पडणे, कोल्हे कुत्र्यांनी प्रेताची विटंबना करणे, यामुळे त्या प्रेताचा शाप लागतो, अशी भावना आहे. हा प्रेतशाप, शनी राहू योगाच्या रूपाने कुंडलीत प्रगट होतो, असे समजले जाते.
💢 मनुष्य जोपावेतो जिवंत आहे तो पर्यंत शत्रुत्व. मनुष्य ज्याक्षणी संपला त्याच क्षणी शत्रुत्व संपलं. म्हणून शत्रुत्व असले तरी, मृत शरीराचा द्वेषातून अपमान करू नका ही आपली संस्कृती आहे. तिची पायमल्ली होता कामा नये, हा संदेश या योगापासून मिळतो.
🔹वर लिहिलेली फळे ही अत्यंत स्थूल व सर्व साधारण स्वरूपाची आहेत. या युत्या ज्या भावात येतात, त्या भावाचे स्वामी जर बलवान असतील, तर यांच्या परिणामात सौम्यता येईल.
🔹खरे म्हणजे केवळ एका भावाचे फळ जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर, केवळ तेवढा भाग पाहून, फलादेश न करता, संपूर्ण कुंडलीच्या प्रत्येक ग्रहाची स्थिती जाणून घेतल्याशिवाय, पत्रिकेचा रोख, स्पष्टपणे कधीच लक्षात येत नाही. हे सर्व सामान्य तत्व आहे.
⭕️ बरेचदा, या क्षेत्रात नवागत असलेले पृच्छक, " माझा मिथुनेचा राहू आहे तो काय फळ देईल ?" वा "माझ्या चतुर्थात शनी आहे त्याचे फळ सांगा ". अशी विचारणा करताना दिसतात .
🔸त्यांनी विचारलेल्या शंकेत, दिलेली माहिती, फारच त्रोटक असते. विचारण्यात आलेला ग्रह, कोणत्या भावांचा स्वामी आहे ?, तो कोणत्या नक्षत्रात आहे ? , त्यासोबत कोण आहे ? , त्यावर कुणाची दृष्टी आहे ? अशा विभिन्न बाबी बघाव्या लागतात. हे सर्व साधारण वाचकाच्या लक्षात येत नाही, व त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे, तो नाराज होतो हा सर्व सामान्य अनुभव आहे. हे मी आता पर्यंतच्या लिखाणात अनुभवलेहि आहे. अशा सर्वाना, खालील उदाहरणाद्वारे, मी, हा मुद्धा, अधिक विस्तृतपणे, स्पष्ट करू इच्छितो.
🔸या बाबत मला हिमनगाचे उदाहरण देणे आवडेल.
⚛️ हिमनग हा पाण्याच्या पृष्ठभागावर, जेवढा आपल्याला दिसतो, त्याच्या आठ पट, तो पाण्या खाली असतो. हा हिमनग, समुदाचे पाण्यावर तरंगत असल्याने, व त्याच्या पाण्याखालील आकाराचा नीट अंदाज न आल्याने, मोठमोठी जहाजे, त्याला ठेचकाळून, मोठमोठे अपघात होतात, अशी ऐकीव माहिती आहे. हिमनगाच्या दृश्यभागाची आपल्याला 9 पटीने कल्पना केल्यास, त्याच्या आकाराची खरी व्याप्ती, लक्षात येऊ शकते. तद्वतच, कुंडलीचे आहे.
केवळ एका ग्रहस्थिती वरून, संपूर्ण फळाची, कधीच पूर्ण कल्पना येणार नाही. म्हणून, त्यासाठी संपूर्ण कुंडली, जन्मादि तपशिलासह, टाकणेच योग्य असते.
🔴 हे वरील विधान जरी खरे असले, तरी " फेस बुक " हे व्यासपीठ सार्वजनिक असल्याने, जर त्यामुळे आपली वैयक्तिक ता बाधित होत असेल, तर आपली शंका जाहीरपणे न विचारता, आपल्या अनुभवी व विश्वासू ज्योतिषा कडून, व्यक्तिगत रित्या, तिचे निराकरण करून घेणे, केव्हाही इष्ट असते. त्याकरिता थोडी पदरमोड झाली तरी चालेल. अस्तु.
🎯 राहू बाबत, एक विशेष योग लक्षात घेणे आवश्यक आहे.
🔸जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्यास, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी बदली हवी असते वा बदलीची भीती असते, तेव्हा त्या काळी वा नजीकच्या काळात, जर राहूचे जातकाच्या दशमस्थानावरून भ्रमण असेल वा दशमेशावरून भ्रमण असेल, तेव्हा बदली होण्याची शक्यता वाढते.
🔸हेच राहूचे भ्रमण, चतुर्थावरून वा चतुर्थेशावरुन होत असता, व्यक्तीच्या निवासस्थानात बदल संभवतो. कार्यस्थळ बदलले कि, बरेचदा, निवास स्थानहि बदलावे लागते, हा विचार, या तत्वामागे असावा असे दिसते.
🔸मूळ कुंडलीत राहू ज्या अंशावर आहे, त्या अंशावरून, वा दशमेश ज्या अंशावर आहे, त्या अंशावरून, राहूचे भ्रमण असल्यास, त्या काळात, बदलीची संभावना वाढते.
🔸एका राशीतून दुसऱ्या राशींत स्थलांतर करताना , राहूचे, शेवटचे 3 महिने, बदली होण्यास, प्रभाव कारी ठरु शकतात.
🔸प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप, कार्यालयाचे बदली संबंधित धोरण, प्रत्येक स्टेशनला कार्यरत असले ल्या कर्मचाऱ्यांची वाढलेली वा घटलेली संख्या, हि स्थिती, ज्याची त्याला, ज्योतिष्यापेक्षाहि, चांगल्या प्रकारे ठाऊक असते. कामात काही घोळ झाल्यास, एका टेबल वरून दुसरीकडे उचलबांगडी होणे, हेहि याच सदरात मोडते. त्यामुळे अवगत असलेल्या परिस्थितीशी सांगड घालून, विचार केल्यास, राहूने निर्देशित केलेला कोणता काळ, बदलीसाठी अधिक प्रबळ ठरेल, याचा स्पष्ट अंदाज येऊन, बदलीचे अनुमान अधिक प्रभावी ठरु शकते.
🔸बदलीसंबंधीचे हे ठोकताळे, बऱ्याच प्रमाणात खरे होतात, हे मी स्वतः अनुभवले आहे.
💢 राहू -हर्षल, राहू -नेपच्यून, राहू -प्लूटो हे सर्व योग, पापग्रहात होत असल्याने, ते परस्परांच्या पाप फळांचे, पोषण करणारेच ठरतात.
💢 वरील सर्व भागात, कथन केलेली सर्व फळे, ही सर्व साधारण स्वरूपाची आहेत. हे पुन्हा एकदा, विशेषत्वाने पुनर्नमूद करतो. कुंडलीतील अन्य ग्रहांची स्थिती, संबंधित भाव व भावेशाची स्थिती यानुसार, फलात कमी अधिक प्रमाणात, बदल होत असतो. त्याकरिता प्रत्यक्ष कुंडली समोर ठेऊन, सर्व ग्रहस्थितीचा, एकत्रित अंदाज घ्यावा लागतो. तेव्हा बरेचसे भाकीत बरोबर येते.
💢 वरील दोष दूर होण्यासाठी, अनेकदा उपाय योजना विचारल्या जातात. व त्या केल्याही जातात. पण शेवटी प्राक्तन हे प्राक्तनच आहे. मात्र उपासनेने मानसिक बल मिळते हे खरे.
🔹राहुचा नवग्रहस्तोत्रातील मंत्र :
अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्यविमर्दनमं !
सिहींकागर्भसंभूतं तं राहूं प्रणमाम्यहम !!
🔸संस्कृत भाषेतील मंत्र जर अशुद्ध भाषेत लिहिल्या गेले, तर त्यांची शुचिता भंग पावते. त्यामुळे सर्व मंत्र जसेच्या तसें, शुद्ध स्वरुपात, मोबाइल वर टाइप करणे शक्य होत नाही.
🔸नवग्रह पिडाहरस्त्रोत्रात पण राहुचा एक मंत्र दिला गेला आहे. क्षेत्रीय पंचांगात याची माहिती उपलब्ध असते.
🔸राहुचा वेदोक्त मंत्र व तंत्रोक्त मंत्र ( जपसंख्या 18 हजार ). याबाबत नजीकच्या विश्वासू व अनुभवी ज्योतिष्याना भेटून, व्यक्तिगत मार्गदर्शन घ्यावे.
🔸नित्य वा दर शनिवारी, राहुस्तोत्राचे व राहू कवचाचे पठण करणे, हाहि उपासनेचा एक भाग आहे.
🔸राहू कृपेसाठी, यथाशक्ती, तीळ तेल, काळे घोंगडे, लोखंडी वस्तू, निळ्या रंगाची वस्त्रे दानयोग्य समजली जातात.
💢 या योगामुळे, शारीरिक व्याधी उत्पन्न झाल्या असता, जसे, मंगळ व राहू मुळे त्वचा विकार, शुक्र राहुमुळे वैवाहिक जीवन दूषित करणाऱ्या व्याधी, तर त्यावर वैद्यकिय उपचारा सारखा दुसरा प्रभावी उपचार नाही. चंद्र राहुमुळे व इतर पापग्रहा मुळे खूप दूषित असेल तर, नैराश्य, मानसिक विकार संभवतात. अर्थात यासाठी सुद्धा, मनोविकार तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक ठरते.
💢 मानसिक विवंचना, भयगंड, मनो गंड, न्यून गंड, मनोबल वाढविल्यानेच कमी होतात. वरील दोष परिहारार्थ, शिव उपासना प्रभावी मानली जाते. भगवान शंकरास अभिषेक, दत्त उपासना पण फलदायी मानली जाते. कुळ -कुलाचार, कुदैवतांची उपासना यासहि महत्व आहेच.
💢 उपासनेबाबत, एकदा असेच चर्चेच्या ओघात, एका अभ्यासकाने दिलेली प्रतिक्रिया, चांगलीच लक्षात राहण्याजोगी आहे.
त्याचे म्हणणे असे कि, कधी -कधी, काही ग्रहयोग अशुभ फळ देण्यास, एवढे ताकदवर असतात कि, त्याच्या शमनार्थ केलेली उपासना, प्रभावहीन ठरते. त्याच्या मताच्या पुष्ट्यर्थ, त्यांनी उदाहरण दिले ते या प्रमाणे :
👉 लहान मुले, बोरीच्या झाडाखाली जाऊन, बोरे वेचतात. तरी पण, अधिक बोरे मिळावीत म्हणून, झाडाच्या फ़ांद्या हलवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी, काही पिकायला आलेली, काही तासांनी जी पडणारच होती, अशीच बोरे पडतात. पण, जी बोरे अगदीच हिरवीगार आहेत, ती काही केल्या, फांदी सोडत नाहीत. उपासनेचेहि , थोडे फार असेच आहे. नशिबात, त्या साध्य होण्या सारख्या असल्या, तरच फलद्रुप होतात, अन्यथा नाही.
त्यांचे हे विधान, व त्याच्या समर्थनार्थ दिलेला दृष्टांत, खरोखर मति गुंग करणारा आहे.
💢 त्यांचे म्हणणे, कदाचित, खरेहि असेल, म्हणून मग, प्रयत्नच करायचे नाहीत कां ?
प्रयत्न अवश्य करावेत, - व तेहि मनोभावे करावेत.
" दैवाधीन आहे जगती, पुत्र मानवाचा ! ".
💢 उपासना मग ती कुठलीहि असो, श्रद्धा, उपासनेचा आत्मा आहे.
// इति शुभम //

Comments
Post a Comment