"अशाने उगाच, बाराच्या भावात जाशील ! "
∆ जेव्हा, आपण कुणाशी तरी बोलतो, तेव्हा, समोरील व्यक्तिस आपल्या बोलण्याचा आशय कितपत कळला, याचा सतत अंदाज घेत असतो. आपण, त्याचा चेहरा वाचत असतो.
∆ जर असे वाटले की, चर्चेचा विषय, ऐकणारास नीट आकलन झाला नाही, तर विषयास अनुसरून, तत्सम, वेगवेगळी उदाहरणे देऊन, तो विषय अधिक सोप्या पध्दतीने, सांगण्याचा प्रयत्न करतो. ही क्रीया इतकी अंगवळणी पडलेली असते, की तो आपला, स्थायी भाव होऊन बसतो. विषयाच्या ओघात ,योग्य वेळी, अनेक समर्पक म्हणी व वाक्प्रचार, आपण लिलया वापरतो.
∆ परंपरेने, कानावर पडत आलेले, अनेक वाक्प्रचार संभाषणात वापरून, विषयाचा आशय व गांभीर्य, समोरील व्यक्तिस पटवून देतो.
∆ अशा वेळी, ब-याचशा म्हणी व वाक्प्रचार, कसे तयार झाले असतील ? असाहि विचार, मनात येतो. त्यात काहींचे उत्तर सापडते, तर काहींचे सापडत नाही. तरी पण, ते वाक्प्रचार आपल्या कडून वापरले जातात.
∆ एखाद्याने चूकून वा हेतुपुरस्सर, एखादे बेकायदेशीर काम केले, किंवा त्याचे हातून झाले व तो मोकळ्या मनाचा, व परिचित असला, तर तो, तसे, आपल्याला सांगतो.
∆ विषयाचे गांभीर्य आपल्या लक्षात आल्यावर, सहजपणे आपली प्रतिक्रिया येते. "अरे! चुकूनहि पुन्हा असे काही करू नकोस. नाहीतर, उगाच " बाराच्या " भावात जाशील."
∆ समजा एखाद्या व्यक्तिने, असेच काहीतरी, बेकायदेशीर काम केले व ते उजेडात आले,व त्यासंबंधी, पोलिसात तक्रारहि नोंदवली गेली. ही सर्व माहीती, त्यानंतर आपणास, जर एखाद्या त्रयस्थाने एैकवली, तर सहज आपले शब्द येतात." काय सांगताय् ? आता त्याचे काही, खरे नाही. गेला तो "बाराच्या भावात." !
∆ ज्यांना ज्योतिष्याची जाण आहे, त्यांना कदाचित् ,या वाक्प्रचाराचा अर्थ वा उगम कळला असेल.
∆ पण सर्वसामान्य लोक, या वाक्प्रचाराचा संबंध, बहूदा, घड्याळाशी जोडतात. कारण दिवसाला, तासांचा, दुपारचे बारा, हा सर्वात मोठा, 2 अंकी आकडा आहे. तसेच, रात्रीचे 12 वाजले, की तारीख बदलते. कालमापनात, एक महत्वाचा बदल होतो. म्हणून,त्या अनुषंगाने, हा वाक्प्रचार असावा, अशी त्यांची धारणा असते.
∆ परंतु या वाक्प्रचाराचा, गर्भितार्थ वेगळाच आहे.
∆ कुंडलीत 12 भाव असतात. मनुष्याच्या शरीरास, जशी बहुविध इंद्रिये असून, ती त्याच्या शरीराचा, अविभाज्य भाग असतात. तसेच, कुंडलीतील विविध भाव, ही कुंडलीची, अविभाज्य अंगे आहेत.
∆ काही शरीर भागांना, आपण लौकीक दृष्टया, फार आदरार्थी संबोधतो. शिर कमल, नेत्रकमल, मुखकमल , करकमल, पदकमल, अशी गौरवपूर्ण बिरूदे ,लावली जातात, तर काही इंद्रीयांना मात्र, असे सौभाग्य नशीबी नसते. म्हणून त्यांचे कार्य महत्वाचे नाही काय ? तद्वतच, कुंडलीच्या 12 भावांपैकी 6,8,12 या त्रिक व नकारात्मक भावांचे आहे. हे भाव अशुभ असले तरी, मनुष्य जीवनावर, ते आपला प्रभाव दाखवतातच. यापासून कुणाचीही सुटका नसते.
∆ जन्म कुंडलीतील 6,8 व 12 या तीन अनिष्ट भावांपैकी, कुंडलीचा " बारावा " भाव, हा व्ययभाव आहे. तो परदेशगमन, मोक्ष या दोन धनात्मक बाबी वगळता, सजा, दंड, बदनामी, दुर्लौकीक, खर्च, कारावास अशी ऋणात्मक फले, देणारा आहे.
∆ "बाराचा भाव", म्हणजे आपण ,जाणता-अजाणता, कुंडलीच्या बाराव्या स्थानाचा, उल्लेख करतो. त्यावरून, " आता तुझी बदनामी होईल, तुझे कँरीअर बर्बाद होईल, तुला सजा होईल वा दंड होईल, तुझा दुर्लौकीक होईल, "असेच आपल्याला सुचवायचे असते. मग भलेहि, आपल्याला, ज्योतिष्य शास्त्र व कुंडलीची माहीती, ओळख, असो वा नसो.
∆ त्यामुळे कुठल्याहि शुभ भावाचा स्वामी, जर बाराव्या भावात गेला वा बाराव्या भावाचा स्वामी, कुठल्याहि अन्य भावात गेला, तर व्यय भावाच्या गुणधर्माप्रमाणे, तो संबंधित भावफलात, उणीव निर्माण करतो.
∆ असा हा,व्ययभावाच्या महिम्यावर आधारित "बाराचा भाव" हा शब्दप्रयोग आहे. या वाक्प्रचारा चा उगम, ज्योतिष्य शास्त्र ज्यांना अनभिज्ञ आहे, अशा वाचकांना, निश्र्चितच, विस्मयकारक वाटल्या शिवाय, राहणार नाही .
∆ या अनुषंगाने, प्रत्येक भावाचा स्वामी, बाराव्या भावात गेला तर फळे मिळतील हे आता पाहू.
∆ प्रथम भावस्वामी, व्ययात असता, जातक सहसा कंजूष असतो. तो कुटुंबातील इतर सदस्यांवर, खर्च करील पण स्वत:साठी, मितव्ययी राहील.त्याला लोकोपयोगी कामे करण्याची, हौस असेल व तो त्यात खूप परिश्रम करून, कष्टी होईल. चूकून, स्वत:स त्रास होईल व फायदा काहीच होणार नाही, अशा कामात, शक्ति खर्च करेल. त्याने घेतलेले निर्णय, बरेचदा, चुकण्याची शक्यता असते. सोप्या शब्दात, या प्रकारात,"स्वत:च्या हाताने स्वत: च्या पायावर दगड पाडून घेणे" असेहि म्हणता येईल. प्रकृतीचीहि रड असू शकते. पापग्रहासह क्रूर नक्षत्री, वा दृष्टीत असल्यास, "बंधनयोग" निर्माण होतो.
∆ आता बंधनयोग म्हणजे काय, हेहि समजून घेणे, इथे महत्वाचे ठरते. थोडक्यात, बंधनयोग म्हणजे, विशिष्ट कालावधीसाठी, "स्थानबद्ध होणे", मग ते रूग्णालयात भरती होणे असो, वा कारावास असो.
∆ आयुष्याच्या दृष्टीनेहि, लग्नेश व्ययात असणे, चांगले समजले जात नाही.
∆ संतति प्राप्तीच्या दृष्टीनेहि, हा योग ऋणात्मक फले देऊ शकतो. अर्थात् एवढ्यावरून, तसे नक्की निदान, करू नये. इतरहि ग्रहस्थितीचा, याबाबत असहकार असेल, तरच, हे लागू होईल. व संततिचे बाबतीत, तर पती व पत्नी, दोघांच्याहि कुंडल्या, विचारात घेणे, आवश्यक असते.
∆ लग्नेश व्ययात असता, परदेश गमनासाठी, अनुकूल समजला जातो. परदेश गमना साठी, इतर योगांची पूरक अनुकूलता असल्यास, निश्र्चितता वाढते.
∆ कुठल्याहि बाबतीत, कुठल्याहि, फक्त एका ग्रहस्थिती वरून, निर्णायक निदान करू नये. इतर संबंधित ग्रहांकडून, भावांकडून, त्या निदानासाठी, दुजोरा प्राप्त झाल्यास, तसे निदान करावे, असा शास्त्र संकेत आहे, हे,नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. जेवढी, दुजो-यांची संख्या जास्त, तेवढी, तसे घडण्याची शक्यता, अधिक असते.
∆ द्वितिय स्थान, हे धनस्थान व वाणीस्थान असल्याने, जर या स्थानाचा स्वामी, बाराव्या भावात स्थित असेल, तर वाजवी वा अवाजवी कारणासाठी, खूप पैसा खर्च होऊ शकतो. बँक बँलन्स रोडावतो. मोठे आर्थिक व्यवहार, अंगलट येऊ शकतात. जामीन राहणेहि, नुकसानकारक ठरू शकते. हीच अवस्था, व्यक्तिच्या वाणीची असते. नको तिथे,-नको ते बोलणे, कटूवचन, अघळपघळ बोलणे, बेजबाबदार वक्तव्य करणे, व त्यामुळे बदनामी होणे, असे परिणाम जाणवू लागतात.
∆ धनेश अशा स्थितीत असता, नवपरिणित मुलींनी, सासरी, खूप मोजून- मापून बोलावे अन्यथा, "तोंडाळ", "वाचाळ", अशी बहूविध विशेषणे, अल्पावधितच, पदरी पडण्याची शक्यता असते. "शस्त्राने होणारी जखम तरी लवकर भरून येईल पण, शब्दाने मनावर होणारे घाव, कधीहि, लवकर भरून येत नाहीत." असे म्हणतात ते याच साठी. यामुळे, हळूहळू मने कलुषित होऊन, इतर ग्रहस्थिती प्रतिकुल असता, संसारात तेढ निर्माण होते. म्हणून, यास कौटुंबिक सुखाचा नाश करणारे, "स्लो पाँयझन" म्हटले, तरी वावगे होणार नाही.
∆ तृतिय भाव, हा धाकट्या भावंडांचे सुख, शेजारधर्माचे सुख, आपला छंद, पराक्रम, व अल्प कालीन प्रवासाचे सुख दर्शवणारा असल्याने, तृतिय भावाचा स्वामी, बाराव्या भावात असल्यास, धाकट्या भावंडांकडून, सुख मिळेलच असे नाही. त्यांच्यासाठी खस्ता खाव्या लागतात. बरेचदा त्यांनी, याची जाणीव न ठेवल्यास, निराशा पदरी येऊ शकते. उपजिविकेसाठी, कष्ट सोसावे लागतात. मित्र अल्प असून , जवळचे नातेवाईक, यांच्याशी फार सलोख्याचे संबंध नसतात.
∆ बदली निमित्त, आपण कुठेहि रहावयास गेलो, तरी तेथील शेजारी आपल्याशी, सातत्याने, चांगले वागतीलच, असे नाही. त्यामुळे, फार घरोबा ठेऊ नये व संबंधहि, खराब होऊ देऊ नये, अशी खबरदारी घेणे, केव्हाहि चांगले. आपले गृह छिद्र इतरांस सांगू नये, हे संतवचन, तर याबाबतीत, कटाक्षाने पाळले पाहिजे.
∆ तृतीय भाव, हा कान व हात यांचे, प्रतिनिधित्व करीत असल्याने, तृतिये़श व्ययात असल्यास, हातास इजा होणे, डाव्या डोळ्यास अपघात, वा शल्यक्रिया होणे, मध्यम वयानंतर डाव्या कानाने, कमी ऐकावयास येणे, अशा व्याधी जडू शकतात. संस्काराचा अभाव असल्यास, चौर्यकर्माचीहि, प्रवृत्ती असू शकते. छंद व पराक्रमाचे, हे विकृत स्वरूप आहे, असे म्हणता येईल.
∆ तृतिय स्थान, हे छोट्या- मोठ्या प्रवासासंबंधी असल्याने, व व्ययभावहि, लांब पल्ल्याच्या प्रवासासंबंधी असल्याने, व एका प्रवासस्थानाचा स्वामी, दुस-या प्रवासस्थानात आल्याने, परदेश गमनासाठी मात्र, हा योग, पोषक समजला जातो.
∆ चतुर्थाचा स्वामी, जर व्ययभावात असेल तर, स्थावर मालमत्तेच्या दृष्टीने, अडथळे येण्याची शक्यता असते. जन्मगावी, फारसा विकास होत नाही. शेती व्यवसायात, फारशी प्रगति होत नाही. जन्म गावापासून दूर, राहण्याचे प्रसंग येऊ शकतात. आध्यात्मिक क्षेत्रातील प्रगतीस, मात्र हा योग चांगला समजावा.
∆ पंचमेश व्ययात असता, संतति सुखासाठी, चांगला समजला जात नाही. संततिशी, मतभेद असू शकतात. शिक्षणातहि वेळ अधिक लागणे, पैसा खर्च होणे, वा शिक्षणासाठी, परदेश गमन होणे संभवते. क्वचित काळी, दुर्व्यसनापायी, खर्च संभवतो.
∆ कष्टस्थानाचा स्वामी, जर व्ययभावात असेल, तर कष्टेशाच्या, कारकत्वासंबंधित आजारावर, जातकाचा खर्च होतो. पादरोग, नेत्ररोगाची, वा दृष्टीदोषाचीहि संभावना असते. तो कर्जबाजारी होतो. शत्रुंपासून होणारे त्रास, वाढतात. मातुल सुखास, हा योग, उणीव निर्माण करतो.
∆ विवाहाचा स्वामी, जर बाराव्या भावात असेल तर, विवाहास वेळ लागेल, क्वचित , लांब अंतराचे, सासर मिळेल. विवाह ठरवतांना, काही गोंधळ होऊन, विवाह लांबणीवर पडणे, वैवाहिक सुख, मनासारखे न मिळणे, अशी फले मिळतात. विवाह विषयात, काही कारणाने बदनामीहि, संभवते. हा योग पाप प्रभावित असता, विवाहाचे "बारा" वाजण्याची शक्यता असते.
∆ व्ययस्थान हे मोक्षस्थानहि असल्याने, संन्यस्त वृत्ती असणा-या जातकास, संसारा पासून अलिप्त राहून, जन कल्याणासाठी, जीवनयापन करता येते.
∆ इतर योगांचे पाठबळ असता, असा जातक, विवाहानंतर परदेश गमन करू शकतो.
∆ अष्टमेश, व्ययस्थानी असता, आयुष्याचे दृष्टीने चांगले समजले जात नाही. कुमार्गाने, धन मिळण्या ची संभावना असते. जीवनात, संघर्षाची वाढ होते. आरोग्यविषयक, तक्रारींचा सामना करावा लागतो. खर्च अतोनात वाढतो. प्रांपंचिक, अडचणी वाढतात. व्यक्ति कर्जबाजारी होऊ शकते.
∆ नवमेश व्ययात असता, आध्यात्मिक क्षेत्रात गति येते, लोककल्याणकारी कामात, रूचि असते. पण त्यातून आर्थिक फायद्यापेक्षा, झळ लागण्याचीच शक्यता, अधिक असते. तीर्थयात्रां साठी हा योग उत्तम समजला जातो. भाग्य स्थान हे प्रवासविषयक स्थान असल्याने, एका प्रवासस्थानाचा स्वामी, दुस-या प्रवासस्थानात जाणे, हे प्रवास योगास पोषक ठरते. धार्मिक भावनेतून, बहूतांशी, हा प्रवासयोग येण्याची, शक्यता असते.
∆ दशमेश व्ययस्थानी असता, उद्योग धंद्यात, सहसा लवकर प्रगति होत नाही. नोकरीत त्रास व कटकटी वाढतात. क्वचित्, योग्यतेपेक्षा खालच्या श्रेणीची, नोकरी करावी लागते. कामाचे जागी, अफरातफर झाल्यास, त्यात गुंतून, बदनामीहि होऊ शकते. गुप्त शत्रूकडून, व्यवसायात अडचणी निर्माण होतात. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना, मात्र हा योग दिलासा देणारा ठरतो. लोक कल्याणकारी, धर्मादाय संस्था, यात नोकरी करणारांना, मात्र सुखकारक ठरतो. शुभग्रह, शुभप्रभावात असल्यास, उद्योगधंद्यानिमित्त, परदेश प्रवास होऊ शकतात.
∆ लाभेश व्ययात असता, खर्चावर नियंत्रण, रहात नाही.बरेचदा, चांगल्या कामातहि खूप खर्च होतो. नातेवाईकांसाठीहि खर्च करावा लागतो. वडील भावापासून, सुख मिळत नाही. मित्राकडून हि, फसवणूक होऊ शकते. अशा जातकाने, जामीन राहतांना, या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे.
∆ हा खर्चाचा भाव असल्याने, अनपेक्षित धनव्यय होतो. मित्रांकडून विश्वासघात झाल्याने, अडचणी निर्माण होऊ शकतात. व्ययेश व्ययात असता, तो जर उच्च राशीस असेल, तर व्यक्ति परोपकारी असते. शुभग्रहासवे असता, दानधर्म, सेवा, यात्रा होतात. त्यागी वृत्ती असते. पापग्रहामुळे, व्यसनाधीन होऊन, चैन, दुर्व्यसन,मुर्खपणामुळे खर्च होऊ शकतो. पायाचे रोग, व नेत्रविकार होऊ शकतात. पापग्रहापासून, काकांचे सुख मिळत नाही.
∆ लेखाच्या प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे, हा नुसता धांवता आढावा आहे. वरील सर्व फले, ही स्थूल मानाने, सांगितली आहेत. यासंबंधीचा ग्रह, हा मूलत: पापग्रह आहे, कां शुभग्रह आहे ? संबंधित लग्नास, तो कारक आहे, कि अकारक आहे ? तो किती अंशावर आहे ? कोणत्या नक्षत्रात आहे ? त्यासह, कोण आहे? त्यावर, कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे ? नवमांश कुंडलीत, त्याची स्थिती काय आहे.? अशा विविध बाबी, पहाव्या लागतात. व त्यानंतर, संभावित फलीत, ठरवायचे असते.
∆ सारांश, असे म्हणता येईल कि, बारावा भाव, हा अशुभ भाव असल्याने, त्याची फलनिष्पत्ती, त्रासदायकच असते.
∆ म्हणूनच, आपण म्हणतो,
" असे काही करशील तर उगाच बाराच्या भावात जाशील! "
🔼 वरील लेखातील माझे विचार माझे वाचन, अनुभव व मनन शक्तीवर आधारित आहेत.
ते आपणा सर्वाना अवगत व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच आहे.
🎯 लेख आवडल्यास तसे, " कॉमेंट्स बॉक्स " मध्ये कळवावे. म्हणजे मला अधिक लिहिण्यास उत्तेजन लाभेल. 🙏🌺🌺🌺
Comments
Post a Comment