ध्येयवेड्या व्यक्तीचे ग्रहयोग

 

  


           

▪️ ज्या व्यक्तींनी,  आपल्या कार्यात काही अभूतपूर्व यश मिळवले आहे,  अशा व्यक्तींच्या, जीवन चरित्राचे वाचन करीत असताना,  त्यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी किती कष्ट केले ? , ध्येयपूर्तीचा त्यांनी कसा ध्यास घेतला ?,  त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला ?,  त्यातूनहि,  यशस्वीपणे ते आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचले ?  या सर्व बाबी,  आपल्याला प्रेरणादायी ठरतात व आपल्याला प्रेरणा मिळावी,  या उद्देशानेच ही व्यक्तीचरित्रे, प्रकाशित केली जातात.

▪️ ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून,  अशा व्यक्तींच्या कुंडल्या  जमविल्यास, त्यातून काही ठळक निष्कर्ष निघू शकतात. 
▪️कोणत्या ग्रह स्थितीमुळे,  त्यांच्यामध्ये ही जिद्द निर्माण झाली ?  कोणत्या योगामुळे,  ते यशाच्या शिखरावर आरूढ झाले ?  त्यांना कीर्ती,  गौरव,  मान -सन्मान,  कोणत्या ग्रह स्थितीमुळे प्राप्त झाला ?  हे पाहणे, फार उत्कंठावर्धक असते.

▪️ ग्रहानुसार पहायचे झाल्यास,

▪️ लग्नी जेव्हा हर्षल असतो,  तेव्हा व्यक्ती संशोधक विचाराची,  जुन्या रूढी परंपरेस,  आधुनिक दृष्टीने पाहून,  त्यात सकारात्मक बदल करण्याची वृत्ती असणारी,  आपले स्वतंत्र वैशिष्ट्य जपणारी,  व ध्येयवेडी  असू शकते.

▪️बुद्धिमत्तेचा बाबतीत,  बुधापेक्षा हर्षल वरचढ ठरतो. मात्र हा हर्षल,  एकटा असावा वा कुठल्याहि  कुदृष्टीत नसावा.

▪️या ग्रहास, गुरु सारख्या शुभ ग्रहाची  साथ असल्यास,  परिणाम शुभदायी मिळतात. असे जातक,  अध्यात्मिक क्षेत्रात,  टोकाची उंची गाठू शकतात.

▪️कुंडलीत बुध -मंगळ युतीयोग,  प्रतियोग असता,  व्यक्ती हट्टी,  दुराग्रही असते. आपले इप्सित साध्य करण्यासाठी,  जिवापाड परिश्रम करते. या योगात बुधाच्या बुद्धीला, मंगळाच्या साहसाची जोड मिळते. आपली तत्वे ती सोडत नाहीत. " दृढ निर्धार " हा या योगाचा कणा आहे.  मात्र या योगाचा उपयोग,  विधायक कार्यासाठी असल्यास, अत्यंत यशदायी असतो .

▪️ हा योग दुधारी आहे.

▪️ कारण बुध -मंगळ हे परस्पर शत्रू आहेत. त्यामुळे बुधास,  मंगळ या पाप ग्रहाची, अतिरिक्त शक्ती मिळून,  बुद्धी भ्रष्ट होऊन, अवैधानिक,  अनैतिक कार्यें हि  होऊ शकतात.

▪️कुंडलीतील इतर ग्रहांच्या  स्थिती प्रमाणे, सात्विकता बलवान असल्यास,  हे आदर्श देशभक्तहि  होऊ शकतात.

▪️महात्मा गांधींच्या कुंडलीतील मंगळ-बुध युती, अहिंसेच्या मार्गाने,  इंग्रजांचा,  किती प्रभावीपणे प्रतिकार करणारी होती,  हे प्रकर्षाने लक्षात येते.



▪️पण याच  युतीला,  अनैतिकतेचे अधिष्ठान असल्यास,  अतिरेकी व्यक्तिमत्व सुद्धा निर्माण होऊ शकते.

▪️या योगाचा विचार करताना,  नैतिकता-  अनैतिकता या दृष्टीने, कुंडलीचा बाज ओळखणे,  फार  आवश्यक असते.

▪️राजकारणी,  साधु -संत यांच्या कुंडल्या पाहता,  बऱ्याच कुंडल्या,  कर्क लग्नाच्या सापडतात. कर्क लग्न अतिशय भावनाप्रधान, संवेदनशील व हळवे असल्याने, याबाबत अधिक फलदायी ठरते. साधु-संत यांच्या कुंडलीत,  कर्क लग्नाखालोखाल, मीन लग्न व धनु लग्नहि,  बऱ्याच प्रमाणात दिसते. याचा अर्थ,  इतर लग्नावर, साधु-संत निर्माण होत नाहीत, असे मुळीच नाही.

▪️कुंडलीत स्व -उच्च- मित्र -राशीचे गुरू महाराज, धर्म त्रिकोणात असता,  आपला प्रभाव दाखवल्याशिवाय राहत नाहीत.

▪️ कारण धर्म त्रिकोणात, तसेहि शुभ ग्रह असता, व्यक्तीचा कल,  स्वतःच्या चारित्र्याचा विकास करण्याकडे असतो. सर्व समाजातून,  आपला आदर व्हावा,  अशी उपजत वृत्ती  असते . त्याच बरोबर अध्यात्मिक व पारलौकिक क्षेत्रात,  जात्याच  रुची निर्माण झालेली असते. त्या विषयातील,  सखोल ज्ञान मिळवून,  ते उच्च कोटीला पोहोचतात.

▪️ या क्षेत्रातील त्यांचे यश, धर्म त्रिकोणातील शुभ ग्रहांची  राशीगत स्थिती, व  कुंडलीतील इतर ग्रहांच्या,  वकुबाप्रमाणे ठरते.

▪️ गुरु, -नेपच्यून,  नवपंचम योग असता,  अभूतपूर्व यश मिळते. आध्यात्मिक क्षेत्रासाठी हा योग,  प्रथम क्रमांकावर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

▪️या संदर्भात, एक उदाहरण नमूद केल्याशिवाय रहावत नाही.

▪️प. पू. सुधांशु यशपाल महाराजांची, त्यांच्या  एका कार्यक्रमात, औपचारिक  ओळख देताना, असे सांगण्यात आले की, महाराजांच्या बालपणी, त्यांच्या मातोश्रीने, त्यांची कुंडली, कुणा  ज्योतिष्यास दाखविली होती. त्यावेळेस, ग्रहमानाचा अंदाज म्हणून, " हे साधू होतील ",  असे त्याने भाकीत केले होते. 
मायेपोटी, त्यांच्या मातोश्रीने,  ते  लहान असतानाच , मी भविष्यात दाढी वाढवणार नाही, भगवे वस्त्र धारण करणार नाही,  असे वचन दिल्याचे सांगितले गेले. आजहि  अध्यात्म क्षेत्रात ते  जीवन-यापन करीत आहेत. परंतु आईस दिलेल्या वचनाचे अखंड बंधन पाळून. त्या कुंडली पहाणाऱ्या  ज्योतिष्याचा, अभ्यास किती दांडगा असावा, याची प्रचिती, या उदाहरणावरून येते. 
   
▪️ केतू, अध्यात्माचा कारक असल्यामुळे, साधुसंतांच्या कुंडलीत त्यासहि  विशेष महत्त्व आहे.

▪️ जनकल्याण, संस्कृती प्रचार,  धर्मप्रसार, मार्गदर्शन, या कार्यासाठी,  साधुसंतांनी स्वतः ला, वाहून घेतलेले असल्यामुळे,  गुरु तर बलवान हवाच, पण त्याचबरोबर,  साहित्य निर्मिती करणारा,  प्रतिपादन शैलीचा कारक बुध,  हाहि  बलवान हवा.

▪️तृतीयेश तृतीयात असता, कामाची चिकाटी चांगली असते. मग ते कोणतेहि  असो. 

▪️लग्नेश -नवमेश यासंबंधित,  एक तरी राजयोग हवा. कारण धर्मसत्ता,  ही पण एक सत्ताच आहे. जनसामान्य,  या धार्मिक सत्तेपुढे,  नतमस्तक होतात.

▪️ स्वराशीच्या व उच्च राशीच्या,  शुभ स्थितीतील, नेतृत्व कारक मंगळामुळे,  निर्माण होणारा, " कुलदीपक योग " हा व्यक्तीस प्रसिद्ध होण्यास,  पोषक योग आहे. या योगामुळे व्यक्ती,  कुळाचे नाव अजरामर करते . या योगामुळे व्यक्तीचे जे क्षेत्र असेल, त्या क्षेत्रात,  ती खूप मोठा नावलौकिक कमविले. उदा. सैन्यात असता, खूप मोठ्या पदावर जाईल. खेळाडू असता, कीर्ती व यश. कलाकार असता अभूतपूर्व यश, नृत्यांगना असता, व्यायाम -योगपटू असता, असे कुठलेही क्षेत्र असो,  भरपूर यश देणारा हा योग आहे. 

▪️परंतु हा मंगळ शुद्ध हवा. हा मंगळ अशुद्ध स्थितीत असल्यास,  विशेषतः शनीने दूषित असल्यास, यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचल्यानंतरहि,  मदांध सत्तेमुळे,  काही प्रमाद घडून, व्यक्तित्व लयास जाऊ शकते.

▪️साधू -संतांच्या कुंडलीत, सप्तम स्थान,  हे सहसा बलहीन  असते. बरेचदा सप्तमेश, व्ययस्थानात दिसतो. सप्तमेश व्ययात असला,  की तो,  स्वतःच्या शत्रु स्थानी  असल्याने,  व्यक्ती संसारात अडकत नाही.

▪️सप्तम स्थान, हे रजोगुणाचे स्थान आहे. त्यामुळे सात्विक गुणाला ते मानवत नाही. विवाह संस्कार वा  सप्तम स्थान,  हे शुद्ध पितृऋण फेडण्याच्या उद्देशाने,  केवळ संतान निर्मिती साठी आहे, एवढा  सीमित अर्थहि ,  त्यांच्या दृष्टिकोनातून असू शकतो.

▪️व्ययस्थान हे सजा,  दंड,  बदनामी अपकीर्ती यांचे स्थान असले तरी,  मोक्ष व परलोक गमन,  ही दोन धनात्मक फले त्यापासून मिळतात. 
▪️व्यय व भाग्यस्थानातील शुभ ग्रह, सुकीर्तीकारक असतात.

▪️व्ययस्थान हे मोक्ष त्रिकोणातील महत्वाचे स्थान असल्याने,  सप्तमेश व्ययात असता, मोक्ष- जनकल्याणासाठी,  स्वतःच्या,  ऐहिक सुखाचा त्याग केला,  संसारी जीवन,  परमार्था  वाहिले,  असाहि अर्थ,  इथे अभिप्रेत होतो .

▪️पारमार्थिक बैठकीची कुंडली असली की, देवगणी, देवगुरु, गुरूला जेवढे महत्व आहे. तेवढाच,रजोगुणी असुरगुरू  शुक्र,  गौण ठरतो.

▪️शुक्र -गुरु तुल्यबल असता, दुपदरी व्यक्तिमत्व असण्याची,  शक्यता नाकारता येत नाही. 

▪️ चंद्र शनी युती योग,  "वीष योग" म्हटला तरी, शनि कर्मप्रधान, विरक्त ग्रह असल्याने,  साधू संन्याशांचे कुंडलीत,  हा योग, आध्यात्मिक बैठकीस पोषक ठरतो.
शनी चंद्र युति, पण वैराग्य देते. असे जातक,  लौकिक सुखात रमत नाहीत. वा मोहमयी सांसारिक जीवनात,  काहि वाईट अनुभव आल्यानेहि ,  विरक्ती निर्माण होऊ शकते.

▪️आपण कुंडली पहा,  किंवा नका पाहू. ग्रहस्थिती प्रमाणेच, जीवनयात्रा मार्गक्रमण करेल, यात संशय नाही. कुंडलीच्या अंदाजामुळे,  मनुष्य,  जीवनातील  शुभाशुभ फळे  भोगण्या साठी सावध होतो, एवढे मात्र, निश्चित खरे आहे.

▪️विरक्ती कारक ग्रह,  अतिशय सबल असता,  कुठल्याही मोहात,  हे अडकत नाहीत. " कुछ पानेके लिए कुछ खोना पडता है ! "  ही उक्ती यांच्याबाबत  तंतोतंत लागू होते. 

▪️ किंवा आपले जीवन,  हे सर्वसामान्य माणसाप्रमाणे नाही,  आपल्याला जीवनात,  काही तरी आगळे-वेगळे ,  भव्य -दिव्य, ध्येय पूर्ण करण्याचे आहे , असा  संकल्पहि  काही वेळेस दिसतो. " स्वप्ने रात्री नकोत,  दिवसा पहा " हे याच अर्थाने म्हटले जाते.  असे ध्येयप्रेरित  जातक,  संसारात राहून,  कमल पत्रावरील जलबिंदू प्रमाणे,  स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व,  सदैव कायम ठेवतात. " दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए ! " अशा म्हणींचा उगम,  अश्या ध्येयवेड्या जातकामुळेच झाला आहे.

▪️ यापैकी जेवढे योग कुंडलीत विद्यमान असतील , तेवढी कुंडली,  बलवान म्हटली पाहिजे.
  
▪️ व्यक्तिचे भाग्य,  त्याच्या कर्मानी उजळते. " बीना चमत्कार, नहीं  नमस्कार  !" असे म्हणतात,  ते याच अर्थाने. 

▪️वरील प्रमाणे विशिष्ट उददेश पूर्तीसाठी, जीवन न्योछावर करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील काही  ग्रहयोगाचे, स्थूलमानाने वर्णन करता येईल. अशा योगामुळेच, त्यांचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.

                



Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली