" चंद्र नभीचा मनी अवतरे "
❇️ ज्योतिष शास्त्रात रविला ग्रहमंडळातील राजपद बहाल केले गेले आहे. तर चंद्रास प्रधान मानले आहे. रवि व चंद्र हे ग्रहमंडळातील प्रमुख ग्रह आहेत, म्हणूनच कि काय ? आठवड्यातील वाराच्या नामाभिधानात, रवीचा प्रथम व तदनंतर, चंद्राचा वार येतो.
❇️ चंद्राच्या या महत्वामुळेच जन्मकुंडली नंतर, लगेच चंद्रकुंडली मांडण्यात येते. जन्मस्थित चंद्रास, कुंडलीच्या प्रथम स्थानी घेऊन बाकी ग्रहांची राशीनुसार मांडणी करून, चंद्रकुंडली मांडली जाते. यावरून व्यक्तीच्या जीवनात चंद्र या ग्रहाचे किती महत्व आहे हे लक्षात येईल.
❇️ मनुष्य म्हणजे एक शरीररुपी रथ असून, मन हे त्याचे सारथी आहे. शरीराच्या सर्व क्रिया, मनाप्रमाणे चालतात. जसे शरीर दृश्यमान आहे, तसे मन दृश्यमान नाही पण, त्याच्या अनुभूतीतून, त्याचे अस्तित्व जाणवते.
🔺थोडक्यात, शरीर हे वाहन असून, मन हे त्याचे चालक आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. 🔺आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी, याबाबत खूप सखोल अभ्यास करून, ज्योतिष्य शास्त्रास समृद्ध केले आहे.
🔺चंद्र या ग्रहाच्या वैशिष्ट्यात व मनाच्या गुणधर्मात, कमालीचे साधर्म्य आहे.
❇️ चंद्र हा सर्वात गतिशील ग्रह आहे, जो केवळ सव्वा दोन दिवसात, एक राशीं पार करतो, जी राशीं पार करायला शनी महाराजांना, अडीच वर्षे लागतात यावरून, चंद्राच्या गतीची कल्पना येते. मानवी मनाचेही तसेच आहे. हल्ली मनात कुठला विचार चालू असेल, तर काही वेळाने, अगदी वेगळा, वेगळ्या ठिकाणचा, विचार करीत असेल. ऑफिस मध्ये काम करणारी महिला, दुसऱ्याच क्षणी, घरी मुले काय करत असतील ?, असा विचार करत असेल. ऑफिस ते घर, 30 किलोमीटर अंतर असले तरी, मन मात्र एका क्षणात पोहोचते, ही मनाच्या गतीची किमया आहे.
❇️ चेहरा हा मनाचा आरसा आहे. एखाद्याचा चेहरा पाहून, आपण "आज काहीतरी बिनसले आहे " वा, "आज नक्कीच काहीतरी खास आनंदाचे आहे कारण, स्वारी आज खुश आहे " असे अंदाज करतो, ते कधी चुकतात कां ? सहसा नाही.
त्याच्या या गुणामुळेच त्याला, सुंदरतेचा कारक मानले आहे. चंद्र कोठल्या राशीत आहे, व कशा स्थितीत आहे, यावरून जातकाच्या मनस्थितीचा व सौदर्याचा, अदमास घेतला जातो.
🔺या बाबत काव्यशास्त्र व ज्योतिष शास्त्र यात कमालीचे एकमत दिसते. कारण स्त्रीच्या सौन्दर्याचे वर्णन करताना, चंद्राइतकी सुंदर उपमा, कवींना सहसा सापडत नाही " चौदहवी का चांद हो ", " चांदसी मेहबुबा हो तू मेरी " अशा प्रकारची सिनेगीते याची बोलकी उदाहरणे आहेत.
❇️ म्हणजे मन हे चंचल आहे, ते सतत वेगवेगळ्या भावनांप्रमाणे बदलत असतें. व त्याचा प्रभाव, मनुष्याच्या चेहऱ्यावर व गतिविधींवर, होतांना दिसतो.
अशीच चंचलता, चंद्रातहि आहे. चंद्राच्या कला, नेहमी बदलत असतात. पूर्ण स्वरूपात दृश्यमान , सर्व सृष्टीत आल्हाददायक वातावरण निर्मिती करणारा पौर्णिमेचा चंद्र, दिवसें दिवस कले -कलेने घटून, अमावास्येला मात्र, दर्शन देण्यास राजी नसतो. त्याच्या या अनुपस्थितीने, रात्रभर, काजळी अंधाराचे साम्राज्य असतें.
🔺चंद्र प्रकाशाचे महात्म्य स्पष्ट करणारा "कोजागिरी पौणिमा " हा सण आपण आनंदाने दर वर्षी साजरा करतो, तो याच उद्देशाने.
🔺अर्थातच अमावस्या ही, एक खगोलीय घटना असली तरी, या अंधाऱ्या रात्रीचा मानवी मनावर, नकारात्मक प्रभाव पडतोच . या तत्वाच्या आधारानेच अमावास्येला, अशुभ काल मानण्या ची, संकल्पना निर्माण झाली असावी.
❇️ ज्योतिष्य शास्त्राच्या धारणेनुसार, चंद्र हा ग्रहमंडळातील जलग्रह आहे. ज्या आकाराच्या भांड्यात जल भरले, त्या भांड्याचा आकार, त्याला प्राप्त होतो. भांड्यानुसार आकार बदलतो. हा अस्थिरतेचा गुण, चंद्रातही आढळतो.
त्यामुळेच कुंडलीत, चंद्राला अति भावनाशील व संवेदनक्षम मानल्याने, चंद्र जर शुभस्थानी, शुभस्थितीत असेल, तर ती व्यक्ती मनाने निष्कपट, आनंदी, दयाळू, मायाळू, व प्रसन्न व्यक्तिमत्वाची आढळते.
याउलट, पापग्रहांच्या सानिध्यात व अशुभ स्थानी, अशुभ राशीत असलेला चंद्र, मानसिक स्थितीवर, विपरीत परिणाम करणारा ठरतो.
निसर्ग कुंडलीत, चंद्र हा चतुर्थ स्थानाचा स्वामी असल्याने, व चतुर्थ भाग हा हृदयाचा असल्याने, चंद्राला चतुर्थ स्थानाचा, कारक ग्रह म्हणतात.
🔺कर्क राशीं चंद्राची स्वराशी असून, वृषभ राशीत तो उच्चराशीं मानल्या जातो, तर वृश्चिक ही चंद्राची नीचराशी आहे. मकर राशीतील चंद्र, निर्बली मानल्या जातो.
❇️ मुख्य ग्रहांमध्ये चंद्र व रवि यांना फक्त एकेक राशीं, व इतर ग्रहांना मात्र, दोन दोन राशीं, अशी बारा राशींची विभागणी आहे. ही विभागणी, ग्रहांच्या कारकत्वाची व्याप्ती पाहून, केली गेली असावी. या वरूनहि रवि व चंद्राचे, ग्रहमंडळातील महत्व, स्पष्ट होते.
❇️ चंद्रबल पाहण्याचा अजून एक वेगळा प्रकारहि आहे. शुक्ल प्रतिपदा ते दशमी, चंद्रबल मध्यम, दशमी ते कृष्ण पंचमी पावेतो चंद्र बलवान, व त्यानंतर अमावास्ये पावेतो चंद्रबल नाही, असे समजण्यात येते.
❇️ चतुर्थ स्थानात, जर शुभचन्द्र असेल, तर त्या व्यक्तीस मातृसुख, वास्तुसुख , वाहनसुख उत्तम लाभते. अशा व्यक्तीचे घर, सहसा खोलगट भागात, नदी वा जलाशयाजवळ, असतें. घरात बालमंडळींचा किलबिलाट, व पाहुण्यांची बऱ्यापैकी वर्दळ असतें. कदाचित मायाळू अंतःकरणाने, आदरातिथ्य करण्याच्या वृत्तीचा, हा परिणाम असू शकेल.
❇️ स्थूलमानाने असेहि म्हणता येईल कि, चंद्राबरोबर, जसजसे पापग्रह वाढत जातात तसतसा, त्या त्या प्रमाणात, चंद्र अधिक दूषित होत जातो. या बाबतीत चंद्र अतिशय संवेदनशील ग्रह असल्याने, जनमानसावर त्याचे परिणाम, ताबडतोब दिसतात.
❇️ कुंडलीत जर चंद्राच्या 6, 8, 12, स्थानी पापग्रह असले, तर तेही अशुभ समजले जाते.
🔺अशी स्थिती असताना, कधी काळी, अशी परिस्थिती उत्पन्न होऊ शकते कि, व्यवसायात घट येते, नोकरीत अडचणी येतात. संभाव्य योजनांचे आराखडे चुकतात. आकस्मिक, परिस्थितीत नकारात्मक बदल होतो, अडचणी वाढतात. संकटे आवाक्या बाहेरची असल्याने, त्यावर काही उपाय सापडत नाहीत. संकटाच्या कात्रीत अडकल्या सारखी, जातकाची स्थिती होते. मानसिक दुविधा निर्माण होते.
❇️ कामभावना हा विवाहसंस्थेचा पाया असला तरी, त्यावर मानसिक सुखाची इमारत, उभी करावयाची असल्याने, विवाह ठरवताना, चंद्रास अधिक महत्व दिले गेले आहे. 🔺आपण जे जन्मनक्षत्र, गणदोष, नाडीदोष, षडाष्टक दोष, राशिकूट आदी विचार करतो, तो सर्व वधू वराच्या चंद्राच्या स्थितीवर, आधारित असतो. 🔺अंकीय गुणमेलन, याच आधारावर केले जाते. कारण पतीपत्नीचे स्वभावमेलन जर व्यवस्थित झाले, तरच संसार शेवटास जाणारा, व आनंदायी होतो, अशी त्यामागे संकल्पना आहे.🔺ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या महादशा -अंतर्दशा या जन्म कुंडलीतील चंद्र आधारेच काढल्या जातात.
🎯 पण, केवळ अंकीय गुणमेलनावर विसंबून न राहता, इतरहि ग्रहस्थिती डोळसपणे पाहणे, हे खूप आवश्यक आहे. अन्यथा फसवणूक होण्याचीच शक्यता अधिक असतें.
🔺 अनुभवांती असे दिसते कि, बरेचदा, हे लक्षात घेतले जात नाही व त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होतात. हा विषय, इथे अनाठायी वाटत असला, तरी असंगत मात्र निश्चित नाही. कारण, वैवाहिक सुखाच्या दृष्टीने, हा मुद्दा फार महत्वाचा आहे, व तो नेमका दुर्लक्षित होताना दिसतो, ही खंत त्यामागे आहे.
❇️ चंद्राच्या प्रभावामुळे, समुद्राच्या भरती- ओहोटीवर परिणाम होतो. हे सार्वत्रिक सत्य आहे. समुद्राचे पाणी खारट असतें. यामुळे चंद्रास, प्रवाही पदार्थाचा कारक मानले आहे. 🔺मध्यंतरी गृहिणी स्वयंपाकगृहात, जर काही तळण काढत असतील, तर तळणास लागणारे तेल, हें कमी लागेल कि जास्त, हें तळण समयी, सागरास भरती आहे कि, ओहोटी, यावरून ठरवता येते, असे वाचनात आले आहे. चंद्राच्या स्थितीचा एवढा दूरगामी परिणाम असू शकतो, ही विस्मयाची बाब आहे. 🔺 समुद्रातून प्राप्त होणारे मीठ, सागरी उत्पादने, चंद्राच्या अधिपत्यात येतात. सागरातून प्राप्त होणाऱ्या मोत्यास, तर " चंद्ररत्न " म्हणून, मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. चंद्रप्रकाशकिरणे ही धवलकांतीची असल्याकारणाने , दूध, तांदूळ, कापड, कापूस अश्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू, चंद्राच्या अखत्यारीत येतात.
🔺 मानवी शरीरातील रक्तातहि मीठाचा अंश असल्याने, चंद्राच्या दैनंदिन स्थितीप्रमाणे, रक्तप्रवाहावर सूक्ष्मतम परिणाम होतो. वेड, फेफरे आदि विकार चंद्राधिष्ठीत असल्याने, अमावस्या- पौर्णिमा या दिवशी, मनोरोगी व्यक्तीत, लक्षणीय बदल आढळून येतात.
❇️ चंद्राचा आराध्य वृक्ष " खिरणी "असल्याने, खिरणी मुळीचा उपयोग चंद्रकृपेसाठी करतात.
❇️ चंद्र हा इतर ग्रहांच्या तुलनेत, अल्प काळात, राशीभ्रमण करीत असल्याने, अल्प कालीन सर्व प्रकारचे आजार, जसे ताप, अपचन, सर्दी पडसे, खोकला, हे चंद्राच्या अधिपत्यात येतात. चंद्र, प्रवाही पदार्थाचा कारक असल्याने, शरीरात असणा-या वेगवेगळया ग्रंथीतून होणारे स्त्राव, हे चंद्राच्या अंमलाखाली येतात. चंद्र, अन्नाच्या चयापचयाचाहि कारक आहे.
❇️ हाच चंद्र, जर षष्ठ वा अष्टम स्थानी असला तर " बालारिष्ट " योग निर्माण करतो. या योगामुळे, बालकाची, वयाचे 6 ते 8 वर्षापर्यंत, तब्येतीची तक्रार असते. या कालावधीनंतर, हा योग निष्प्रभ होतो.
❇️ चंद्र मंगळ युतियोगामुळे, व्यक्तीस गोवर, कांजण्या, विषमज्वराची बाधा होते. क्रूर नक्षत्री व अंशात्मक असता, " डेंग्यू " झाल्याची एक दोन उदाहरणे, पाहण्यात आली आहेत. हा पण विषाणूजन्य आजारच आहे. या योगास "लक्ष्मी योग " हि म्हटले गेले आहे. हा योग धनदाता आहे.
❇️ स्त्री जातकाचे बाबतीत चंद्र व जन्मस्थ मंगळाचा, गोचरीने भ्रमणसंबंध येतो, त्या काळात रजोदर्शन होते. चंद्र हा जन्मस्थ मंगळाशी युति, दृष्टी -प्रतियोग करील वा मंगळ जन्मस्थ चंद्राशी तसें योग करील किंवा चंद्र मंगळ भ्रमणाने तसें योग येतील. तेव्हा स्त्री जातकास रजोदर्शन होते. तात्पर्य चंद्र प्रवाही पदार्थाचा व मंगळ रक्ताचा कारक आहे हा या योगाचा आत्मा आहे.
🔺ज्या स्त्रीच्या कुंडलीत, चंद्र- मंगळ युति असतें, तिला मासिक पाळीचा त्रास असतो.चंद्र शुक्र युति असताहि , ही पीडा असतें. 🔺चंद्र - मंगळ युति- दृष्टी योगामुळे, चेहऱ्यावर, काही खुणा, तीळ असू शकतात. वा चेहरा मुरमाड असू शकतो. चेहेऱ्याची स्किन, सफरचंद -टोमॅटोच्या स्किन सारखी नितळ, चमकदार नसून, संत्रा-मोसंबीच्या स्किनसारखी, थोडी खडबडीत असतें. असे असले तरी, व्यक्तीच्या सौन्दर्यात, बाधा येत नाही.
चंद्र-मंगळ योगामुळे जातक, इलेक्ट्रिकल, इलेट्रॉनिक्स विषयाचा, अभ्यासू असू शकतो.
🔺चंद्रावर गुरुदृष्टी असता, दाम्पत्यात, काही काळ विरहाची संभावना असतें, वा साखरपुडा व विवाह यात, बरेच कालांतर असू शकते. क्वचित काळी, परस्पर पसंती होऊनहि, काही कारणा स्तव, त्यास मूर्त स्वरूप येत नाही.
❇️ चंद्र हा स्त्री ग्रह आहे. त्यामुळे, जीवनात येणाऱ्या चार प्रमुख स्त्रिया, सर्वप्रथम आई, नंतर बहीण, त्यानंतर पत्नी व शेवटी मुलगी, यांच्यापासून मिळणाऱ्या सुखाबाबत, चंद्राच्या स्थितिचा विचार महत्वाचा ठरतो. 🔺चंद्र जर दूषित असेल तर याबाबत काहीतरी कमतरता, अनुभवास येण्याची शक्यता असतें. 🔺याच भूमिकेतून, विवाह लवकर होईल कि उशिरा,याबद्दल अनुमान करतांना चंद्राचा विचार करतात.🔺ज्यांच्या कुंडलीत हा योग असतो, त्यांना बरेचदा बहीण नसते वा सर्व पुत्रच असतात, असेहि अनुभवास आलेले आहे.
❇️ चंद्राच्या साडेसाती बद्दल माहिती नाही, अशी व्यक्ती शोधूनहि सापडणार नाही. शनी व चंद्र, हे परस्पर शत्रूग्रह असल्याने, साडेसातीत, जातकाची परीक्षा असतें. मानसिक विवंचना वाढतात. त्यांना धैर्याने सामोरे जाणे, हीच खरी परीक्षा असल्याने, जातक या काळात, तावून सुलाखून निघतो.
🔺ज्याचे कुंडलीत, मुळात हे ग्रह, परस्पर युती वा दृष्टियोगात असतात, अशा जातकांना, अधिक त्रास जाणवण्याची संभावना असते. 🔺शनी चंद्र युति योगास " वीषयोग " वा " पुनरफू " योग म्हटले जाते. 🔺हा मुद्दा अधिक स्पष्ट करून सांगता येईल. प्लंबर कडे असा एक पाना असतो कि, त्याची फिरकी फिरवून, ऍडजेस्ट केल्यावर, तो कोणत्याही आकाराच्या, नटास लागू होतो. म्हणजे, एकच पाना, बरेच ठिकाणी कामाला येतो.
🔺चंद्र -शनी योगाचेहि तसेच आहे. कुठल्याहि क्षेत्रात, आपणास, शत -प्रतिशत समाधान मिळू दयायचे नाही, अशी या योगाची महती आहे. असा योग असलेला जातक नेहमी हेच सांगतो कि, "कधीहि एक प्रयत्न करून, माझे काम होतंच नाही. अनेकदा, प्रयत्न केल्यानंतर, प्रयत्नांच्या तुलनेत यश, समाधान कारक मिळत नाही ". 🔺"समाधान होत नाही, तें मानावे लागते "., 🔺 हा अनुभव, जर प्रत्येक कामात असेल तर, विवाह, ही त्या अनेक बाबीपैकी एक बाब आहे. यावरून, या योगाची व्याप्ती किती मोठी आहे, हें लक्षांत येईल. ज्यांच्या पत्रिकेत असा योग आहे, त्यांनी हतबल न होता, आपले मनोधैर्य वाढवावे. सहिष्णुता ठेवावी., हें ओघाने सांगणे आलेच.
❇️ रवि व चंद्राचे बाबतीत, घडणारी एक महत्वाची खगोलीय घटना, म्हणजे " ग्रहण " होय.🔺कुंडलीत रवि व राहू, चंद्र व राहू युति असता, ग्रहणयोग होतो.🔺 चंद्र मनाचा कारक असल्याने, अशा जातकाची द्विधा मनस्थिती असतें. 🔺चंद्र फारच दूषित असता, मानसिक विकाराची संभावना असतें. 🔺खग्रास ग्रहणे, या बाबत, अधिक त्रासदायक असू शकतात.
🔺मतिमंद मुलांच्या 1/2 कुडंल्यात, त्यांचा खग्रास ग्रहणकाळात, जन्म झालेला पहाण्यात आहे.
🔺गर्भार स्त्रीस, ग्रहणकाळात, विशेष पथ्य पाळण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामागे, जन्मास येणाऱ्या बाळात, काही व्यंग येऊ नये, ही सतर्कता असतें.
❇️ एखादी व्यक्ती घराबाहेर निघून गेली, तर ती केव्हा परत येईल, हल्ली सुरक्षित आहे कि नाही ? प्रवासात आहे कि, कुठे मुक्कामी आहे ? ती केव्हा परत येईल, हा सर्व विचार करण्यासाठी, जेव्हा प्रश्नकुंडली मांडली जाते, तेव्हा चंद्र कुठे आहे व त्याचे भ्रमण, पाहण्यात येते.
❇️ स्थूलमानाने, चंद्र प्रथम स्थानी असता-, चेहरा गोल व सुंदर देतो. 🔺द्वितीयात -मृदुभाषी, गोड खाण्याची प्रवृत्ती, 🔺तृतीयात- प्रवासाची आवड व पाठीवर बहीण देतो. 🔺चतुर्थात चंद्र काय फळे देतो हे याच लेखात यापूर्वी नमूद केले आहेच. 🔺पंचमात- विषयलोलुपता, व कन्यासंतती देण्याकडे कल, 🔺षष्ठात- पोटाचे आजार व मानसिक त्रास, 🔺सप्तमात -सुंदर पत्नी, व विलासी स्वभाव, 🔺अष्टमात- आकस्मिक धन, व बऱ्याचशा चिंता, 🔺नवमात- दिगंत कीर्ती व जलप्रवासाचे योग, 🔺दशमात- जनसंपर्किय नोकरीं,🔺 लाभात,- उत्तम मित्र -परिवार, विशेषतः स्त्री वर्गाकडून सहकार्य, 🔺व्ययात,- जलपर्यटन, होण्याची संभावना असतें.

❇️ अमावस्या काळी रवि चंद्राची युति, तर पौर्णिमेस, प्रतियोग होतो. अमावास्येस रवि चंद्र एकाच भावात आल्याने ते शुभ भावात, शुभ दृष्टीत आल्यास, दोघेही उत्तम फळे देतात याउलट, अशुभ भावी, अशुभ स्थितीत असता, दोघाच्याही फळाची हानी होते म्हणून, अमावास्येचा जन्म चांगला समजला जात नसावा .🔺बाहेरगावी जाताना, चोरांपासून बचाव करण्यासाठी, घरातला ऐवज, गृहिणी, एका डब्यात कधीच ठेवत नाही. वेगवेगळ्या डब्यात ठेवतात. उद्धेश हा कि, चोरी झाली तरी, सर्व डबोले, चोराच्या हाती लागू नये. अमावस्येला एकत्र येणारे रवि -चंद्र म्हणजे, एका डब्यात ठेवले जाणारे, "डबोले "होय.
❇️ चंद्र -हर्शल योग, जातकास तिरसट व एककल्ली, विक्षिप्त स्वभाव देतो.
❇️ चंद्र -नेपच्युन योगात, व्यक्ती अतिसंवेदन शील होते. शुल्लक गोष्टीचा, मनावर खोल परिणाम होतो. हें लोक खूप हळवे असतात वा यांचा मानसिक गोंधळ होतो. या योगात, व्यसनाधीनता येऊ शकते.
🔺या व्यतिरिक्त, चंद्र ग्रहास केंद्रवर्ती मानून, बरेचसे विशेष योग, ज्योतिष शास्त्रात सांगितले आहेत. त्यात, गजकेसरी योग, केमद्रुम योग, चंद्राधि योग, महाभाग्य योग, असे विविध योग, सांगता येतील.
❇️ जेव्हा, फार मोठ्या स्तरावर, काही समाज विघातक व विध्वंसक कारवाया होताना आढळतात , तत्समयी, जर गोचरीने चंद्राचा, शनी -मंगळ -हर्षलशी संबंध असेल, तर चंद्र हा प्रजेचा -जनसंख्येचा, कारक असल्याने, बऱ्याच प्रमाणात, जनसमुदाय आहत होतो, जीवितहानी होण्याची संभावना असतें.
== असा हा बहुआयामी चंद्र आहे.
💢 ज्योतिषप्रेमी, व सर्व सामान्य वाचक, यांना सोयीचे व्हावे म्हणून, वाचन व अनुभवावर आधारित, चंद्राबद्दल माहिती देण्याचा, अल्प प्रयत्न केला आहे.
💢 ही माहिती ज्योतिषप्रेमी वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी नम्र अपेक्षा करतो.
🎯 लेख आवडल्यास तसे, " कॉमेंट्स बॉक्स " मध्ये कळवावे. म्हणजे मला अधिक लिहिण्यास उत्तेजन लाभेल. 🙏🌺🌺🌺
सुंदर लिखाण, शैली छान. अभिनंदन!!
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🌺
ReplyDelete