जन्मकुंडली व चार पुरुषार्थ
जन्मकुंडली व चार पुरुषार्थ
🔆 जन्म कुंडली म्हणजे काय ?
कुंडलीचे स्वरूप सांगताना, कुंडली म्हणजे, आपल्या जन्माच्या वेळी, ग्रहांची असलेली आकाशस्थ स्थिती, दर्शवणारा नकाशा होय. असे सीमित शब्दात वर्णन केल्या जाते. व जेव्हा आपण कुंडलीचा अभ्यास करावयास लागतो, तेव्हा या 12 भाव, 12 ग्रह, 12 राशीं, व त्यात अंतर्भूत असलेली 27 नक्षत्रे, यातून विविध छटा तयार होताना दिसतात.
🔆 जसे एखाद्या रत्नास पैलू पाडले असता, त्यातून प्रकाश किरणे परावर्तित होऊन, वेगवेगळ्या छटा निर्माण होतात. तसेच कुंडलीच्या माध्यमातून, भावी जीवनातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील, चढ- उतारांचा, आपल्याला आभास व्हावयास लागतो. व जसजशी, आपली अभ्यासात गती वाढत जाते, तसतसे आयुष्यातील भावी घटनांचे अंदाज, अधिक स्पष्ट होत जातात. व कुंडली ही केवळ एक चौकोन नसून, कुंडली म्हणजे " गागरमें सागर है !" असे म्हणावे लागते .
🔆 धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत, हे मंदिरातील कथा- कीर्तनांत, प्रवचनात, ऐकलेले असते पण ते कुंडलीतहि दडलेले असतील , अशी नवशिक्या ज्योतिष्यास तरी सुतराम कल्पना नसते.
जेव्हा कुणीतरी मार्गदर्शक, कुंडलीच्या माध्यमातून, याचा परिचय करून देतो वा वाचना तून हे कळते, तेव्हा अभ्यासकास विचाराचे नवे दालन, खुले होते.

🔆 कुंडलीत 12 भाव असतात. कुंडली चित्रात सर्वात वर, मध्यभागी असणारा प्रथम भाव, हा मुख्य कुंडलीचा अग्रभाव असून, तो जातकाचे प्रतिनिधित्व करणारा असतो. या भावात विद्यमान असलेली राशीं, व त्या स्थानी असलेले ग्रह यांच्या गुणधर्माप्रमाणे, त्या जातकाचे व्यक्तीमत्व बनते. धर्म -अर्थ -काम -मोक्ष या चार पुरुषार्थाचा, कुंडली आधारे विचार करावयाचा झाल्यास, प्रथम भाव हा धर्म स्थानाचे द्योतक ठरतो. त्यानंतर घड्याळा च्या उलट्या दिशेने दुसऱ्या क्रमांकावर येणारे धनस्थान, हे अर्थस्थान ठरते. पुढील तिसरे स्थान, हे काम त्रिकोणात समावेश होणारे स्थान असून, चतुर्थ स्थान हे मोक्ष त्रिकोणाचा भाग ठरते.
पुन्हा याच क्रमाने 5 वे स्थान धर्म, 6 वे अर्थ, 7 वे काम, 8 वे मोक्ष, 9 वे पुन्हा धर्म, 10 वे अर्थ, 11वे काम, तर शेवटचे 12 वे मोक्ष स्थान म्हणून गणले जाते.
🔆 अशा प्रकारे 12 भावांपैकी 1-5-9 हे भाव, धर्मत्रिकोणाचे भाव, 2-6-10, हे अर्थत्रिकोणाचे भाव, 3-7-11, हे काम त्रिकोणाचे भाव, तर 4-8-12 हे मोक्ष त्रिकोणाचे भाव समजण्यात येतात.
🔆 वरील पुरुषार्थाचे विवेचन नीट समजण्यासाठी, थोडी मूलभूत माहिती सांगणे अगत्याचे ठरते. जसा कुंडलीत नवपंचम योग, हा सर्वात शुभ समजला जातो तसेच, हे एकेका त्रिकोणातील भाव हे त्याच त्रिकोणातील अन्य भावास पूरक समजले जातात. थोडक्यात एकमेकांच्या त्रिकोणस्थानात असलेले ग्रह, परस्परां चे, तात्कालिक का होईना, पण मित्र असतात. त्रिकोणातील ग्रह, एकमेकांशी नवपंचम योग करतात. व त्यामुळे जातकाच्या पत्रिकेत, किती नव पंचम योग आहेत, त्या योगाच्या संख्येवरुन पत्रिकेचा, दर्जा ठरवण्याची पद्धत आहे.
🔆 1-5-9 स्थानापासून धर्म त्रिकोण बनतो. या त्रिकोणात जर राशीं बली, भावबली, ग्रह असतील तर हा त्रिकोण, बलवान झाला, असे समजण्यात येते. त्यातून, जर यात गुरु महाराजांचा समावेश असला, तर हा त्रिकोण, सर्वात समृद्ध मानला जातो. कारण गुरु महाराजांना, 5-7-9 या दृष्टी प्राप्त आहेत . ते 1-5-9, यापैकी कोणत्याहि भावात असले, तरी त्याची दृष्टी, धर्म त्रिकोणातील अन्य स्थानावर पडते. व गुरुदृष्टी, ही "अमृतदृष्टी "असल्याने, धर्मस्थानातल्या फळांची, वृद्धी होते. धर्मत्रिकोण बलवान असला, कि जातकाचे जीवन, चारित्र्य प्रधान असते.
🔅आपल्या व्यक्तित्वाचा कसा विकास होईल ? याकडे, त्याचे विशेष लक्ष असते.समाजात माझा मानसन्मान कसा होईल ? मला आदर कसा मिळेल ? मला नावलौकिक कसा मिळेल ? याकडे जातकाचे विशेष लक्ष असते. यांच्या दृष्टीत पैशाला दुय्यम महत्व असते. चारित्र्य महत्वाचे असते. त्यामुळे धर्म त्रिकोण बलवान असला, कि व्यक्ती समाज वंदनीय होते. समाजविघातक कामे, सहसा अशा व्यक्तीकडून होत नाहीत. ही व्यक्ती स्वचरित्र्यास जपणारी असते. त्यामुळे यशाची व समाधानाची प्राप्ती होते.
🔆 यानंतर दुसरा त्रिकोण- अर्थ त्रिकोण, हा 2, 6, 10 या तीन भावांपासून, तयार होतो. या तीन स्थानात, जर बलवान ग्रह असले, तर जीवनात आर्थिक भरभराटच असते. व्यक्तीच्या जीवनात, पैशास अग्रगण्य महत्व असते. आर्थिक कमाई, हेच त्याच्या जीवनाचे प्रमुख ध्येय असू शकते. या तीन स्थानांपैकी, कुठल्याहि स्थानात गुरु महाराज असल्यास, पुन्हा त्याच्या 5, 7, 9 या दृष्टीचा जातकास लाभ होऊन, तिन्ही स्थाने लाभान्वित होतात. त्यात जर गुरु अंशात्मक बलवान असेल, शुभ भावस्वामी असेल, नवांश बली असेल तेवढी, फलात वृद्धी होईल. या किमये- मुळेच गुरु ग्रहास, दोन तृतीयांश पत्रिकेस शुभत्व आणून देणारा ग्रह, असे म्हटले आहे.
🔅यानंतर 3, 7, 11 या तीन भावा- मिळून होणारा त्रिकोण, म्हणजे काम त्रिकोण होय. या तीन स्थानातील ग्रह बलवान असता, व्यक्तीचे जीवन कामप्रधान असू शकते. भौतिक सुखो- पभोगाची साधने, त्यास लीलया प्राप्त होतात. जातक रसिक स्वभावाचा, रजोगुणी, भोगवादी असू शकतो. ऐहिक सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
🔅पुढील त्रिकोण, हा मोक्ष त्रिकोण असून, हा 4, 8, 12 या भावापासून तयार होतो. या भावातील ग्रह बलवान असता, या त्रिकोणाच्या नामाभिधाना प्रमाणे, व्यक्ती, पारलौकिक सुखाची अपेक्षा करणारी असते. त्यामुळे याच्या स्वभावात वैराग्य वृत्ती, शांतता, गांभीर्य, अध्यात्माची आवड, व त्या क्षेत्रातील साधना, अशा विविध सन्यस्त वृत्तीस पोषक छटा, पाहावयास मिळतात. भौतिक सुखाची आसक्ती तशी कमीच असते. शनी, गुरु केतू, नेपच्यून अशा ग्रहांची, या त्रिकोणा तील उपस्थिती, हे गुण अधिक ठळकपणे दर्शवू शकेल.
🔅अभ्यासार्थ, सर्व प्रथम पत्रिका हातात घेतली असता, व हे चारही त्रिकोण अभ्यासले असता, व्यक्तीच्या स्वभाव- धर्माची, बरीचशी कल्पना येऊ शकते. जी पुढील फलितासाठी उपयुक्त ठरते.
🔼 वरील लेखातील माझे विचार माझे वाचन, अनुभव व मनन शक्तीवर आधारित आहेत.
ते आपणा सर्वाना अवगत व्हावे, यासाठी हा लेखन प्रपंच आहे.
⚛️ हा लेख " ग्रहनक्षत्र ज्योतिषांक " -दिवाळी 2020, संपादक :श्री. दर्शनजीं शुक्ला या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे.
🎯 लेख आवडल्यास तसे, " कॉमेंट्स बॉक्स " मध्ये कळवावे. म्हणजे मला अधिक लिहिण्यास उत्तेजन लाभेल. 🙏🌺🌺🌺
Comments
Post a Comment