ज्योतिष्य अभ्यासक कसा असावा ?
ज्योतिष्य अभ्यासक कसा असावा ?
( हा लेख, ज्योतिष्य क्षेत्रातील, नवोदितांसाठी आहे )
∆ ज्योतिष्य हे " गूढ शास्त्र " मानले गेले आहे. गूढ शास्त्रात, अजूनहि बरीच शास्त्रे, अंतर्भूत होतात. पण अतिशय सात्विकवृत्ती, परोपकार , जन कल्याणाची भावना तीव्र असून, जर दैवात योग असतील, तरच या शास्त्रात रूचि निर्माण होते. तसे असल्यास,योग्यमार्गदर्शनहि सहजासहजी उपलब्ध होते. स्वभावतः जागृत झालेली उत्कंठा, जिद्द, चिकाटी, ज्ञानपिपासा या सर्ववृत्ती, मदतगार ठरतात. हे सर्व नशीबात असते, तेव्हाच घडते अन्यथा, ज्योतिष्याची पुस्तके घरात असून सुध्दा, धूळ खात पडतात. वा पुस्तक हाती घेतल्यावर,5 मिनिटात निद्रास्थिती प्राप्त होते.
∆ " शास्त्र " व " शस्त्र " या दोन शब्दात ,एका मात्रेचा फरक असला तरी, हे परस्पर संबंधित आहेत. थोडक्यात, शस्त्र कसे धारण करावे ?, त्यात निपुणता कशी प्राप्त करावी ?, त्याचा वापर कुठे व कसा करावा ? , त्यास अद्यावत कसे ठेवावे ? या संबंधीचे, पूर्णज्ञान ,म्हणजे शास्त्र म्हणता येईल. पिढ्यानपिढ्या, हे ज्ञान अंमलात आणून ,त्याची उपयोगिता सिध्द केली जाते तेव्हा, ते सर्वांग परिपूर्ण, शास्त्र मानले जाते. या अर्थाने ज्योतिष्य शास्त्र हे "शास्त्र" मानले जाते. कुठलीहि विद्या वा कला, हे शस्त्र असते, जे आपल्याला प्राप्त होताच, सामर्थ्य वान करते.
∆ मानवाच्या विकासात, जसजशी भर पडत जाते, तसतशी प्रत्येक शास्त्रातहि, नवनवीन सिध्दांतांची भर पडते. व ते स्विकारले हि जातात. या शास्त्रात मात्र, तेवढे सहजासहजी होत नाही, असेच म्हणावे लागेल. तरीहि, दिवसें दिवस या वटवृक्षाच्या शाखा, जोमाने पल्लवित होऊन, आपले सौंदर्य खुलवित आहेत.
∆ अर्थात,कोणतेहि शस्त्र वा विद्या, धारण करण्यास, अनुकूल पात्रता असावी लागते. तरच त्यात प्रगती होते.
∆ अशा व्यक्तिंना गुरूकडून,ज्ञानाचा व जनकल्याणा चा, रविकडून ज्ञानसत्तेचा, चंद्राकडून जन संपर्कानुकूल व कनवाळू वृत्तीचा, बुधाकडून उत्तम भाषा, संवादकौशल्य व प्रतिपादन क्षमतेचा, मंगळाकडून गणिते मांडण्याचा, शनीकडून चिकाटी व लोकाश्रयाचा, हर्षलकडून संशोधक वृत्तीचा, तर नेपच्यूनकडून दैवी संकेत प्राप्त करण्या-या अतिंद्रिय शक्तिचा लाभ होतो.
∆ जवळपास सर्व ग्रह, पत्रिकेतील त्यांच्या स्थानानुसार, व आपापल्या ताकदीनुसार, आपल्या वर कृपादृष्टी ठेवतात. ग्रहांची कृपा, त्यांनी उत्पन्न केलेली प्रेरणा व आपले प्रगाढ परिश्रम, हे यशाला गवसणी घालणारे ठरू शकतात.
∆ जर आपल्या जन्म पत्रिकेत, धर्मत्रिकोणात, शुभ ग्रह बलवान असतील तर, अशा वृत्तीस, ते फार पोषक असते. तसेच, पत्रिकेत एखादा राजयोग असता, या क्षेत्रात यश मिळून, समाजात मान्यता मिळते.
∆ आजच्या संगणकीय युगात नवीन तंत्रज्ञानाची, या विषयास पोषक, अशी सोय झाली आहे. ज्ञानाच्या कक्षा, रूंदावल्या आहेत.
गुरू-शिष्य परंपरेने ,प्राप्त होणारे ज्ञान, प्रगत शहरातील आधुनिक क्लासेस व परिक्षेच्या माध्यमाने, अधिक सोयीचे झाले आहे. पण प्रत्येक गावागावातून, ही सोय उपलब्ध असेलच, असे नाही. तरीहि " एकलव्य " श्रध्दाभाव पध्दतीने, " ग्रंथ हेच गुरू " मानून, अनेक जिज्ञासू , यात प्रगति करू शकतात. फेसबुक वरील अनेक समूह, यू ट्यूब वरील या विषयाचे कार्यक्रम, व त्यांचे सूत्रधार, यात मोलाची भर घालत आहेत. आदरणीय ज्योतिष्य भास्कर, डाँ. ज्योती रविंद्र जोशी, यांनी तर " मोफत आँन लाईन कोर्स " प्रणाली आरंभ करून, ज्ञानदानाचे नवे दालन, सर्वांसाठी खुले केले आहे. घराघरात ,सहजसुलभ रितीने पोहचणा-या, या ज्ञानगंगेचा उल्लेख न करणे, विषय कृतघ्नता ठरेल. " इच्छा तेथे मार्ग " हे एक, अनुभवातून उदयास आलेले, अनमोल सुभाषित आहे.
💢अभ्यासात (1) पुस्तक संग्रह : खूप महत्वाचा आहे. नामांकित ज्योतिष्यांची पुस्तके, आपल्या संग्रहात सदैव असावी. पुस्तके, शांतपणे, वाटेल तेव्हा, वाटेल तशी, वाचली जातात. संगणकावर साफ्टवेयर मधून पुस्तके वाचणे, त्यामानाने अवघड असते.
∆ हिंदी पुस्तके, किमतीच्या मानाने, मराठीपेक्षा जरी स्वस्त वाटत असली, तरी मराठी पुस्तकांना ,अधिक प्राधान्य दिल्यास, विषय समजायला सोपे जाते.
∆ कोणतेहि पुस्तक, भलेही " संपूर्ण ज्योतिष्य शास्त्र " नावाने असले, तरी संपूर्ण माहिती, एका पुस्तकात, सामावणे शक्य नाही. तसेच, कोणतेहि पुस्तक, टाकाऊ नसते. काही ना काही तरी, त्यातून माहीती मिळतेच . जसजसा व्यासंग वाढत जातो, तसतशी पुस्तकांची संख्या, वाढत जाते.
▪️30/40 पुस्तकांचा संग्रह झाल्याशिवाय, समाधान लाभत नाही. पुस्तकांची निवड करतांना, माहीतगार व्यक्तीकडून ,सल्ला घेणे, अधिक हितावह असते.
▪️ज्या पुस्तकात ज्योतिषीय तत्वे सांगितली आहेत, त्यात जर प्रसंगानुरूप, उदाहरणादाखल, काही कुंडल्याचे विवेचन केले असेल, तर ती पुस्तके, मार्गदर्शक म्हणून, फार महत्वाची असतात.
▪️वाचन करतांना ,महत्वाचे मुद्दे, अधोरेखित करणे, फार महत्वाचे असते.पुस्तक वाचनात आढळणारी त्रुटी अशी कि, काही शंका आल्यास आपण पुस्तकास प्रश्न विचारू शकत नाही. अशा अडचणी लक्षात ठेवाव्यात व आपल्या परिचित, तज्ञ व्यक्तीकडून ,शंका निरसन करून घ्याव्यात. असा गुंता कधीतरी सुटतोच.
∆ (2) पंचांग संग्रह करणे :
▪️साँफ्टवेअर पासून, कमी श्रमात कुंडली ,जरी प्राप्त होत असली तरी ,ज्योतिष्याने प्रतिवर्षीचे पंचांग ,आपल्या संग्रही ठेवलेच पाहिजे. त्याच्या उपयोगीतेबाबत " पंचांग महती व माहीती " या माझ्या ,पूर्वीच्या लेखात, वर्णन आले आहेच. कमीत कमी, मागील 60-70 वर्षांचा, पंचागांचा, संग्रह असावा.
∆ (3) कुंडलीसंग्रह : प्रत्येकाने, आपण पाहिलेल्या कुंडल्याचा, संग्रह करावा. त्या व्यक्तीच्या, जीवनातील घडामोडींचा, ग्रह योगाद्वारे, प्रत्यय आल्यास, तशा संक्षिप्त नोंदी ठेवाव्यात. कुंडल्याचा, लग्नवार संग्रह केल्यास, पुनर्लोकना साठी फार फायद्याचे ठरते. वाचनात आलेले योग, अशा कुंडल्यातून आढळल्यास, ते सुलभपणे मनावर रूजतात. घोकंपट्टीचा संबंधच येत नाही म्हणून, वाचन व कुंडली अवलोकन, हे सोबतच करणे ,अधिक चांगले.
∆ नामांकीत व्यक्ति, सिने कलावंत, राजकारणी, संत महात्मे, प्रसिध्द खेळाडू यांच्या कुंडल्या ,पण खूप महत्वाच्या ठरतात. कारण त्यांच्या जीवनातील, ब-याचशा घडामोडी, प्रसार माध्यमातून ,माहीत झालेल्या असतात. प्रदीर्घ अनुभव झाल्यानंतर, कुंडली संख्या 5-6 हजारापर्यंत ,पोहोचू शकते.
शाळा-महाविद्यालयातून ,जसा काळजीपूर्वक अभ्यास केला जातो ,त्या एकाग्रतेने समर्पण केल्यास, साधारणपणे ,किमान 3 वर्षे तरी, या साधनेसाठी आवश्यक वाटतात. व्यक्तीपरत्वे, या अंदाजात, फरक पडू शकतो.
∆(4) कात्रण संग्रह : बरेचदा वर्तमानपत्रात, काही कुंडल्याचे ज्योतिष्यिय परिभाषेतून परिक्षण येते वा या विषयावरची माहीती येते ,ती जर ,आपल्याला नावीन्यपूर्ण वाटत असेल, तर नुसते वाचून न थांबता, अशा कात्रणांची, चिकट वही करावी. यासाठी , वापरलेले रजिष्टर, अधिक सोयीचे असते. सांभाळून ठेवलेली कात्रणे, मधूनमधून वाचण्या सारखी असतात.
∆ कुठल्याहि प्रशिक्षण वर्गात, विषय ,एकदा समजाऊन सांगितला जातो व त्यासंबंधी उदाहरणहि दिले जाते. पण ते अंगवळणी पडण्यासाठी, सतत तशा प्रकारच्या, कुंडल्या पहाण्याचा, सराव ठेवावा लागतो.
अन्यथा ,कालांतराने ,विसर पडण्याची शक्यता असते. परिक्षा उत्तीर्ण झाले -प्रमाणपत्र मिळाले म्हणून, एवढ्याने संपले नाही.
▪️कुंडली पहातांना, आता दर वेळीच ,आपल्याला परीक्षा द्यावी लागणार आहे. म्हणून, परिक्षा देतांनाची सावधानता, आता नेहमीच, बाळगावी लागणार आहे.
∆(5) यू ट्यूब सारख्या सोशल नेटवर्कवर, वेगवेगळ्या क्षेत्रातील, विद्वान ज्योतिष्यांचे कार्यक्रम असतात, त्यांचा लाभ, आज अनेक लोक घेतात. आपणहि आपल्या ,अभ्यास विषयाशी संबंधित, कार्यक्रम पाहिले पाहीजेत. " थेंबे थेंबे तळे साचे " ही उक्ति, सार्थ ठरवली पाहीजे.
∆(6) प्रत्यक्ष मार्गदर्शन : हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. काही मुद्दे असे असतात कि, ते वाचून तेवढे समजत नाहीत. अशावेळी, जाणकार व्यक्तिस विचारणे, क्रमप्राप्तच असते. आपली ज्ञान लालसा, व आपली चिकाटी पाहून, आपल्याला एवढे सहकार्य मिळतेच. गुरूशरणाने मिळालेल्या ज्ञानाची मजा ,काही औरच असते. संपूर्ण ज्ञान, ज्यांना गुरू कृपेने प्राप्त होते, ते, अलौकीक भाग्याचे धनी होत
.
∆ या विषयात अनुसरून, आपल्याला खालील पथ्ये पाळणे, नैतिकदृष्ट्या ,बंधनकारक असते.
∆ या विद्येत लीन झाल्याने, समाज आपल्याकडे, आदराच्या दृष्टीने पहातो. शाळेचे गुरूजी, ज्योतिषी, पौरोहित्य करणारे पंडीत ,यांची कमाई नगण्य असली तरी, लोक त्यांना, आदर भावाने नमस्कार करतात. त्या नमस्कारामागे, त्यांची श्रध्दा असते, त्या श्रध्देची बूज राखणे, हे आपले नैतिक कर्तव्य बनते.
💢 या भावनेची व्याप्ती, किती मोठी आहे, हे समर्थपणे, " पिंजरा " चित्रपटात ,डाँ. श्रीराम लागू यांनी, आपल्या जबरदस्त अभिनयातून, स्पष्ट केले आहे.
▪️इतर ठिकाणी, लाखो रुपयांची उलाढाल, जरी होत असली, व सोबत, नमस्कार- चमत्कार जरी होत असले, तरी या क्षेत्रातील, आदराची किनार, त्याला नसते, हे वैशिष्ट्य लक्षात ठेवावे. त्याचबरोबर, तो नमस्कार आपल्याला केला नसून, आपल्या करवी, ज्योतिष्य विद्येच्या दैवी बळास केलेला असतो, आपण फक्त माध्यम असतो, हे विसरून चालणार नाही. "शुभम् भवतु " हे आशीर्वचन, जातका विषयी, कणव व्यक्त करणारे असून, त्या आशिर्वचनाच्या स्पंदनलहरी, त्याच्या मनास ,सकारा त्मक बल देतात.
∆ " सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामय:।" अशी वृत्ती जोपासावी.
∆ या क्षेत्रात, आपण पदार्पण केले म्हणजे, आपण याचा " वसा " घेतला, याची सतत जाणीव असावी. ज्योतिष्य हे " सतीचे वाण " आहे असे म्हटल्यास, वावगे ठरणार नाही.
∆ आचरण पवित्र ठेवावे.
∆ दररोज, नित्य इष्ट देवतेची उपासना करावी.
∆ मन शांत असतांनाच, कुंडली पहावी. तशी स्थिती नसता, नंतर ,स्वस़्थचित्त असता, कुंडली बघावी.
∆ प्रत्येक ग्रहाचे संकेत ओळखावे. त्या संकेताचे संगतवार, मनोपटलावर चित्र तयार झाल्यावर, अंतिम निर्णय घ्यावा. केवळ एखाद्या ग्रहाकडे वा भावाकडे पाहून ,निर्णय घेण्याची घाई करू नये.
∆ जातकाप्रति, सहानू़भूतिपूर्ण दृष्टीकोन ठेवावा.
∆ तो आपल्याकडे मौजेखातर आलेला नाही, काहीतरी समस्या आहे व तिचे समाधान व्हावे, या आशेने ,तो आलेला आहे. याचे भान ठेवावे.
∆ कुंडलीतून व्यक्तिचा स्वभावधर्म, सरावाने व्यवस्थित कळतो. ब-याचशा समस्या, स्वभाव विशेषाने ,तयार झालेल्या असतात. ग्रहयोगाचे परिणाम ,संगतवार लावून, भाकीतापर्यत पोहोचणे, हे ज्योतिष्यांचे खरे कसब आहे
∆ त्यातील मर्म ओळखून, सौम्य शब्दात ,विषय आकलन करावा. उगाच संस्कृतप्रचुर, दुर्बोध भाषा पध्दतीचा वापर, करू नये. अतिशय घुमवून -फिरवून, मुद्द्याचे विवेचन केल्यास, ते पृच्छकाच्या डोक्यावरून जाते. त्यासाठी विवेचन करतांना त्याचा चेहरा वाचणे ,हेहि तितकेच महत्वाचे आहे. आपल्यात प्रतिपादन क्षमता जर नसेल तर,पृच्छक, पुन्हा येण्याचे धाडस करणार नाही. ग्रह स्थितीनुसार जर जातकात, स्वभावदोष असेल तर,त्याच्या वृत्ती परिवर्तनावर भर द्यावा. व आपला दृष्टीकोन, अतिशय सौम्य शब्दात, सांगावा. कुणीहि, कुणास नावे ठेवलेली , सहसा आवडत नाहीत. आपले दोष दाखवि़णा-या व्यक्तीबद्दल , मनात अढी निर्माण होते.पण ज्योतिषी त्यास अपवाद आहे. ज्योतिष्याने केस व्यवस्थित हाताळल्यास, अढीच काय ? ,पण आदराची भावना निर्माण होते. तसा भाव ,त्यांच्या चेह-यावर स्पष्ट करतो. असे असता, अकारण, कर्मकांडात गुंतवू नये.
∆ बरेचदा, दैवी उपायापेक्षा, व्यावहारिक उपाय, खूप लागू पडतात, असा अनुभव आहे. उदा. मुलीच्या पत्रिकेत, वैधव्य योग दिसत असता, मुलीला कुठल्याहि परिस्थितीत, ती आपल्या पायावर उभी राहील, एवढी सक्षम करा, सधन ,स्थावर असलेले, स्थळ बघा अशा हितकारक सूचना ,इतर सूचनांपेक्षा ,अधिक महत्वाच्या ठरतात, हे कोणीहि नाकबूल करणार नाही.
∆ काही अशुभ दिसले असता, ते आपणहून मुद्दाम, सांगू नये. पण विचारल्यास ,खोटे पण बोलू नये. कारण त्यामुळे शास्त्राची किंमत कमी होते व आपणासहि, उणेपणा प्राप्त होतो. कुणाच्याही डोक्या वर ओझे ठेवतांना, त्याच्या मानेत ,ते ओझे सांभाळण्याची कुवत, आहे की नाही ,हे पाहणेहि, आपले व्यावहारिक कर्तव्य आहे.
▪️भाकीत करतांना, " शक्यता आहे, संभवते "अशा शब्दांचा अधिक वापर करावा.
∆ उपाय सांगतांना, त्याच्या फलश्रृतिविषयी, अवास्तव धारणा व्यक्त करू नये.
∆ ग्रहयोगांमुळे, ज्या ज्या संभावना असतात, त्या त्या सर्व, निवेदन करण्यात, कुचराई करू नये. उदा: कर्क ,सिंह लग्नात, उभयतात , काही तरी विषमता सापडते, ते एकमेकास, सहसा ,अनुरूप नसतात.हा गाभा विचारात घेऊन, एका ज्योतिष्याने, गौरवर्णीय मुलीस, "तुला काळा मुलगा मिळेल ",एवढेच सीमित भाकीत वर्तविले. पण तिला, गोरापान नवरा मिळाला. असमानता,रंगात अवतरली नसून, शाखा भेदात, अवतरली होती. निदान बरोबर होते पण कारणमिमांसा चुकली होती. असमानतेची सर्व अंगे ,त्यांनी वेळीच, विवेचन करतांना स्पष्ट केली असती तर, "भाकीत चुकले" हा आरोप, टळला असता.
∆ अजून दुसरे अफलातून उदाहरण आहे- जे वाचून आपल्याला विस्मय वाटेल. :- एक शून्यातून विश्र्व निर्माण करणारी, सुसंस्कारित, पण शिक्षणाचा अभाव असलेली, धार्मिक, समाजकार्यात मोलाचे योगदान असलेली, अशी समाजवंदनीय, कोट्या धीश व्यक्ति, जेव्हा आपल्या मुलांच्या शिक्षणात, अपेक्षित यश, कां बरे मिळत नाही ?, असे श्रध्देने ज्योतिष्यास विचारते, तेव्हा "आडात नसेल तर पोह-यात कुठुन येणार ? " असे जर ज्योतिष्यांचे वक्तव्य असेल, तर अशा ज्योतिष्यास काय म्हणावे ?.
💢असे उथळ विचार असलेले , अकलेचे दिवे असणारे लोक, या शास्त्राला कलंक लावतात, असे माझे स्पष्ट मत आहे .
💢शिक्षण ही रक्तातून येणारी बाब नसून, ते मनुष्याने स्वप्रयत्नांनी मिळवलेले ज्ञान (acquired knowledge) असते, एवढी साधी गोष्टहि यांना कळू नये , ही मोठी दु:खाची बाब आहे .अशा चुकांना, " घोडचूक "म्हणावे, की " हत्तीचूक ", असा प्रश्न निर्माण होत आहे.
∆ जातकाच्या कुंडलीतील ग्रहयोगात व आपल्या संग्रहातील तत्सम कुंडलीतील ग्रहयोगात, साधर्म्य आढळल्यास, उदाहरणादाखल, ती संग्रहित कुंडली, नामनिर्देश न करता, दाखवावयास हरकत नाही.
∆ जातकाने सोबत आणलेली कुंडली, शुध्द आहे कि नाही ,याची खात्री केल्याशिवाय, पुढे जाऊ नये. कुंडली पहातांना, ती आपल्याशी बोलली पाहीजे ,तसेच जातक, निरोप घेतांना, त्याच्या चेह-यावर, समाधान दिसले पाहीजे ,हे तुमच्या यशाचे खरे गमक आहे.
∆ थोडक्यात या शास्त्रात गति प्राप्त करण्यासाठी , "वेडं" व्हावं लागतं, असेच मला सुचवायचे आहे. अशा वेडाने झपाटलेल्या व्यक्तिच्या मागोमाग, सावली सारखे, यशाला येणे आहेच.
∆ आता उरला वादग्रस्त प्रश्न- मानधनाचा. जेव्हा एखादा वक्ता ,व्यासपीठावर जेव्हा उद्बोधन करतो, तेव्हा त्यासही भरपूर टाळ्या पडून ,प्रतिसाद मिळावा, अशी रास्त अपेक्षा असते. मग ज्योतिष्यां नी मेहनत घेतल्यानंतर, तशी अपेक्षा करणे गैर आहे कां ? .
💢वरील लेखावरून ज्योतिष्यास, प्रकाशात येण्या साठी, किती प्रचंड मेहनत घ्यावी लागते ,याची पुसटशी जरी कल्पना आली, तरी माझ्या लेखनाचे चीज झाले ,असे मी समजेन.
∆ एका टेलरची सवड नसल्यास , आपण लगेच, 25 हातावर असलेल्या दुस-या टेलरकडे, कपडे शिवायला टाकतो. इतक्या सहजासहजी, एक ज्योतिषी वेळेवर सापडला नसल्यास, लगेच 5 मिनिटाच्या अंतरावर, दुसरा ज्योतिषी सापडतो कां ? नाही ना ? यातच, या समस्येचे उत्तर दडलेले आहे.
∆ गडगंज श्रीमंत ,आपल्या मुलीच्या लग्नात, हजारो रूपयांचे, फटाक्यांच्या रूपात, अग्नी दहन करतात. पण, तिच्या भविष्यात काय आहे ,हे स्वच्छपणे पण, विना खर्चाने माहीती पडावे, अशीच अपेक्षा ठेवत असतात.
∆ नोकरदार ,सधन, उमेदवार सुध्दा, मला काही शंका आहेत अशी ,विषयाची सुरूवात करून, फी आकारली जाते हे ऐकताच, लगेच अंतर्धान होतात.
∆ "उडदामाजी काळे गोरे " या न्यायाने, सगळेच तसे असतात, असे म्हणणेहि योग्य नाही. काहींचा, खूप चांगलाहि अनुभव येतो. पण ,अशा पृच्छकाचे प्रमाण, मात्र समाधानकारक नसते.
∆ या सोबतच, दुसरी बाजू पण पाहीली पाहीजे. साधारणपणे परवडेल, एवढीच फी आकारली पाहीजे. कारण, काही केवळ हौस म्हणून ,याचा छंद बाळगतात, तर काही जोड व्यवसाय म्हणून, तर काहींचे हे, उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असते. या वैविध्यामुळे मानधनाच्या अपेक्षेतहि ,विविधता आढळून येते.
∆ या चर्चेत अधिक गुंतून पडण्यापेक्षा, मला एकच महत्वाचे वाटते कि, " ज्योतिष्याने कुणास हि लूट नये व स्वत:सहि, कुणास लूटू देऊ नये."
∆ मानधनासंबंधी, मी मांडलेले विचार, सर्वाना पटतीलच, असे नाही व माझा, तसा आग्रहहि नाही. हा विषय, अनेकदा, वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, चर्चेत आल्याने, त्यातील स्वारस्य, निघुन गेले आहे. म्हणून,या संदर्भात काँमेंटस् व्हाव्यात, अशी माझी मुळीच इच्छा नाही. हा विषय वगळून, लेखातील अन्य मुद्द्यावर, मतप्रदर्शन केल्यास, मला आनंदच होईल. विषयास येथेच विराम देतो.
.
।। शुभम भवतु।।
💢 वरील लेखातील माझे विचार माझे वाचन, अनुभव व मनन शक्तीवर आधारित आहेत.
ते आपणा सर्वाना अवगत व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच आहे.
🎯 लेख आवडल्यास तसे, " कॉमेंट्स बॉक्स " मध्ये कळवावे. म्हणजे मला अधिक लिहिण्यास उत्तेजन लाभेल. 🙏🌺🌺🌺
सर आपले विचार बरोबर आहे
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🌺
ReplyDeleteसर,मी आपला हा लेख वाचला.मला खूप आवडला मी पण तुमच्या विचाराशी खूप सहमत आहे.धन्यवाद सर🙏🙏
ReplyDelete