विचारमंथन -गुणमेलनाचे
विवाह विषयक गुण, मेलनासंबंधी:
∆ मूळात पत्रिका जुळवणे ,या बाबत समाजात ,अनेक संभ्रम आहेत. काही ठराविक ,इथे नमूद करीत आहे.
1.फक्त गुण (१८)पहा .फार खोलात जाण्यात हंशील नाही कारण ,कोणतीहि पत्रिका पूर्णपणे शुध्द नसते ( दुर्दैवाने हे खरे आहे ).
2.फक्त आपल्याच कडे गुणमेलन पहातात .इतर धर्मात पाहत नाहीत ,मग त्यांचे कुठे अडते ?
3.गुणमेलन हे साळसूदपणे नकार देण्याचे साधन आहे.स्थळ न आवडल्यास ,तसे स्पष्ट न सांगता, गुणमेलनातील त्रुटी ,पुढे कराव्यात.
4.अमुक अमुक जोडप्याचे तर 36 गुण होते तरी पण, टिकले नाही ,मग गुणमेलनाचा काय उपयोग ?
∆ वास्तविक परंपरेप्रमाणे गुणमेलन पाहिले जाते व जोडीने मंगळ विचार केला जातो.
∆ गुणमेलन हे वधूवरांच्या जन्मचंद्र नक्षत्रावर आधारीत असल्याने ,फक्त चंद्राचाच विचार केला जातो. कुंडलीतील इतर ग्रहांचा, वा ग्रह स्थितीचा विचार केला जात नाही.
∆"गुणमेलनाचा व इतरही ग्रह स्थितीचा साधक -बाधक विचार व्हावा " हा एका ओळीचा संदेश फार महत्वाचा आहे.
∆ कुंडलीत नि:संतान योग,नपुंसकयोग, वैधव्य योग विधूर योग, द्विभार्या योग, व्यभिचार योग, बहुविवाह योग, संन्यास योग, कारावास योग, दारिद्र्य योग, परिव्रज्या योग, अल्पायु योग, अनारोग्य योग अशा अनेक बाबींचा विचार ,या साधक -बाधक विचारात मोडतो. त्यांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. तरच वैवाहिक जीवन सुखकारक होऊ शकेल.
∆ तत्वत: वरील सिध्दांत जरी खूप उपयोगी असले ,तरी त्यांचे पालन करणे ,व्यावहारिक दृष्ट्या तेवढे सरळ व सोपे नाही.
∆ व्यावहारिक दृष्टीने स्थळ पूरेपूर पसंतीला पडल्यास ,फार खोलात शिरण्याची ,पालकाची मानसिकता नसते. व या बाबींकडे कानाडोळा केला जातो. विवाह उरकल्यानंतर मात्र ,त्या समस्या "आ "वासुन समोर उभ्या राहतात व त्यांचा सामना करता- करता, नाकी नऊ येतात.
∆ तत्व म्हणून या बाबी ठीक असल्या तरी ,त्यांचे पालन करणे तेवढेच जिकीरीचे असते, स्थळ परिक्षेसा़ठी आपण जेवढ्या बारीक चाचण्या लावाल, तेवढे स्थळ संशोधन ,जिकिरीचे होऊन बसते व त्यामुळे विवाह योग्य वेळी जुळेलच, याची शाश्वती नसते. कधी कधी "तेल हि गेले व तूपहि गेले "अशी स्थिती होऊ शकते.
∆ शेवटी प्राप्त परिस्थितीत, पालकांना ,स्वत:च्या तारतम्याने, निर्णय घ्यावा लागतो व ही त्यांची, खरी कसोटी असते.
∆ वय उलटलेल्या उमेदवारांना ,नवोदित उमेदवारांपेक्षा नक्कीच अधिक समज आलेली असते. व या परिपक्वते मुळे वैवाहिक जीवनात जुळवून घेण्याची वृत्ती विकसित होऊ शकते म्हणून परस्परांच्या पत्रिका पाहू नये ,असे मुळीच नाही. कारण सामान्य दृष्टीस न दिसणा-या ,परस्परांच्या अनेक सवयी, वृत्ती, स्वभावाची ठेवण ,अशा महत्वाच्या अनेक बाबींची पत्रिका पाहिल्यामुळे पूर्व कल्पना येते.
त्यामुळे कुठल्या बाबतीत, किती प्रमाणात ,मतभेद होऊ शकतात, कोणत्या क्षेत्रात, कितपत जुळवून घ्यावे लागेल, याची पूर्व कल्पना येते. व या पूर्व कल्पनेमुळे भावी संघर्ष टाळता येतात व सहजीवन सुखकर होऊ शकते.
∆ वय उलटलेले असले तरी, पत्रिका पाहणे महत्वाचे आहे यात शंका नाही.
Comments
Post a Comment