महती जन्म नावाची.

 


महती जन्म नावाची.


   💢 सर्व साधारण लोकांमध्ये, जन्मनांवासंबंधी, विविध समज-गैरसमज, आढळून येत आहेत. त्यामुळे, जन्म नावाची उत्पत्ती, त्याचे महात्म्य सर्वांना स्पष्ट कळावे व काही गैरसमज असल्यास, ते दूर करण्याच्या दृष्टीने, हा लेख लिहित आहे.


∆ घरात नवीन जन्म झाला, म्हणजे घरातील वडीलधा-या मंडळीना, विशेषत: आजींना, पहीली उत्सुकता असते, ती म्हणजे जन्मनाव काय आहे ?, ते माहीत करून घेण्याची. मग नवीन बाळ कशाच्या पायी आले ?, रास काय ?, गण काय ?, योनी काय ? या त्यामागोमाग येणा-या, प्रारंभिक उत्सुकता, त्यासोबत, काही अनिष्ट योग तर नव्हता नां ? अशी पुसटशी चिंतायुक्त शंका. हा वर्षानुवर्षे, घराघरातून, पाळला जाणारा, प्राथमिक सोपस्कार आहे. 

💢 त्यानंतर, मग सवडीने कुंडलीचा विचार होतो.


∆ जन्माक्षराच्या उत्सुकते बरोबरच, ते, सोयीचे, सुटसुटीत, आवडते असावे, अशी माफत अपेक्षाहि असते. पण आपल्या इच्छेचे दान, आपल्या पदरी पडेलच, याची अजिबात खात्री नसते. 


नवागताचा जन्म, ज्या क्षणी झाला, त्यावेळी, चंद्र ज्या नक्षत्रात होता, त्या नक्षत्राचे गुणधर्म व्यक्त करणारे, एकमेव अक्षर, म्हणजे जन्माक्षर होय. 


∆  जन्मनक्षत्रांच्या गुणधर्मांचा प्रभाव, जन्मणा-या व्यक्तीच्या स्वभावावर, मानसिक ठेवणीवर पडत असतो, हे या माध्यमातून, ध्वनित केले जाते.


∆ पण, वरील विधान, हे अर्धसत्यच म्हणता येईल. कारण, कुंडलीतील लग्न भाव, हा जातकाचा स्वत:चा वैशिष्टये दर्शविणारा भाव, असल्याने, त्या भावाचा भावेश, त्याची स्थिती, तसेच प्रथम भावात विद्यमान असलेले ग्रह, यांचाहि कमी-अधिक, पण जबरदस्त परिणाम, जातकाच्या वृत्तीवर दिसून येतो. 

💢 सर्व संकलित परिणाम पहाता, काही वैशिष्टये ही ठळक, तर काही वैशिष्टये, सौम्य स्वरूपात, आपले अस्तित्व दाखवू शकतात. या बाबीचा, तारतम्याने विचार करून, योग्य भाकीतापर्यत पोहोचणे, हेच ज्योतिष्यांचे, खरे कसब असते.


∆ याच तत्वाच्या अनुषंगाने, हेहि स्पष्ट करता येईल की, एखाद्या व्यक्तीचा, राक्षस गण दर्शविला असेल व लग्नी गुरु-चंद्रा सारखे सात्विक व भावनाप्रधान ग्रह, शुभ स्थितीत असतील, तर राक्षस गुण, हे, अभावानेच आढळतील. 


∆ प्रत्येक नक्षत्राचे नाडी, गण, योनी आदि वैशिष्ट्ये, वेगवेगळी असतात. व याचा विचार, केवळ प्रसंगानुरूप होत असल्याने, त्याचे विस्मरण होण्याचीच शक्यता, अधिक असते. त्यातून, घरातील प्रत्येक व्यक्तिच्या, जन्म नक्षत्राची वैशिष्टये लक्षात ठेवणे, म्हणजे कठीण कर्म आहे. 


∆ या अडचणींवर मात करण्यासाठी, व आपल्याला केव्हाहि, सर्व माहीती बिनचूक सांगता यावी यासाठी, पूर्वसुरींनी जन्माक्षराची, योजना करून ठेवली आहे. 


जन्माक्षर, हे दुसरे-तिसरे काही नसून, आपल्या जन्मनक्षत्राची ओळख करून देणारा " परवलीचा शब्द " ( पासवर्ड ) आहे.

▪️ व त्या अक्षराचाहि विसर पडू नये म्हणून, ते अक्षर जसे, असेल तसे, जन्म नांवाच्या प्रारंभी कायम ठेवत, अनुरूपता साधून, एखादे व्यावहारिक नांव, जन्मनांव म्हणून, सांगण्याची प्रथा आहे. उदा. जन्माक्षर "सु" निघाल्यास, सुधीर, सुरेश अशी, व जातक मुलगी असता, सुनंदा, सुमंगला अशी, जन्मनांवे सांगण्याची प्रथा आहे.


∆ जन्माक्षरास मिळते-जुळते जन्मनाव, उदा. संतोष, सागर, सोनाली, असे परिवर्तन यात अपेक्षित नसते. यामुळे, त्याची विशिष्टता नाहीशी होते. 


∆ आपल्याला माहीतच आहे कि, क्रांतीवृत्तावर एकूण 27 नक्षत्रे असून, ती 12 राशीत, विभागल्या गेली आहेत. तसेच प्रत्येक नक्षत्राची, 4 चरणे कल्पिलेली असून, सर्व नक्षत्र चरणांची संख्या 27×4=108 होते. या प्रत्येक चरणाची, सरलपणे ओळख व्हावी, यासाठी वर्ण मालेतील एक विवक्षित अक्षर, प्रत्येक चरणासाठी, नेमलेले आहे. प्रत्येक पंचांगातील अवकहडाचक्रात, कोणत्या चरणांचे, कोणते अक्षर आहे, हे दिलेले असते. यात विशेष म्हणजे, ही व्यवस्था सर्वमान्य असून, यात पाठभेद आढळून येत नाहीत. 


∆ या 108 अक्षरांमध्ये, काही अक्षरे, एवढी सुलभ असतात की, त्याना प्रारंभ कल्पून, अनेक व्यवहारातील नावे, आपल्याला सहजपणे आठवतात व त्यातील काही, आवडीचीहि ठरतात. 

▪️ पण, कधी-कधी, जन्मचरणानुसार काही अक्षरे, एवढी अळणी असतात की, त्यांना प्रारंभाक्षर मानून , एकहि व्यावहारिक नांव, उपलब्ध नसते. अशा वेळी जन्मनाव काय सांगावे ? असा प्रश्न निर्माण होतो.

 ▪️ काही अक्षरे, जसे था, डा, हू, धा, ङ्, ही अशी अक्षरे आहेत, की, ती, याबाबत, मति गुंग करणारी ठरतात. साहजिकच, अशी अळणी अक्षरे, कां निवडली असावी ?,  असा प्रश्न निर्माण होतो. याचे स्पष्टीकरण, असे देता येईल की, देवनागरी वर्ण मालेत, मुळाक्षरांची संख्या, मर्यादित आहे. व आपल्याला आवश्यकता आहे, ती 108 अक्षरांची. त्यामुळे, नाइलाजाने, बाराखडीतील मुळ अक्षराची परिवर्तित रूपे, खानापुर्तिसाठी, घेतली असावी. 

▪️ म्हणून टा, टी, टू अशा "ट" वर्गातील, इतर अक्षरांना सुध्दा, अवकहडाचक्रात, मानाचे स्थान प्राप्त झाले असावे.

 ▪️ एकाच बाराखडीतील, काही अक्षरे एका नक्षत्रात, तर काही अक्षरे, दुस-या वेगळ्या नक्षत्रात, असेहि झाले आहे. उदा. चा,ची ही अक्षरे, मीन राशीच्या रेवती नक्षत्रासाठी, तर यांचेच नातेवाईक अक्षरे, चू, चे, चो, ही मेष राशीच्या, अश्विनी नक्षत्रास, दिलेली आहेत.

 ▪️ यामुळे, जे जन्मनक्षत्रचरणाक्षर आहे, ते जसेच्या तसे स्वीकारणेच, योग्य ठरते. 

▪️ ते अळणी वाटल्याने, त्याच बाराखडीतील, इतर अक्षर निवडल्यास, नक्षत्र चरणांची ओळखच बदलली जाते. यामुळे असा बदल, स्वीकार्य नाही. 


∆ हेच, अजून एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येईल. आपण बँकेत पैसे काढण्यासाठी जातो, तेव्हा विड्राँवल फार्म जमा केल्यावर, आपल्याला, एक पितळी टोकन देण्यात येते. त्यावर एक विवक्षित क्रमांक असतो. कदाचित् तो आपल्या आवडीचा असू शकतो, वा 36 सारखा, विरोधी वाटणारा अळणी क्रमांकहि, असू शकतो. पण, ते टोकन कँश काऊंटरवर जमा केल्यास, आपल्याला विना चौकशी, आपण मागितली तेवढी, रक्कम बरोबर मिळते. म्हणजे त्या टोकन क्रमांकात, आपण कोण असून, कोणत्या क्रमांकाचे खातेधारक आहात. आपल्या खात्यात, किती रक्कम जमा असून, त्यापैकी आपणास, आज किती रक्कम हवी आहे, ही संपूर्ण माहिती दडलेली असते.

 ▪️ कल्पना करा, तो टोकन नंबर, आपल्याला अळणी वाटल्याने, व शेजारी उभ्या असलेल्या दुस-या खातेदाराला, 55 सारखा, आपल्याला आवडणारा, टोकन नंबर असल्यास, आपण आपसात त्या टोकनची, रदबदली करतो कां ? नाही नां ! कारण असे केल्याने, आपली ओळख बदलेल व दोघांनाहि  आवश्यकतेपेक्षा, वेगळीच रक्कम मिळेल व गोंधळ होईल. हे आपणास माहीत असते.

▪️ तद्वतच, जन्माक्षराचे आहे. त्यात, आवडीनुसार, बदल केल्याने आपल्या जन्मनक्षत्राची, ओळख बदलेल म्हणून, असा बदल, योग्य ठरत नाही.

  
∆ ब-याच लोकांचा, असा अट्टहास असतो की, जन्म नांव, सहजा सहजी, कुणास कळू नये, कारण, त्यामुळे कुणासहि आपली राशी सहजपणे कळते व त्यानुसार, त्याचा, आपल्याविषयी, पूर्वग्रह (?) होऊ शकतो.


∆ या उलट, काही लोक, जन्म नांवच ( सुटसुटीत असल्यास, ) व्यावहारीक नाव, ठेवतात. म्हणजे पुढे चालून, गोंधळ नको. 

▪️ पेपर मध्ये छापून येणारे भविष्य, राशीवार पहाता येते. जन्मनांव व चालू नाव, कोणत्या नावाने पहावे ?, असा गोंधळ होत नाही. राशी भविष्यावर अतूट विश्वास असतो. 


∆ खरे पहाता, या पेपर मधील राशी भविष्याचेहि, विविध प्रकार असतात. कोणी चंद्रराशीला प्रमुख मानून, त्यासंबंधी इतर ग्रहांचा काय परिणाम होईल, ते लिहितात. तर काही, सूर्य ज्या राशीत आहे, त्या राशीस अनुसरून, भविष्य लिहितात. लग्नराशी, हा काहींचा आधार असतो. तर पाश्चात्य पध्दतीनुसार, विशिष्ट कालावधीस अनुसरून, काही भविष्य लिहितात. भविष्य लिहितांना, त्यांनी वरीलपैकी कोणती पध्दति अंगिकारली आहे, याचा उल्लेखहि बरेचदा केला जातो. तर काही, हा संकेत पाळतांना, दिसत नाहीत.


∆ सारांश, केवळ एका राशीला केंद्रबिंदू मानून, त्या मध्यवर्ती राशीस, इतर ग्रह, त्यांच्या तत्कालीन राशींमधून, काय फले देऊ शकतात, याचा तो गोषवारा असतो. ती केंद्रबिंदू मानलेली राशी, आपल्याशी संबंधित असल्याने, आपण ते उत्सुकतेने वाचतो. ही राशी, एवढेच साम्य, त्यावेळी असते. 

▪️ गोचरीने निर्माण होणारी ग्रहस्थिती, व आपल्या मूळ कुंडलीतील इतर ग्रहस्थिती, ही वेगवेगळी असते. त्यामुळे राशी भविष्याची फलीते, काही अंशी लागू होतात, तर काही अंशी नाही. ही बाब, सर्वसाधारण व्यक्तिस माहीती नसल्याने, राशी भविष्याबाबत, दृढश्रध्दा, वा तितकाच आकस, निर्माण होऊ शकतो. 


∆ मोजक्या शब्दात सांगावयाचे झाल्यास, हे राशी भविष्य " रेडीमेड ड्रेस " सारखे असते. रेडीमेड कपडे, तसे प्रत्येकाच्या अंगाला, परफेक्ट येतीलच, असे नाही. आपल्या शरीराप्रमाणे, त्यात आवश्यक ती, काटछाट करावीच लागते. वा रेडीमेडचा मोह, त्यागावा लागतो. तसेच, या राशी भविष्याचे आहे.

  
" कन्या राशीस हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे " असे राशी भविष्यात लिहिलेले असेल, तर  हाँस्पिटलमध्ये, त्याच राशीचे, लोक दिसायला हवे, पण तसे होत नाही.

 ▪️ त्या यूनिफाँर्म गाईडलाईन्स आहेत. म्हणून त्या प्रत्येकाला, तंतोतंत लागू होतीलच, असे नाही. 

▪️ कारण, राशी जरी एक असली, तरी प्रत्येकाच्या कुंडलीतील, ग्रहांची ठेवण, ही निश्र्चित, वेगवेगळी असते.

 ▪️ जसे दोन चेहरे, कधीहि तंतोतंत ( सिनेमातील डबल रोल प्रमाणे ) सारखे नसतात, तसेच, प्रत्येकाची कुंडली, पण एकसारखी नसते.

 ▪️ म्हणूनच, असे साचेबंद भविष्य, शतप्रतिशत, ख-या कसोटीवर उतरेल, अशी अपेक्षा करू नये.


∆ एखादी गृहिणी, भजी तयार करत असतांना, जशी सगळी भजी, एकाच आकाराची करू शकत नाही. प्रत्येकाचा आकार, हा, दुस-यापेक्षा वेगळा असतो तसेच, कुंडलीचे आहे. म्हणून राशी भविष्य, तंतोतंत लागू होईलच, असे नाही. 


∆ हे सूक्ष्म बारकावे,  सर्वसाधारण व्यक्तिच्या लक्षात येत नाहीत.


∆ प्रत्यक्ष आपली जन्मकुंडली व ग्रहांचे गोचर भ्रमण व दशा विचार, मात्र, याबाबत, अधिक अचूक अंदाज करू शकतात. तशी आवश्यकता भासल्यास, आपल्या मुळ कुंडलीच्या आधारे, विश्वासू, अभ्यासू जाणकारांकडून, सद्य परिस्थितीचे आकलन करून घेणे, केव्हाहि, चांगले असते. 


∆ थोडक्यात, राशी भविष्याच्या लाभासाठी, आपण जे जन्मनांव व व्यावहारीक नांव, याची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो, तो शतश:  परिणामकारी ठरेलच, असे नाही.

                            

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली