वैवाहिक सुख
वैवाहिक सुख
( प्रसारित भाषण झूम अँप द्वारा, यु ट्यूब वर दिनांक 7 मे 2021, वेळ दुपारी 4 ते 6 )
सर्व प्रथम विद्येची देवता श्री गणेश व वाग्देवी, माता सरस्वती, यांचे स्मरण व त्यांना नमन करून, मी प्रतिपाद्य विषयास आरंभ करतो.
💢 वैवाहिक सौख्य हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे.
💢 जन्म, विवाह, मृत्यू, हे जीवनातील तीन, महत्वाचे सोहळे आहेत. जन्मवेळी, जन्म, कसा साजरा केला गेला ? हे आपल्याला कळत नसते. म्हणून , त्याचा आनंद आपण उपभोगू शकत नाही.
मृत्यू नंतर, काय सोपस्कार केले गेले ? हेहि आपल्या पश्चात असल्याने, आपणास कळू शकत नाही. फक्त विवाह, हाच एक असा, आनंद दायी- सुखकारक सोहळा आहे, कि तो, “ याची देही याची डोळा “, आपण अनुभवू शकतो.
💢 विवाह म्हणजे, जीवनात वसंत फुलवणारी घटना . विवाह म्हणजे स्त्री पुरुषाचे , समाज मान्य, अधिकृत मिलन.
भारतीय संस्कृती प्रमाणे, सोळा मुख्य संस्कारा तील, विवाह हा एक पवित्र संस्कार आहे. हा विवाह सोहळा एकदाच व्हावा. व त्याने, आपला गृहस्थाश्रम सफल, परिपूर्ण करावा, अशी प्रत्येकाची मनीषा असते.
या संस्काराद्वारा, प्रजोत्पादन करून, वंशविस्तार करणे, पितृऋणातून मुक्त होणे, व जीवनसाथी म्हणून, आयुष्यभर एकमेकांची, सुख दुःखात साथ करणे. हा, या धार्मिक संस्कारामागे उद्देश आहे.
💢 सांसारिक सहजीवनाचा, आनंद घेण्यासाठी, जरी विवाह संस्काराची रचना असली तरी, आयुष्यभर होणाऱ्या संसाराचा, मध्यवर्ती बिंदू , केवळ विषय वासना, हा नव्हे.
कारण, मनुष्याचे दात व तारुण्य, या अशा दोन बाबी आहेत, कि त्या, जीवनात उशीरा येतात व त्या मानाने, लवकर निघून जातात.
विवाहाची मुहूर्तमेढ, जरी तारुण्य असले तरी, ते गृहस्थधर्माचे प्रवेशद्वार आहे.
जीवनात प्रवेश करणाऱ्या,नूतन जोडीदाराच्या, हात हातात गुंफून, “ धर्मेच अर्थेच कामेच “ अशी जाणीव पूर्वक, पूर्ण आयुष्यभर, सोबत करावयाची असते, एकमेकांच्या सुखदुःखात, वाटेकरी व्हावयाचे असते .
ज्याप्रमाणे, दुधात साखर विरघळून एकरूप होते, तद्वतच, पतीपत्नी, हे दोघेहि एकरूप व्हावेत, तरच संसार सुखाचा होऊ शकतो.
हे मर्म ध्यानात घेऊनच, पूर्व सु्रींनी, गुणमेलनाची रचना करताना, मन :कारक चंद्र व चंद्रनक्षत्रास, जन्म लग्नापेक्षा,अधिक महत्व दिल्याचे दिसून येते.
दोघांचे स्वभावधर्म, जुळावेत म्हणून , षडाष्टकात येणाऱ्या राशीं, वर्ज्य कराव्यात, असेहि सांगितले, तेहि एवढ्यासाठीच.
संसाराची दोन चाके, समान आकाराची असतील, तरच, संसाराच्या गाडीची, योग्य दिशेने वाटचाल होईल.
वैवाहिक जीवनाचा आनंद घेणे ,प्रजोत्पादन करून, कुटुंबाप्रति असणाऱ्या, सर्व नैतिक जबाब दाऱ्या पार पाडणे, मातृपितृसेवा करून , जीवनाची इतिश्री करणे, यालाच थोडक्यात, सफल जीवन म्हणता येईल.
अशा या विवाहानंतर, मिळणाऱ्या वैवाहिक सुखाचा विचार करताना, लग्न स्थान -लग्नेश, सप्तम स्थान-सप्तमेश व कारक शुक्र, याची कुंडलीतील स्थिती पहाणे, अगत्याचे ठरते .
💢 लग्न स्थानावरून, व्यक्तीचे सर्व साधारण आरोग्य, व्यक्तीची इच्छाशक्ती, व्यक्तीचा कल, त्याच्या स्वभावाची प्रमुख वैशिष्टये, अंगकाठी, शरीर सौष्ठव, याचा बोध होतो. लग्नस्थानी कोणती राशी आहे ?, लग्नेश कोणत्या स्थानी, कोणत्या राशीत, कोणत्या अवस्थेत आहे ?, लग्नेश कोणत्या तत्वाचा आहे ?. लग्नस्थानी कोणते ग्रह आहेत ?, ते कोणत्या भावाचे स्वामी आहेत ?. लग्नासाठी ते कारक आहेत, कि अकारक आहेत ? यावरून, लग्न स्थानाची क्षमता ठरते.
💢 लग्न बलवान असता, कुंडलीतील इतर ग्रह, त्यांच्या अधीन असलेली फळे मुक्तपणे देतात.
म्हणून, लग्नेशाला अनन्य साधारण महत्व आहे.
💢 एकदा लग्नेश कोण आहे ? हे पाहिले , कि सप्तमेश कोण असेल ? हे लगेच लक्षात येते. कारण, लग्नराशीची लिंक, सप्तम स्थानाच्या राशींशी, ठरलेली आहे. यात बदल नाही.
“ ऋणानुबंधाच्या या रेशीमगाठी, ईश्वराच्या मर्जीने, वरून, आधीच ठरलेल्या असतात” , या उक्तीची प्रचिती, लग्नेश व सप्तमेश, यांच्या रचनेत, निश्चितच दिसून येते.
💢 लग्नेशानंतर महत्वाचा ठरतो, तो राशीं स्वामी. म्हणजे, चंद्र ज्या राशीत असेल त्या राशींचा स्वामी. चंद्र मनाचा कारक असल्याने, मनाची जडण-घडण, त्याची मनोवृती,राशींस्वामी, अधिक स्पष्ट करतो.
सर्वसाधारणपणे, लग्नस्थानातील ग्रह, लग्नेश व राशींस्वामी या तिघांच्या गुणधर्माचे एकत्रिकरण, व्यक्तीच्या स्वभावात दिसून येते.
स्थूल मानाने, असे म्हणता येईल कि, लग्न व चंद्र, हे समराशीत असता, जातक जातिकेत, कणखरपणा कमी असतो.
भावनेचा पगडा, सहृदयता, अधिक असू शकते. स्वभाव मवाळ, व सौम्य असू शकतो.
या उलट, हे दोन्ही विषम राशीत असता, स्वभाव कडक, कणखर, कर्तव्यास अधिक प्राधान्य देणारा, व शिस्तीचा भोक्ता असू शकतो.
यात एक राशीं सम, व एक विषम असेल तर, दोन्ही वृत्तीचा समन्वय झालेला दिसून येईल .
विवाहसुखासाठी, सप्तमस्थानाची स्थिती व सप्तमेशाची स्थिती पाहणे, खूप महत्वाचे असते.
बालपण, तरुणपण, म्हातारपण या जीवनाच्या तीन अवस्था आहेत. तारुण्य ही यात मधली अवस्था. म्हणूनच कि काय ?, कुंडलीच्या सर्व भावात, सप्तम स्थानाची रचना, साधारणतः मध्यभावात केली गेली असावी.
सप्तमेश शुभ ग्रह असेल, शुभस्थानी असेल, राशीं अंशदृष्ट्या बलवान असेल, वक्री, - अस्तंगत नसेल, क्रूर नक्षत्री नसेल, नवांशातहि स्वराशी, मित्रराशी असेल, कोणत्याहि पापग्रहाच्या दृष्टीत नसेल, शुभ कर्तरीत असेल, तर, विवाह योग्यवेळी होऊन, वैवाहिक सुख उत्तम मिळते.
विवाहाचे नैसर्गिक कारकत्व शुक्राकडे आहे. शुक्र शृंगार, गायन, वादन नृत्यादि कला, साहित्य, अभिनय, सौदर्य, आस्वाद याचा भोक्ता असलेला, रजोगुणी ग्रह.
तारुण्य व शृंगार म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू.
शुक्र गोडाचा कारक. त्यामुळे जसा शुक्र असेल, तसा तुमच्या वैवाहिक जीवनात कलात्मकतेचा, परस्पर सामंजस्याचा गोडवा येईल, असे म्हटल्यास, वावगे ठरणार नाही.
पुरुषांसाठी, आपण चंद्र व शुक्र याचा विचार करतो, तर स्त्रीसाठी रवि व मंगळाचा.
कारण, चंद्र हा मानसिक सुखाचा कारक तर, शुक्र इंद्रियजन्य सुखाचा कारक. हे दोन्ही ग्रह, राशीं, स्थान, अंश, दृष्ट्या बलवान, नवांशबली, शुभग्रहाचे दृष्टीत, अशुभ ग्रहदृष्टी विरहित, असले तर उत्तमच.
यामुळे पती-पत्नी, दोघाचे मिलन, सर्वार्थाने उत्तम ठरते.
याउलट, चंद्र दूषित असेल तर वैचारिक मतभेद होतील , व शुक्र दूषित असता शैयासुख दूषित होईल . व त्याचे पडसाद, व्यवहारात, कुठे तरी, उमटल्या- शिवाय, राहणार नाहीत.
स्त्रीचे बाबतीत, रविबल, मंगळबल असावे. कारण रवि, सर्व ग्रहांचा राजा, अधिकारी ग्रह, व मंगळ म्हणजे, धडाडी सामर्थ्य. त्यामुळे स्त्रीचे रवि व मंगळ, हे दोन्ही ग्रह बलवान असता, पतीसुख उत्तम मिळते.
अष्टकवर्गानुसार, दोघांच्याहि विवाह स्थानास, 28 पेक्षा अधिक गुण असून, त्यात, सप्तमेश लग्नेश यांनी, किमान 4 गुण दिलेले असावेत.
सप्तमाचे तुलनेत, कुटुंबस्थानास, कमी गुण असावेत. कारण, ते सप्तमाचे अष्टम स्थान आहे.
चतुर्थ स्थान, हे सुखस्थान असल्याने, पंचम स्थान हे संतती स्थान, षष्टस्थान, हे आरोग्य स्थान, अष्टमस्थान हे सप्तमाचे धनस्थान, व दशमस्थान हे कर्मस्थान असल्याने, ही स्थाने, अष्टकवर्गात, किमान, 28 गुण असलेली असावीत.
पुरुषाचे बाबतीत, सप्तमस्थान, सप्तमेश व कारक शुक्र याची, लग्न, चतुर्थ, पंचम, सप्तम, लाभ, यास्थानातील गुणांची स्थिती,
तर
स्त्रीचे बाबतीत, या 5 स्थानातील सप्तम, सप्तमेश, व कारक मंगळाची, गुणनिहाय स्थिती, फारच महत्वाची ठरते.
आदर्श स्त्री व पुरुष कसे असावेत ?
आदर्श स्त्री:- भोजन सिद्ध करताना ती माता, हित गुज, विचार विमर्षासाठी ती मित्र, शैयासुखासाठी ती अभिसारिका, सेवाशूश्रुषेसाठी ती, दासी असावी.
💢 पुरुषाची ती सावली असावी.
आदर्श पुरुष,:- हा अचल वृक्षासारखा, कोमल वेलीस, भरभक्कम आधार देणारा, तिचे सर्वोपरी रक्षण करणारा असावा.
पण हे सर्व, केव्हा शक्य आहे ? नशिबाची साथ असेल तरच.
💢 आपण, मानव देह धारण करून, मातेच्या उदरा तून, जेव्हा पृथ्वीतलावर अवतीर्ण होतो, त्यावेळेस, आकाशात ग्रहांची, जी राशीं – नक्षत्रगत स्थिती असते, त्या स्थितीनुसार, पूर्ण जीवनाचा आलेख तयार होतो, अशी , कुंडलीशास्त्राची, मूळ संकल्पना आहे.
आपली जन्मवेळ आपल्या प्रारब्ध, संचिता नुसार, आपणच निवडलेली असते.
अगोदर वर्णन केल्यानुसार, आपण, आपली कुंडली पाहून, माझा विवाह केव्हा होईल ? तो आयोजित असेल कि, प्रेमविवाह असेल ? जोडीदारा चा स्वभाव कसा राहील ? दोघात सामंजस्य राहील कि नाही ? मतभेद, घटस्फोट होईल कां ? आदि सर्व प्रश्नांची उत्तरे, कुंडलीच्या माध्यमातून, मिळू शकतात.
या अगोदर सांगितलेली, वैवाहिक सुखासाठी आदर्श ग्रहस्थिती, तशी जरा अभावानेच आढळते.
ज्याचे कुंडलीत, सप्तमस्थान, सप्तमेश, लग्न स्थान, लग्नेश, शुक्र-मंगळ हे सर्व ग्रह, उत्तम स्थितीत असतील, तो जातक, निश्चितच, भाग्यवान म्हटला पाहिजे.
बहुतांशी पत्रिकेत, कुठे शुक्र, तर कुठे सप्तम -सप्तमेश, लग्न -लग्नेश, दूषित झालेले आढळून येतात.
त्यामुळे, वैवाहिक सुखाची गुणवत्ता कमी होते. मग कुठे तरी, थोडी फार, तडजोड करावी लागते.
“ विवाह ही तडजोड असते “ असे, यासाठीच म्हटले जाते.
सप्तमस्थान, हे जसे वैवाहिक सुखाचे प्रतिनिधित्व करते, तसेच ते, प्रतिस्पर्धी, उघड शत्रू, जय पराजय दर्शवणारे स्थानहि आहे.
वैवाहिक सुखासंबंधी ,जर ग्रह स्थिती फारच दूषित असेल तर , सप्तम स्थानाच्या या दुसऱ्या बाजूचाहि, परिचय होऊ शकतो.
यावरून, या विषयाची, गहनता किती आहे ?, हे लक्षात येईल.
आता आपण, अगोदर वर्णन केल्यानुसार, वैवाहिक सुखाचे अंतरंग, प्रत्यक्ष जीवनात कसे असतात ? हे , एका दाम्पत्याच्या, कुंडल्यांच्या, माध्यमातून, समजून घेणार आहोत.
💢 जातक कुंडली
जन्मतारीख : 1 ऑगस्ट,1985, जन्मवेळ : संध्याकाळी 17:30
जन्मस्थळ : अकोला.
लग्नेश गुरु, नीच राशीत, धनस्थानात वक्री असून, तो अष्टमेश चंद्रासवे चंद्राच्याच नक्षत्रात आहे.
या चंद्र गुरु युतीवर, पंचमेश / व्ययेश असलेल्या मंगळाची, तसेच भाग्येश रवीची, अष्टम स्थानातून दृष्टी आहे.
▪️ग्रह जरी नीच राशीत असले, तरी ते, जातकाचे स्वरूपाचे बाबतीत, अशुभ फळे देत नाहीत.
▪️ जेव्हा लग्नेश, नीच राशीत असतो, अष्टमेशा सोबत असतो. भाग्येशहि अष्टमात असतो. तेव्हा विकासास बराच अवरोध होतो. जीवन संघर्षमय असते.
▪️योगायोगाने, या कुंडलीत, गुरु, मंगळ, हे जरी नीच राशीत असले, तरी हे दोन नीचराशीत असलेले ग्रह, एकमेकास पहात असल्याने, दोघांचाहि, नीचभंग झालेला आहे.
शनी उच्चराशीत असल्यानेहि, गुरु महाराजांचा, नीचभंग झालेला आहे.
या नीचभंगामुळे, संघर्षात, थोडा दिलासा प्राप्त झाला, असे म्हणता येईल.
▪️लग्नस्थानात, संवेदनशील, भावनाप्रधान, अतींद्रिय शक्ती असलेला नेपच्यून ग्रह, वक्री अवस्थेत, मूळ नक्षत्रात 7 अंशावर आहे.
▪️परिणामी, जातक हळवा, मायाळू, भावनाप्रधान, संवेदनशील स्वभावाचा आहे.
लाभस्थानाचा व कष्टस्थानाचा, स्वामी असलेला शुक्र, सप्तम स्थानात मृग या मंगळाच्या नक्षत्रात, 5 अंशावर विद्यमान आहे.
कष्टस्थान हे, मामा – मावशीचे स्थान असल्याने, जोडीदार, मावशीच्या नात्यातून मिळाला.
सप्तमेश बुध, भाग्यस्थानी असता, विवाहानंतर भाग्योदय होतो, असे असले तरी, भाग्येशाची स्थिती पाहणेहि, तेवढेच महत्वाचे आहे.
तो, जर त्रिकस्थानात असेल, तर शुभ फलाची हानी होते .
सप्तमेश भाग्यात असेल, तर सासर भौगोलिक दृष्ट्या, फार लांबचे संभवत नाही. लाभेश सप्तमात असताहि, सासरचे भौगोलिक अंतर, फार नसते. तसेच, जोडीदाराकडून, आर्थिक लाभ होऊ शकतो.
▪️परिणामी, अल्पकाळाकरिता कां होईना !, जोडीदार नोकरीं करीत होता. मावशीच्या नात्यातून स्थळ होते, व भौगोलिक दृष्ट्या, अंतरहि फार नव्हते.
▪️सप्तमेश बुध भाग्य या शुभस्थानी असला तरी, तो वक्री अवस्थेत, मघा या क्रूर नक्षत्री आहे.
▪️लग्नेश व सप्तमेश, परस्परांशी षडाष्टकयोग करतात. हा अशुभ योग आहे.
▪️शुक्र 5 अंशावर व वक्री क्रूर नक्षत्रातील नेपच्युन 7 अंशावर, हा दृष्टियोग, वैवाहिक सुखाबाबत, निश्चितच भ्रमनिरास करणारा, गोंधळ वाढविणारा योग आहे.
वैवाहिक सुखाची परिणती, संतती लाभात होत असते. त्यामुळे, संततीविचारहि, तेवढाच आवश्यक असतो.
संततिसुख व संततीपासून मिळणारे सुख, या दोन्ही बाबी, आपण पंचमस्थान, पंचमेश व कारक गुरूच्या, कुंडलीतील स्थितीवरून पहातो.
जातकाचे कुंडलीत, पंचमेश मंगळ असून, तो अष्टमस्थानी, अस्तंगत, भाग्येश रवीसह, व अष्टमेश चंद्र, लग्नेश / सुखेश गुरूच्या दृष्टीत, तसेच कुटुंबेश / पराक्रमेश असलेल्या शनीचे दृष्टीत आहे.
पंचमस्थानात, राहू विद्यमान असून, तोहि शनीच्या दृष्टीत आहे.
गुरूच्या दशमात, शनी असता, संतती, अपेक्षा पूर्ण करेलच, याची खात्री नसते.
कारक गुरु नीचभंग योगात आहे. त्यामुळे, ही स्थिती, फार बलवान आहे, असे म्हणता येणार नाही.
▪️अष्टकवर्गात मात्र, पंचमस्थानास 31 असे भक्कम गुण असून, त्यात पंचमेश मंगळाचे 4, सप्तमेश बुधाचे 5, तर लग्नेश व कारक गुरुचे, 6 गुण आहेत.
▪️पंचमस्थान, तसेच पंचमेश मंगळ ज्यात आहे, ते अष्टमस्थान, व कारक गुरु ज्यास्थानी आहे ते कुटुंब स्थान, या तिन्ही स्थानाची, बेरीज केली असता, ती 82 येते. ती 84 पेक्षा जरा कमीच आहे.
▪️परिणामी, जातकास, एक कन्या संतती आहे.
नवांश कुंडली विचार
▪️नवांश कुंडलीत, तूळ हे शत्रूलग्न उदित असून, या कुंडलीतहि, मूळ सप्तमेश बुध, नवांश कुंडली च्या सप्तमात असून, मेष राशीत आहे.
म्हणजे वैवाहिक सुखाबाबत, बुध मंगळ युति असल्यासारखी, असंतोषजनक फळे मिळतील.
अष्टकवर्ग विचार
अष्टकवर्गानुसार, जातकाचे लग्नस्थानास 28 गुण, तर सप्तमस्थानास 27 गुण येतात.
लग्नस्थानाच्या 28 गुणात, लग्नेश गुरुचे 3 गुण, तर सप्तमेश बुधाचे 4 गुण आहेत.
विवाहकारक शुक्राने मात्र, लग्न व सप्तम या दोन्ही स्थानास, प्रत्येकी 5 गुण देऊन, सामंज्यस्य राखले आहे.
सप्तमस्थानासाठी 27, हे 28 पेक्षा निश्चितच कमी आहेत. या 27 गुणात, सप्तमेश बुधाने 6, असे भक्कम गुण दिले असले तरी, लग्नेश गुरूने मात्र 2 च गुण दिले आहेत. ही स्थिती , जोडीदारास, संसार समाधान कारक वाटत असला, तरी जातक मात्र , संसारात, फारसा रमला नाही, हेच दर्शवते.
💢 वरील सर्व कारणे, जातकाचे वैवाहिक सुख, निर्भेळ नाही, याची ग्वाही देतात.
पारंपरिक गुणमेलनानुसार, दोघांचे 24 गुण जुळून, मकर व कन्या असा अनिष्ट नवपंचमयोग होता.
💢 विवाह झाला तेव्हा, जातकाची लग्नेश गुरुची महादशा, कुटुंबेश शनीची अंतर्दशा व लाभेश शुक्राच्या प्रत्यन्तर दशेचा, शेवटचा दिवस होता.
▪️विवाहसमयी, गोचरीने सप्तम स्थांनावरून गुरुचे, व कुटुंबेश मूळ शनिवरून शनीचे, चतुर्थातून शुक्राचे भ्रमण होते.
💢 आता आपण, जोडीदाराची कुंडली पाहू.
जातिका -जन्मदिनांक 03-10-1986
जन्मवेळ : दुपारी 12:30
जन्मस्थळ : खामगाव
ही जातिकेची कुंडली पण धनु लग्नाचीच आहे.
▪️थोडासा, विषयांतराचा दोष पत्करून सांगतो कि, पती व पत्नीचे एक लग्न असू नये, असे मला प्रकर्षाने वाटते. त्याचे कारण असे कि, बरेचदा पती व पत्नी, दोघांच्या वयात, फार अंतर नसते.
अशावेळी, काही दीर्घकालीन ग्रह, जसे शनी, राहू, प्रजापती, नेपच्यून, व काही अंशी गुरु, हे ग्रह दोघांच्याहि कुंडल्यात एकाच भावात येतात. अशी स्थिती बरेचदा, हानिकारक असू शकते.
उदा. याच केसमध्ये, दीर्घकालीन ग्रह नेपच्यून, दोघांच्याहि लग्नस्थानात आल्याने, मनोवृत्ती चंचल, भावनाप्रधान झाल्या आहेत. स्वभावात गुढत्व आले आहे.
त्यातल्या त्यात, जातिकेचे लग्न, मूळ नक्षत्रात असून, 9 अंशावर आहे. तसेच लग्नी असणारा नेपच्यूनहि, त्याच नक्षत्री, त्याच अंशावर आहे.
लग्नबिंदूवर असणारे ग्रह, फळाचे बाबतीत अधिक बलवान ठरतात.
त्यामुळे, जातिकेचा स्वभाव अतिगूढ, आतल्या गाठीचा, एककल्ली, व मनस्थिती विचित्र असणारा, झाला आहे.
▪️चंद्र 9 अंश, व नेपच्यून 9 अंश, हा अंशात्मक केंद्रयोग, या फलात अधिक तीव्रता आणणारा आहे.
लग्नेश गुरु, तृतीय स्थानात, कुंभ या कल्पक राशीत असल्याने, बुद्धीमत्ता, उच्च दर्जाची दर्शवतो.
राशींस्वामी व अष्टमेश चंद्र, आत्माकारक व भाग्येश असलेल्या, रविसह, दशमात, वर्गोत्तम असलेल्या राहूचे दृष्टीत, आहे. राहू -केतू, वर्गोत्तम आहेत. परिणामी, मानसिक अस्थिरता, मनाची व्यग्रता, ही दूषित चंद्राची फळे, तर रवि दूषित झाल्याने, यथोचित मान न मिळणे, जीवनात अपमानास्पद प्रसंग येणे, आत्मबल नसणे, वृथा अभिमान, ही फळे प्राप्त झाली आहेत.
सप्तमेश बुध लाभस्थानी असून, तो स्वराशीच्या शुक्रासोबत असल्याने, व लाभ स्थान, हे मित्रस्थान असल्याने, मैत्रिणीच्या सहकार्याने, विवाह जुळून आला.
लाभातील शुक्राने, सौदर्यदृष्टी, व कलानिपुणता देऊन, आपली कार्यतत्परता दर्शविली आहे.
पंचमेश मंगळ उच्चराशीत, द्वितीय स्थानात असून, त्यांची स्वस्थानावर दृष्टी असल्याने, शिक्षण उत्तम रीतीने होऊन गणित विषयात, प्रवीणता आली आहे.
पण, हा मंगळ, शनीच्या दृष्टीत असून, शनी मंगळ, अन्योन्य योगात आहेत.
त्यामुळे वाचादारिद्र्य आले आहे. या शनीसह, व्ययस्थानात जेष्ठा नक्षत्रातील प्रजापती, या विक्षिप्त ग्रहाच्या युतीमुळे, या योगाची, तीव्र फळे निर्माण होऊन, कौटुंबिक एकोप्यास, खीळ बसली आहे.
▪️ नवांश कुंडलीत, मिथुन लग्न उदित असून, मूळ सप्तमेश बुध, कष्टस्थानी, वृश्चिक या शत्रुग्रहाचे राशीत आला आहे.
म्हणजे जातिकेच्या कुंडलीतहि, वैवाहिक सुखा- बाबत, बुध मंगळ युति असल्यासारखी, असंतोषजनक फळे मिळतील,यास दुजोरा मिळतो.
▪️या कुंडलीत, अष्टकवर्गानुसार विचार केला असता, लग्नस्थानास 29 व सप्तमस्थानास 28 गुण आहेत. लग्नस्थानास, लग्नेश गुरूने 3, तर सप्तमेश बुधाने 6 गुण दिले आहेत.
सप्तमस्थांनास, सप्तमेश बुधाने 4 व लग्नेश गुरूनेहि, 4 च गुण दिलेले आहेत.
विवाहकारक शुक्राने, लग्नास 6, तर सप्तमास 5 गुण दिलेले आहेत.
ही स्त्रीपत्रिका असल्याने, मंगळाचाहि विचार, व्हावयास हवा. मंगळाने मात्र, लग्न स्थानास 3 तर सप्तमास, फक्त 2 गुण दिले आहेत. मंगळाची ही स्थिती, शुभकारी म्हणता येणार नाही.
विवाहसमयी, जातिकेची, राहूची महादशा सप्तमेश बुधाच्या अंतर्दशेत, लाभेश शुक्राची, प्रत्यन्तरदशा सुरु होती.
संततीसुखाचा विचार केला असता, जातिके चा पंचमेश मंगळ, उच्चराशीला असून, कुटुंब स्थानातून त्यांची दृष्टी, पंचमस्थानावर आहे. हा मंगळ नवांशा तहि, त्याचराशीत असल्याने वर्गोत्तम झाला.
या वर्गोत्तम मंगळावर, शनीची दृष्टी आहे. ही स्थिती मात्र समाधानकारक म्हणता येणार नाही.
कारक गुरुहि, कुंभ या अल्पप्रसव राशीस आहे.
याहि कुंडलीत, गुरूच्या दशमात,शनी महाराज आहेत. पती -पत्नी, दोघांच्या कुंडलीत, हा योग असणे, चांगले नाही.
अष्टकवर्गात, पंचमस्थानास, फक्त 20 गुण आहेत. ते फार कमी होतात. या 20 गुणात स्वतः पंचमेश मंगळाचा, फक्त 1 गुण आहे. सप्तमेश बुधाचे 3, तर लग्नेश व कारक गुरुचे 5 गुण आहेत.
पंचमस्थान, पंचमेश द्वितीयात आहे म्हणून द्वितीयस्थान, कारक गुरु ज्यास्थानी आहे ते तृतीय स्थान, या 3 स्थानांची, बेरीज केली असता, ती 78 येते. ही 84 पेक्षा निश्चितच कमी आहे.
थोडक्यात, जातिकेच्या कुंडलीत, संतती सुखाची स्थिती, समाधानकारक नाही.
पारंपरिक गुणमेलनानुसार, जरी 24 गुण जुळत होते, तरी आधुनिक गुणमेलनानुसार, जातिकेचे 38, तर जातकाचे 58, असे दोघाचे मिळून, 96 गुण येतात. हे 108 पेक्षा, निश्चितच कमी आहेत.
▪️आधुनिक गुणमेलन, ग्रहांच्या उच्चराशीं, मूल त्रिकोण राशीं , स्वराशी, मित्रराशीं, शत्रूराशीं, नीचराशीं, या वर्गीकरणावर अवलंबुन असते.
जातकाच्या, गुरु व मंगळ या दोन ग्रहांचा, नीचभंग झालेला आहे. हे दोन्ही ग्रह, अनुक्रमे, लग्नेश व पंचमेश असे महत्वाचे, भावेश आहेत. आधुनिक गुणमेलनात, नीचभंग झालेल्या ग्रहाचे, गुण किती मोजावेत ? हा संशोधनाचा विषय होईल. यावर विचार करणे, गरजेचे आहे, असे मला वाटते.
या दोन्ही कुंडल्याबाबत, विचार केला असता, स्वभाववैचित्र्यामुळे, जीवनात, तणाव निर्माण होऊन, रडत- रखडत, संसार चालला आहे, असे म्हणावे लागेल.
खरे म्हणजे, ज्योतिष्य विषयासंबंधी व्यासपीठावर बोलण्याची, ही माझी पहिलीच वेळ आहे. आता पावेतो, कधीहि, कागद हातात घेऊन, मी व्याख्यान दिलेले नाही. त्यामुळे थोडे अवघडल्या सारखे वाटणे हे साहजिक आहे.
एक घास 32 वेळा चावून खाणे, जसे थोडे अवघड होते, तशीच थोडीफार, माझी अवस्था आहे.
दुसरे असे कि, पालक जेव्हा आपल्याकडे, विवाहाच्या संदर्भात, कुंडल्या घेऊन येतात, तेव्हा, त्यांनी रंगरूप, नोकरीं स्थावर, या सर्व व्यावहारिक बाजू, पाहिलेल्याच असतात.
जे त्यांना दिसत नाही, वा कळत नाही, ते पाहण्या च्या दृष्टीने, ते आलेले असतात.
त्यामुळे, कुंडलीत काय वैगून्ये आहेत ? हे त्यांना सांगावे लागते. व हळू हळू नेमके वाईट काय ? इकडेच प्रथम पाहण्याची, ज्योतिष्याच्या दृष्टीला सवय होते. त्यामुळे, वैवाहिकसुखाची, वाईट बाजूच चांगल्या त-हेने, विवेचित केली जाते.
शुद्ध वैवाहिकसुख, तसे दुर्मिळच म्हटले पाहिजे.
संसार म्हटला, कि भांड्याला भांडं लागणारच व आवाज होणारच. थोडे फार, रुसवे- फुगवे, संसारात असावेच लागतात.
त्याशिवाय संसाराला, गोडी येत नाही, हे जरी खरे असले, तरी हे सर्व, माफक प्रमाणात असावे. अशी रास्त अपेक्षा करण्यात, काही गैर आहे, असे मला वाटत नाही.
वैवाहिक जीवनाचे, दुसरे नाव “ तडजोड “ आहे. हे निर्विवाद सत्य आहे.
आदरणीय गुरुवर्या, डॉ .सौ.ज्योती जोशी मॅडम, यांनी मला, या व्यासपीठावर बोलण्याची, संधी उपलब्ध करून दिली याबद्दल, मी त्यांचा ऋणी आहे.
या विषयांचे विवेचन करताना, अनावधानाने, माझ्याकडून, जर काही चुका झाल्या असतील, तर मी आपला क्षमाप्रार्थी आहे. सर्व ज्योतिषप्रेमीना माझा सादर नमस्कार. 🙏 जय महाराष्ट्र! जय ज्योतिष्य!!🙏
Comments
Post a Comment