पितृऋणमुक्ती -संतानप्राप्ती

 

  


     

💢  पितृ ऋणमुक्ती संतानप्राप्ती 💢

        व्यक्तीने गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर त्याची पुढची पायरी म्हणजे संतान प्राप्ती होय. आपण ज्या कुळात जन्म घेतो. त्या कुळाचे नाव, पुढे पिढ्यान पिढ्या चालू राहावे यासाठी, आपण त्या कुळास संतती उत्पत्ती करून  वारसदार द्यावा म्हणजे पितृऋण  फेडले जाते, अशा प्रकारची धारणा असल्याने, जोपर्यंत संसार वेलीवर फूल उमलत नाही तोपर्यंत, व्यक्तीस समाधान लाभत नाही.

                  स्त्रियांच्या बाबतीत मातृत्व हा त्यांचा हक्क असल्याने जोपर्यंत, मातृत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत, जणू जन्मच सफल झाला नाही. अशी स्त्रियांची भावना असते. त्यामुळे घरात, जोपर्यंत पाळणा हलत नाही तोपर्यंत, कुटुंबात समाधान नसते. थोडक्यात, संततीप्राप्ती हा जीवनातील एक महत्त्वाचा योग आहे.

        विवाहासाठी गुणमेलन करतांना, सर्वप्रथम नाडीचाच विचार केला जातो . पारंपारिक गुणमेलनात,  नाडीस महत्तम 8 असे गुण असल्याने,  नाडीदोषास किती महत्त्व आहे  हे स्पष्ट होते . वधू-वरांची एकनाडी असता, विवाहास मान्यता दिली जात नाही.

                नाडी विचार केल्यानंतर,  प्रथम लक्ष द्यावे लागते, ते पंचमस्थानाकडे.  संततीप्राप्तीचा योग आपण कुंडलीच्या पंचमस्थानावरून पाहतो. पंचमस्थान शुभ प्रभावात आहे का? कुंडलीतील पंचमेशाची अवस्था कशी आहे? षडवर्गबलात, तसेच नवमांश कुंडलीत  त्याची कशी स्थिती आहे.? पंचमस्थानात पापग्रह आहेत कि शुभ ग्रह? ते कोणत्या भावाचे स्वामी आहेत?  तसेच कुंडलीत गुरु महाराज हे शिक्षण व संततीचे कारक असल्याने, त्यांची कुंडलीतील  स्थिती फारच महत्त्वाची असते. पंचम स्थान व पंचमस्थानाशी संबंधित ग्रह, त्यांचे शुभत्व किती आहे, तसेच संततीचे कारक गुरु महाराज, वक्री, स्तंभी, अस्तंगत नीच /उच्च /स्वराशीत / मित्र राशीत /, शत्रू राशीत आहेत का? पंचमस्थान, पंचमेश पापकर्तरीत आहेत का? पंचमेश व कारक गुरू महाराजांची दृष्टी  पंचमस्थानावर आहे का? इत्यादी सर्व बाबींचा प्रामुख्याने अभ्यास करावा लागतो.

             तसेच संतति हा विषय पती व पत्नी या दोघांचा असल्यामुळे, दोघांच्याहि कुंडल्यांचा अभ्यास करणे  क्रमप्राप्त असते. संतती हा विषय, संतती प्राप्त होईल का? तसेच तिच्यापासून सुख मिळेल का? अशा दोन बाबीतून विभागला जातो.

          संतती मुळीच प्राप्त न होणे, झाल्यास लुळीपांगळी, व्यंगाची होणे, मतिमंद संतती निपजणे, संततीचा उपजत मृत्यू होणे, वा तिच्या तरुणपणातच अपघाताने निधन होणे ,संतती झाल्यानंतर तिचे  अकाली निधन होणे, संतति दुर्गुणी निपजणे, संततीच्या कृत्यामुळे, पोलिस स्टेशन व कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागणे  वा उत्तम संतती होऊनहि,  तिचे शिक्षण दुसरीकडेच होणे, नोकरी-व्यवसायासाठी परदेशी जाणे व तिकडेच रममाण होणे, यालाहि आपण संततीसुख नाही, असे म्हणू शकतो.

         स्त्रियांचे बाबतीत वंध्यायोग आहे का ? काकवंध्यायोग आहे का? या बाबी प्रामुख्याने पहाव्यात, बरेचदा मासिक पाळी अनियमित, वा गर्भाशयामध्ये काही त्रास असणे, गर्भाशयाचे मुख्य बंद असणे, अशा शारीरिक व्याधी असल्यास, संतती प्राप्त होतांना अडचणी येतात. एक दोन केसेस मध्ये ज्यांना रजोदर्शन होतच नाही, अशाहि स्त्रिया पाहण्यात आलेल्या आहेत.  आज-काल विज्ञानाच्या प्रगतीमुळे, अशा संकटांवर मात करता येते.

             पुरुषाच्या बाबतीत मात्र नपुंसकत्व, शुक्राणू अल्पजीवी असणे, वा त्यांची संख्या खूप कमी असणे,  या दोन बाबी संततीसुखात व्यत्यय आणणाऱ्या ठरतात. यातहि विज्ञानाने बरीच प्रगती केली असून, योग्य वेळी, योग्य उपचार केल्यास, संततीप्राप्त होऊ शकते.  विवाह झाल्यानंतर, अपेक्षेनुसार संततीस वेळ होत असल्यास, निश्‍चितच, वैद्यकीय निदान करणे फायदेशीर ठरते.

            💢 स्त्रियांच्या बाबतीत शुक्र -मंगळ, चंद्र-मंगळ, चंद्र -शुक्र या ग्रहांचा युतीयोग व दृष्टीयोग असल्यास, स्रिची मासिक पाळी अनियमित असते. शुक्रमंगळ युतीत, बरेचदा गर्भाशयात गाठी आढळतात. पंचमात शनीमहाराज असता, ते जर दूषित नसतील तर, विलंबाने संतती होते. या शनीमुळे दोन संततीमध्ये, बरेच वर्षाचे अंतर असू शकते. पंचमातील दूषित प्रजापती गर्भाशयात व्यंग  दर्शवितो. पंचमात शनी -मंगळ, मंगळ -राहु, नुसताच राहू असणे, यामुळे संतती होताना सिझरिंग, ऑपरेशनची संभावना असते. पंचमात रवि असताहि संतती होताना त्रास होतो.  पंचमात शुक्र असेल, तर बहुदा प्रथम संतान कन्या होते. हे निदान सहसा चुकत नाही. पंचमात जुळीरास असून  पंचमेश व गुरु हेहि जुळ्या राशीस असल्यास जुळी संतती होऊ शकते. मिथुन, धनु, मीन या जुळ्या राशी मानतात. विशेषतः स्त्रियांच्या कुंडलीत,  पंचमात मीनेचा शुक्र असता, जुळ्या मुली होण्याची शक्यता बरीच वाढते. जोडीदाराचा पंचमेश व पंचमस्थान व गुरुहि जुळ्या राशीस असेल, तर हमखास जुळ्या संततीची प्राप्ती होते. पंचमस्थानावरुन प्रथम संतती, सप्तम स्थानावरुन दुसरी संतती, व भाग्यस्थानावरुन तिसरी संतती पाहतात. ज्यास्थानात पापग्रहांचे अधिष्ठान असेल व तो स्थानस्वामीहि दूषित असेल त्या क्रमांकाच्या संततीच्या वेळेला त्रास होऊ शकतो. स्थूलमानाने पंचमात अग्नीराशी असता संततिचे  प्रमाण अत्यल्प असते. जलराशी मात्र बहूसंतती कारक मानतात. धर्म त्रिकोणात व लाभस्थानात गुरु महाराज असता पंचम स्थानात पापग्रह असले तरी, कष्टसाध्य संतती होऊ शकते.

            पुरुषाचे बाबतीत शुक्र राहूने, दूषित असणे, लग्नेश व्ययात वा अष्टमात असणे. सप्तमेश व्ययात असणे. सप्तमस्थानी बुध, शनि, नेपच्यून असून ते मूळ मृग शततारका या नक्षत्ऱी असणे. रवि शुक्र अंशात्मक युतीत असणे, चंद्र मकर राशीत असणे. सप्तमेश अस्तंगत असणे या बाबी संततीस अडचणी आणणाऱ्या ठरू शकतात. सप्तमात शनी चंद्र असता व्यक्ती अल्पवीर्य असू शकते.

            परंतु केवळ एखाद-दुसऱ्या योगावरून असे निदान करणे, धोक्याचे ठरू शकते. जेव्हा बरेचसे योग, आपल्याला कुंडलीतून दिसतात तेव्हाच या अंगाने कुंडलीचा विचार करावयास हवा.

        जर कुंडलीत शनी चंद्र युती विशेषतः अंशात्मक योगात असेल तर, अशा जातकाच्या जीवनात, मानसिक स्वास्थ्य नसते. हा वीषयोग, विरक्तीयोग, पुनरफूयोग  मानला जातो. हा योग अप्रत्यक्षपणे संतती विरोधक आहे, असे म्हणता येईल. कारण ज्या घरात संतती नसते. तिथे संतती नसल्याचे शल्य नेहमी बोचत राहते. यासाठी मात्र पंचमस्थान नकारात्मक असावे.

            बरेचदा ज्यांच्या कुंडलीत शनी -चंद्र युतीयोग वा दृष्टीयोग असतो, त्या जातकांना सर्व मुलेच असतात. कारण चंद्र हा स्त्रीग्रह असून तो शनीने दूषित असल्याने, जीवनातील आई, बहीण, पत्नी , मुलगी, यांच्या सुखाकरिता शुभ नसतो.

     कुंडलीत गुरू जर राहूने दूषित असेल वा पंचमेश राहूयुक्त असेल, तर बहुदा कन्यासंतती अधिक असते.  असे असता, संतती दत्तक घेण्याचे योगहि बलवान ठरतात. अशा जातकास मानसपुत्र असण्याचीहि शक्यता असते.

          थोडक्यात संततीसाठी केवळ पंचमस्थानाचाच विचार करून भागत नाही. सर्व साकल्याने पूर्ण कुंडलीचाच विचार करावा लागतो. प्रत्येक ग्रह किती बलवान आहे? यासाठी नवमांश कुंडलीचा विचार केला जातो. नवमांश कुंडलीत गुरू महाराज व पंचमेश  कितपत बलवान आहेत हे पाहणेहि अगत्याचे ठरते. संतती कऱीता सप्तमांश कुंडलीचाहि विचार करावा लागतो. मूळ पंचमेशाची स्थिती, मूळ पंचमस्थानाच्या, पंचमस्थानातील ग्रहांची स्थिती, गुरु महाराजांची स्थिती, या कुंडलीतून पाहणे आवश्यक ठरते.

           💢 वैदिक पद्धतीने वरील सर्व बाबीचा विचार करुन, नंतर  अष्टकवर्गातून पंचम स्थानास मिळालेले गुण, पंचमेश ज्यास्थानी आहे त्यास्थानाचे गुण, व कारक ग्रह गुरु महाराज, ज्यास्थानी आहेत त्या स्थानाचे गुण, यावरूनहि संततीसुखाचे निदान केले जाते. या तिन्ही स्थानांची बेरीज 84 पेक्षा अधिक असावी.

💢संततिसुख या विषयाची व्याप्ती बरीच मोठी आहे. एका लेखात सर्व बाबींचा समावेश करणे शक्य नाही. तूर्त येथेच थांबू.

                                                              वरील लेख  " भविष्य दर्पण "- फेब्रुवारी 2022 च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.=



 

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली