क्रूर नक्षत्री ग्रह व अभुक्त मूळ

             ⚛️ क्रूर नक्षत्रातील ग्रह व अभुक्त मूळ ⚛️

 आपल्या क्रांतीवृत्ताच्या कक्षेत 12 राशी, तसेच 27 नक्षत्रे येतात. प्रत्येक नक्षत्राचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे आहे. एका राशीत एकंदर 9 चरणे असल्याने व एका नक्षत्रात 4 चरणे असल्याने, सव्वा दोन नक्षत्र मिळून एक राशी बनते.

 अवकहडा चक्रात पाहिले असता, काही नक्षत्रांची काही चरणे एका राशीत व काही चरणे, दुसऱ्या राशीत येतात.

 या नक्षत्रचक्रात काही नक्षत्रे, क्रूर मानली गेली आहेत. जसे मेष राशीत अंतिम चरणी सुरू होणारे  कृतिका नक्षत्र वृषभेचे प्रथम 3 चरण घेऊन संपते.

 त्यानंतर मिथुनेतील आर्द्रा नक्षत्र, कर्केतील आश्लेषा नक्षत्र, सिंह राशीचे मघा नक्षत्र, वृश्चिक राशीतील ज्येष्ठा नक्षत्र व धनु राशीतील मूळ नक्षत्र यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

💢 त्यात मूळ नक्षत्राचे आगळे वेगळे वैशिष्टय म्हणजे हे " नपुसक " नक्षत्र आहे. धनु राशीत, गुरु मूळत्रिकोण राशीत असतो. त्यामुळे गुरु राशींबली असल्याने, गुरु ज्या भावात असेल, तो भाव बलवान मानला जाईल. पण तो जर धनु राशीत,  13 अंश 20 कलेच्या आत असेल, तर तो मूळ नक्षत्रात असल्याचे लक्षात येईल. मिथुन लग्न असता, सप्तमेश सप्तमात असल्याने, सप्तमस्थान बलवान भासेल. पण गुरु क्रूर व नपुसंक नक्षत्री असल्याने, विवाह सफल होईलच, याची शाश्वती असणार नाही. संतती स्थानहि दुर्बल असेल,  तर संतती सुख मिळेलच असे नाही. पुरुषाचा शुक्र, व स्त्रीचा मंगळ दुर्बल असता, वैवाहिक सुखातहि न्यूनता निर्माण होऊ शकते. अशा बाबतीत सर्वं ग्रहस्थितीचा आढावा घेऊन, निदान करणे केव्हाहि श्रेष्ठ असते.

💢 क्रूर नक्षत्रात असलेले ग्रह नकारात्मक फळे देत असल्याने, त्यांचा नेहमी काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा.

💢 काही पुस्तकातून कन्येतील चित्रा नक्षत्राची 2 चरणे ( स्वामी मंगळ असल्याने ) अशुभ मानली आहेत. तर काही ठिकाणी, विशाखा नक्षत्र अशुभ असल्याचा उल्लेख सापडतो. ( हे तुला राशीत सुरु होऊन, नक्षत्र स्वामी गुरु असल्याने, शुक्र -गुरु यांची मैत्री नसल्याने, कदाचित अशुभ मानत असावेत )

💢 रेवती -आश्विनी, आश्लेषा -मघा , जेष्ठा -मूळ या 3 नक्षत्र जोड्यांचा बाबतीत प्रकर्षाने लक्षात येते की, एका नक्षत्राचा स्वामी बुध असून,  दुसऱ्या नक्षत्राचा स्वामी केतू आहे. आपण केतूस मन्गळा सम मानत असल्याने, बुध व केतू हेहि एकमेकांचे कट्टर शत्रू मानावे लागतील.

या दोन नक्षत्र स्वामींचा वैरभाव लक्षात घेऊन, आपल्या पूर्व सु्रींनी या नक्षत्र गंडातांची व लग्न गंडातांची आखणी केली असावी, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

💢 लग्न बिंदू जर, लग्नराशीच्या वरील क्रूर नक्षत्राच्या अंशात असेल तर सहसा बाळाचा जन्मवेळी आईस भयंकर त्रास वा बाळाचा जन्म सीझेरियननी झालेला असतो. हे निदान सहसा चुकत नाही.

💢 कोणत्याहि कुंडलीत 4,  वा त्यापेक्षा अधिक ग्रह क्रूर नक्षत्रात असता, ( मग ते कोणत्याहि भावात असोत ), त्या व्यक्तीस आरोग्य पीडेचा त्रास जास्त जाणवणारा असतो. ( व्यावहारिक भाषेत  कुंडलीत एकूण 12 ग्रह असतात. त्यात क्रूर ग्रहांचे प्रमाण 33 टक्क्यापेक्षा अधिक असणे खूप पीडादायक असते.)

💢 पारंपरिक गुणमेलन तक्त्यात जी नक्षत्रे उग्र, तीक्ष्ण आहेत, त्यात वधू -वर यांचा जन्म झाला असता "नक्षत्रदोष " म्हणून संकेत दिला जातो.

💢 ही नक्षत्रे अत्यंत उग्र व क्रूर फल देणारी असल्यामुळे, या नक्षत्रात जर कुंडलीतील ग्रह असले तर, त्यांची क्रूर व उग्र फले विशेषत : शरीर स्वास्थ्याचे बाबतीत, मिळण्याची शक्यता जास्त असते.

💢 कोणताहि ग्रह जर स्वराशीत व उच्च राशीत असेल तर, आपण त्यास  शुभ फळदाता मानतो.

💢परंतु तो स्वराशीचा होऊनहि, जर या वर दर्शविलेल्या क्रूर नक्षत्रात असेल, तर शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने उग्र फळे देऊ शकतो.

💢  यावरून ग्रहाच्या अंशाचा विचार करताना, तो ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे ? हे पाहणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. उदाहरणार्थ ▪️ मेष राशीत रवि उच्च असून मंगळ स्वराशीचा असतो ▪️ वृषभेत शुक्र स्वराशीचा असून, चंद्राची ती उच्च राशी आहे ▪️  मिथुन ही बुधाची स्वराशी असून,  केतू येथे नीच राशीचा मानतात ▪️ कर्क राशी ही चंद्राची स्वरराशी असून, गुरुची उच्च राशी व मंगळाची नीच राशी आहे. ▪️  सिंह ही रविची स्व- मूल त्रिकोण राशी आहे .▪️  वृश्चिक राशीत मंगळ स्वराशीचा व चंद्र नीचेचा होतो ▪️ धनु राशीत गुरु स्वराशीचा व राहू नीच राशीचा मानतात. या ग्रहांच्या अंशाचा विचार केला असता, हे ग्रह वर दिलेल्या राशीनिहाय, क्रूर नक्षत्रात असतील, तर ते शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने निश्चितच अपायकारक राहतील.

💢 आजाराचा विचार करताना, प्रामुख्याने, षष्ठस्थानाचा व षष्ठेशाचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे, षष्टस्थानात जे ग्रह विराजमान असतील त्यांचाहि विचार होतो. परंतु केवळ शष्ठ स्थानावरच सर्व आजार अवलंबून असतात, असे नाही. अशुभ व कुंडलीस अकारक असलेल्या ग्रहांचे दृष्टीयोग व युत्या, जर क्रूर नक्षत्रात असतील तर, त्या ज्या भावात आहेत, त्या भावाच्या कारकत्वाच्या दृष्टीने, वा त्या ग्रहाच्या कारकत्वाच्या दृष्टीने, तसेच ते ग्रह ज्या ग्रहाँना पहात असतील, त्यांच्या कारकत्वाच्या दृष्टीने, आरोग्य पीडेची संभावना असते.

💢 म्हणूनच फलादेशाचा विचार कसा करावा ? याबाबत,  मार्गदर्शन करताना वारंवार सांगितले जाते की, फक्त एखाद्या ग्रहाकडे वा ग्रह स्थितीकडे, पाहून चालत नाही. कुंडलीच्या सर्व भावांचा व ग्रह स्थितीचा, ग्रहाचे व भावाचे कारकत्व ग्रहाची राशीगतस्थिती, वक्री, मार्गी, अस्तंगत्व , त्याची नवांशगत स्थिती, त्या ग्रहांची इतर स्थानावर पडणारे दृष्टी, तसेच इतर ग्रहांची त्या ग्रहांवर पडणारी दृष्टी, दृष्टी टाकणाऱ्या ग्रहांचे कारकत्व, भावेशत्व, असा सर्वांगीण विचार करावा लागतो.

💢 काही विशिष्ट 2 नक्षत्रांचा जोड ( संधिकाल ) हा अशुभ मानला जातो.

जसे रेवती नक्षत्राचा शेवटचा तास तसेच अश्विनी नक्षत्राचा पहिला तास,  या काळात जन्म झाला असता,  नक्षत्रगंडांत मानण्यात येते. याच बेसवर आश्लेषा -मघा , जेष्ठा -मूळ यांचा संधिकाल नक्षत्रगंडांत मानण्यात येतो. 💢 यात जेष्ठा व मूळ या दोन नक्षत्रांचा संधिकाल हा अतिउग्र मानण्यात येतो. त्यास " अभुक्त मूळ नक्षत्रगंडांत " असे म्हणतात.

💢 याच धर्तीवर, लग्न गंडांतहि सांगितले जातात. ही नक्षत्रे, राशीत ज्या अंशावर असतात. ती रास, जर लग्नराशी असेल व लग्नबिंदू त्या नक्षत्राच्या अंशावर असेल तर त्यास " लग्न गंडांत " मानण्यात येते.

💢 वरील तत्वाप्रमाणे, वृश्चिक लग्न संपत येणारा व मूळ लग्न सुरु असा लग्न संधिकाल हा " अभुक्त मूळ लग्न गंडांत " मानण्यात येतो. यानुसार,  वृश्चिक लग्न 23 अंश 21 कलेपासून ते धनु लग्न 6 अंश 40 कला पर्यंत, या काळात बाळाचा जन्म झाल्यास,  तो " अभुक्त मूळ लग्न गंडांतात "  झाला,  असे समजावे.

💢 ही, अभुक्त मूळ लग्न गंडातांची संकल्पना, कितपत सार्थ आहे ?, हे पाहण्यासाठी, मी माझे संग्रहातील  वृश्चिक व धनु लग्न कुंडल्यांचा शोध घेतला. त्यात बऱ्याचशा कुंडल्यामध्ये, मला हे गंडांत आढळून आले. व त्यांना, आरोग्याबाबत खूप त्रास झाला असल्याचे जाणवले.

💢 " अभुक्त मूळ लग्न गंडांतात जर बाळाचा जन्म असेल, तर आरोग्य विषयक पीडा तीव्रतम स्वरूपाची असते.

अर्थात, त्या पीडेला कारणीभूत  होणारी इतर ग्रहस्थिती, त्या कुंडलीत असतेच. पण या लग्न गंडांतामुळे,   ती पीडा अधिक उग्र रूप धारण करताना दिसते.

 उदाहरणादाखल अभुक्त मूळ लग्न गंडांतात जन्मलेल्या, अशा दोन या जातिकांच्या  कुंडल्यांचे विवरण इथे देत आहे. 

(1) जातिका जन्मतारीख 21 सप्टेंबर 1982 जन्मवेळ :12:25, जन्मस्थळ : अकोला



(2) ही वृश्चिक लग्नाची कुंडली आहे. लग्नबिंदू ज्येष्ठा नक्षत्रात असून, स्पष्ट लग्न 28 अंश 20 कला 41 विकला येते. त्यामुळे ही अभूक्त मूळ लग्न गंडांताची पत्रिका आहे.

 या पत्रिकेत नेपच्यून मूळ नक्षत्री, राहू आर्द्रा नक्षत्री, शनि -बुध चित्रा नक्षत्री, चंद्र विशाखा नक्षत्री आहे. लग्नी मंगळ व प्रजापतीची अंशात्मक, प्रत्येकी 7 अंशावर युती असून, या युतीवर, लाभातील, चित्रा नक्षत्रातील, शनीची पूर्ण दृष्टी आहे. लग्न किंवा सप्तमात मंगळ -हर्षलाची अंशात्मक युती असेल, तर वैवाहिक जीवनात वादळे तसेच, अपघात, ऑपरेशन याची शक्यता बळावते. या युतीवर शनीची दृष्टी असणे म्हणजे, एक प्रकारे अशुभाची वाढ होय. कुंडलीच्या व्ययस्थानात असलेली चंद्र गुरु युति, विरहयोग दाखवते . लग्नेश लग्नी, व तुळेचा चंद्रामुळे, जातिका सुंदर आहे, हे लक्षात येते. सप्तमेश शुक्र, जरी सिंह या राजराशीत असला तरी, शुक्र जलग्रह असल्याने अग्नीराशी त्यास फारशी मानवत नाही. प्रचलित नियमाप्रमाणे ही कडक मंगळाची पत्रिका आहे.  मंगळ जसा लग्नेश आहे, तसाच तो कष्टेशहि आहे. शनि -प्रजापतीने दूषित झालेल्या, मंगळाची आठवी दृष्टी, क्रूर नक्षत्रातील राहूवर आह. यामुळे, या जातिकेस त्वचाविकार झाला. अष्टमातील राहूची पंचमदृष्टी चंद्रावर असल्याने, व तसेच, चंद्र -गुरु, मंगळ शनीच्या पापकर्तरीत असल्यामुळे, श्वेतकुष्ठ विकाराने जातिकेचे सौंदर्य बाधित होऊन, सौंदर्यास गालबोट लागले. मंगळ-प्रजापती अंशात्मक युतीमुळे, जोडीदाराचा स्वभाव विक्षिप्त, लहरी असून, त्याची भ्रमरवृत्ती असल्याने, कौटुंबिक तणाव निर्माण झाला. कुटुंबेश गुरू व्ययस्थानात असल्याने, कुटुंबात फारसा सलोखा राहिला नाही. पती-पत्नी दोघांच्याहि नोकऱ्या, वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने, चंद्र -गुरु विरहयोगास खतपाणी मिळाले. पंचमेश- कुटुंबेश गुरु, व्ययस्थानी, शत्रूराशीत व शनी- मंगळाच्या, पापकर्तरीत असल्याने, विवाहोपरांत 12 वर्षांनी, कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल होऊन, कन्या संतती झाली. गुरु महाराज दर 12 वर्षांनी राशीचक्र पूर्ण करतात. त्यामुळे या विरहयोगानी, 12 वर्षाचा विरहयोग घडवून आणला असे म्हणणेहि संयुक्तिक होईल.

💢 जातिका -जन्मतारीख -19 ऑक्टोबर,1950 जन्मवेळ -11:00 जन्मस्थळ – अकोला



 या जातिकेचे स्पष्ट लग्न, 4 अंश 15 कला 6 विकलावर असल्याने, ते अभूक्त मूळ लग्न गंडातात मोडते . लग्नबिंदू मूळ नक्षत्रात, व्ययेश मंगळ व्ययात ज्येष्ठा नक्षत्रात, सप्तमात वक्री प्रजापती आरद्रा नक्षत्रात, दशमात शनी- नेपच्यून चित्रा नक्षत्रात  आहेत. चंद्र मात्र पुष्कर नवांशात आहे.  प्रचलित नियमाप्रमाणे ही सुद्धा कडक मंगळाची पत्रिका आहे.

▪️  लग्न द्विस्वभाव राशीचे असणे, सप्तमेश बुध अस्तंगत असून, त्यासोबत नीचभंग योगातील शुक्र, क्रूर नक्षत्रात, अस्तंगत असणे, विलंब व अडथळ्याचे कारक शनी महाराज तसेच, भ्रम -गोंधळ करणारा नेपच्यून, क्रूर नक्षत्रात असणे, बुध -शुक्र -शनि -नेपच्यून यावर राहूची दृष्टी असणे, हे सर्व ग्रहयोग विवाहामध्ये अडचणी व विलंब दर्शवितात. रवि नीचराशीत, तसेच क्रूर मंगळाची, क्रूर हर्षलवर आठवी दृष्टी, या योगामुळे विवाह ठरवितांना, अडचणींची खूपच वाढ झाली. लग्नेश गुरुची सप्तमावर दृष्टी असल्याने, तसेच अष्टक वर्गात विवाह स्थानास 28 गुण असल्याने, उशिरा का होईना ! विवाह संपन्न झाला.

 उतारवयात या जातिकेस स्थन कॅन्सर झाला.  या आजाराचे निदान करताना, चतुर्थ व दशम ही दोन स्थाने खूप महत्त्वाची असतात. चतुर्थेश गुरु स्वव्ययात, शनीचे राशीत असून, वक्री अवस्थेत आहे. त्यावर व्ययेश मंगळाची दृष्टी येते. चतुर्थात राहू हा पापग्रह असून, तो 5 अंशावर आहे. त्यावर दशम स्थानातील 3 अंशावर असणाऱ्या शनीची पूर्ण दृष्टी आहे. शनि व राहू दृष्टीयोग, व युतीयोग अत्यंत नुकसानकारक समजला जातो. तसेच, शनि महाराज वयस्कर ग्रह असल्याने, त्यांचा प्रभाव उतार वयात अधिक दिसतो. या शनी महाराजांची मंगळावर दृष्टी, तसेच मंगळ -हर्षल षडाष्टक योग, हे ऑपरेशनची सूचना देतात. त्यानुसार, ऑपरेशन, परीक्षणे केमोथेरपी,  असे अनेक उपाय केले. त्यामुळे, थोडे आयुष्य वाढले पण, वेदनाहि तेवढ्याच प्रमाणात वाढल्या. सरतेशेवटी दिनांक 31 ऑगस्ट 2015 रोजी, रात्री 9 वाजता जातिकेचे देहावसान झाले.

 लग्नेश स्थिरराशीत असून, अष्टमेश चर राशीत असता, मध्यमायु योग होतो. अष्टक वर्गाचा विचार केला असता, यांना लग्नस्थानी 30 गुण, तर कष्ट स्थानी 32 गुण, व अष्टमात 36 असे भक्कम गुण दिसतात. या 3 स्थानांची तुलना केली असता, जातिकेचे जीवनात, पीडाकारक योग होते तसेच, आयुष्याची हानी करणारे योग होते, हे दिसून येते. मृत्यूकालीन कुंडलीचा विचार केला असता, त्यावेळी रवि सिंहेत 64 व्या नवांशात होता.

 तात्पर्य, अभूक्तमूळ लग्न गंडातांची कुंडली असता, कुंडलित जर पीडाकारक योग असतील तर, या लग्नगंडांतामुळे, त्यासंबंधीचा त्रास अधिक प्रमाणात झालेला दिसून येतो. तो त्रास सुसह्य व्हावा, या दृष्टीनेच, शांतीपूजेचे आयोजन केलेले असावे, असे म्हणावयास हरकत नाही.


💢 भविष्य दर्पण नोव्हेंबर 2022 या मासिकात हा लेख प्रकाशित झाला आहे.

= पुंडलिक दाते, ज्योतिष्य अलंकार, अकोला. मो. क्र.9421755299


Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली