मागे वळून पहाताना

 

मागे वळून पहाताना  ( एक मुलाखत )

०१) श्री ज्योतिष संशोधन केंद्र या आपल्या संस्थेबद्दल संस्थेच्या कार्याबद्दल आपल्याला काय वाटतं?

💢 बदलत्या काळानुसार, कुठलेहि शिक्षण, विनामूल्य व घरबसल्या मिळत नाही. ज्योतिष शास्त्र तर एक अत्यंत उपयोगी, भविष्यातील घटनांची चाहूल देणारं,  गुढ शास्त्र मानलं जातं. नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, असे हे मौलिक शास्त्र, मोफत, घराघरात पोहोचण्याचे गौरवस्पद कार्य, सर्वप्रथम सुरू करण्याचा मान, श्री ज्योतिष्य संशोधन केंद्रास आहे.

◾️आदरणीय मॅडमचे प्रगाढ ज्ञान, त्यांची स्पष्ट वाणी, ओघवती भाषाशैली, विषयाची मांडणी - प्रतिपादनक्षमता, सातत्य, ज्योतिष्यप्रेमीच्या मनावर गारुड करतात. त्यांची ध्येयबद्धता, अपार परिश्रम, कार्याची चिकाटी, अनुशासन   या मुळेच, या कार्याच्या, इवल्याशा रोपाचा, आज वटवृक्ष झाला आहे. ▪️ज्योतिष जगतात, या संस्थेने आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे.

▪️ प्रत्येक उपक्रम, हा शिस्तबद्ध व काटेकोर असल्याने, ज्योतिष्य प्रसार कार्यात, दिवसेंदिवस ही संस्था अग्रक्रमी राहील, यात शंका नाही .

०२) आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड कशी व कधीपासून निर्माण झाली?

💢 जेव्हा एखाद्या समस्येची उकल मानवी बुद्धीच्या तर्कशक्ती पलीकडे जाते, तेव्हा, मनुष्य दैव, प्रारब्ध, नशीब यासंबंधी विचार करण्यास बाध्य होतो. ▪️ घरगुती स्थावर मालमत्तेबाबतचे वाद, स्नेहभावनेची झालेली प्रतारणा, यामुळे असे का होत असावे? अशी उत्सुकता निर्माण झाली. ▪️ त्यासोबतच,  मुलांचे शिक्षण व विवाहासंबंधी, बरेचसे ज्योतिषी, काहीतरी,  हातचे राखून बोलत आहेत, असे मला वारंवार वाटायचे. म्हणून मग, आपण हे शास्त्र शिकायला हवे, अशा प्रकारची इच्छा निर्माण झाली.▪️ " गरज ही शोधाची जननी आहे. " याचा, आज प्रत्यय येतोय.

💢 या शास्त्रातील, माझे अनौपचारिक शिक्षण, जून 1996 पासून सुरू झाले.

०३) ज्योतिष शास्त्रातील गुरूतुल्य आदर्श व्यक्तिमत्व विषयी आपल्या भावना संक्षिप्त स्वरूपात मांडा.

💢 जीवनाला कलाटणी देणाऱ्या कोणत्याहि, शुभ अथवा अशुभ घटना, ह्या योगाशिवाय घडत नाहीत, यावर माझा अढळ विश्वास आहे.

▪️ जेव्हा काही समस्या निर्माण झाल्या तेव्हा, मला आठवण आली, ती  श्री. अरुण परांजपे सरांची ( ह. मु. ठाणे ). ते शिक्षक असून, त्यांना ज्योतिष्य, होमिओपॅथी, इतिहास याची आवड होती. ते पत्रिका पहात असत. माझी उत्सुकता  व रुचि पाहून, त्यांनी मला निरपेक्षपणे मोलाचे मार्गदर्शन केले. स्वतःची पुस्तके अभ्यासासाठी दिलीत. " नुसता अभ्यास नको, त्यासोबतच, कुंडली पाहण्याचा पण सराव करा ", असा मोलाचा सल्ला दिला.

💢 त्यानंतर आदरणीय डॉ. ज्योती जोशी  मॅडम, यांनी सखोल मार्गदर्शन केले. माझ्या ज्ञानात वाढ झाली, सुसूत्रता आली. बरेच बारकावे समजले. अष्टकवर्ग ही तर त्यांची अनमोल भेट आहे. ▪️ विशेष म्हणजे, त्यांनी माझा, अभ्यासातील उत्साह वाढवला. माझ्या आत्मविश्वासात मोलाची भर पडली. माझ्या उत्कर्षात, त्यांचा सिहाचा वाटा आहे.

" माळेत मणी असतात पण, न दिसणारा धागा, त्या मण्यांना बांधून ठेवतो. म्हणून, मण्यापेक्षाहि, धाग्यास महत्व आहे. " गुरुजन हे धाग्याची भूमिका करतात.

०४ अ ) आपण ज्योतिष शास्त्र शिकावं, अशी इच्छा मनात निर्माण झाल्यानंतर सर्वप्रथम आपण काय केलं ?

💢 हस्तरेषेची मला आवड होती. सुरुवातीला 1/2 पुस्तके वाचून, केवळ " थ्रील " म्हणून मी हात पहायचो. निदान सांगायचो. एखाद -दुसरे चुकायचे पण, बरेचसे बरोबर आल्याने,  उत्साह वाढायचा.

हात पहाताना, अनेकांनी आपणहुन सल्ले दिलेत.

▪️" तुमची प्रतिपादन शैली खूप छान आहे. पण यापेक्षाहि कुंडलीशास्त्र अधिक विस्तृत व गहन आहे. जो हस्तरेषा करतो,  तो ते निश्चित करेल.  तुम्हाला अभिजात आवड आहे. तुम्ही निश्चित ते करू शकाल."

सुरुवातीस मी त्याकडे विशेष लक्ष दिले नाहीं. पण वारंवार, असे सल्ले मिळायला लागल्यावर, मी त्यास दैवी संकेत समजलो. व जर शिकायला मिळाले तर,  जरूर शिकेन असा निर्धार केला.

त्याच सुमारास आ. श्री. परांजपे  सरांकडे   जाण्याचा योग आला.

प्र. 4 ब ) यासाठी " आपल्या कुंडलीत प्रेरणादायक ग्रहस्थिती कोणती असावी ? असे आपल्याला वाटते "?

💢 माझी कुंडली अफलातून आहे.  इथे पूर्ण विवेचन करणे, उचित ठरणार नाहीं. तूर्त इतकेच लिहितो की, लग्नी तहहयात शिक्षणाची आवड देणारे, दैवी ज्ञानाचे कारक कर्केचे गुरु, व संशोधक वृत्तीचे हर्षल, वर्गोत्तम व पुष्कर नवांशात आहेत. नवमेश -लग्नेश, लग्न सप्तमातून दृष्टियोग, लग्नेश चंद्र सप्तमात, मकर या श्रमिक राशीत, द्वितीयात अधिकाराचा कारक, - स्वराशी रवि, तृतीयातील  साहित्य लेखनास प्रवृत्त करणारा, वाणी - संवादकौशल्याचा कारक - स्वराशी बुध, चतुर्थात तुळेचे शुक्र,  जनसामान्यांचा प्रतिनिधी ग्रह -शनी, अंतरस्फूर्ती, प्रेरणेचा कारक, वायुराशीतील नेपच्यून अशी या विद्येस पोषक, अशी स्थिती निर्माण करणारे ग्रह आहेत. ( रेकॉर्डला असलेली जन्मतारीख खरी नाहीं )

०५) शास्त्राचा अभ्यास करीत असताना आपल्याला आलेले चांगले व वाईट अनुभव कोणते?

💢 कुठलाहि  वारसा नसताना, मला हा छंद जडला आहे. बरे वाईट अनुभव तर प्रत्येक क्षेत्रात येतातच.

▪️ सुरुवातीला खऱ्या कुंडल्या मिळवताना, खूप अडचणी यायच्या. अक्षरशः पाठपुरावा करावा लागे. कुणाकडे तपशिल नसायचा, कुणाकडे कुंडली उपलब्ध असूनहि, ती दाखवण्याची इच्छा नसे.  दरवेळी मला अभ्यासाला पाहिजे, हे पटवून द्यावे लागत असे.

▪️या उलट, काही सदभावनेने सहकार्य करीत. बऱ्याच लोकांनी, मला जुनी पंचांगे पुरवून मोलाचे सहकार्य केले आहे.

▪️ त्यावेळी पंचांगे घटका पळात असत. वेळा तास काट्यात रूपांतरित कराव्या लागत. एखादे पंचान्ग असे असायचे की, त्यात फक्त सूर्योदयाचे वेळी, कोणते लग्न किती घटका पळात समाप्त होणार,  हे दिलेले असे. त्याचे तास काट्यात रूपांतर करून, नंतर जन्मवेळेपर्यंत प्रत्येक लग्नावधी मिळवावा लागायचा. यात बरीच मेहनत होत असे.

▪️ कुंडली काढून विवेचनाचे मुद्दे काढल्यावर, दुसरे दिवशी जातक म्हणायचा " माफ करा ! मी माझी जन्मवेळ रात्री 9 ची सांगितली. आई म्हणते, तुझा जन्म सकाळी 9 चा आहे." असाहि त्रास बरेचदा झाला आहे.

▪️आता  सॉफ्टवेअरमुळे, सर्वं रेडिमेड मिळते व पंचांगातहि खूप सरलता आली आहे.

०६) आपली दिनचर्या सांभाळत शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आपण वेळेचे नियोजन कशा प्रकारे केले?

💢 नोकरीत असताना  संध्याकाळी  7 ला बसायचे. मग कधीकधी रात्री 12:30 /1 वाजायचा. ती धून असते.

💢 बरेचदा, या हव्यासापायी, घरगुती कामे विलंबाने होत असत. माझ्या या छंदास, घरातील सर्वांचे सहकार्य व प्रोत्साहन होते हे विशेष.

💢 सेवा निवृत्तीनंतर तर घड्याळ पाहणे सोडले. मनात जिद्ध असली की, काहीहि होते.

०७) ज्योतिष शास्त्राची परीक्षा देण्यासाठी आपण स्वतःची काय तयारी केली?

💢 काळानुसार प्रत्येकाने स्वतः त बदल केला पाहिजे. कोणत्याहि कामात एकदा लक्ष घातल्यास, ते पूर्ण केल्याशिवाय रहायचे नाहीं, हा माझा परिपाठ आहे. त्यामुळे, परीक्षेबाबत सुरुवातीपासून मी गंभीर आहे. ▪️ विडिओ मध्ये मुद्धा व्यवस्थित समजावा यासाठी, विस्तृत विवेचन केलेले असते. मी त्यांच्या सक्षिप्त नोट्स हातानी लिहिल्या. त्यातहि महत्वाची वाक्ये अधोरेखित केली.

हस्ताक्षरात नोट्स लिहिताना, त्याचे चांगले मनन होते, हा माझा अनुभव आहे. तीच पद्धत आजतागायत सुरु आहे. पूर्ण समजल्याशिवाय पुढचे लिहीत नाहीं, ही पण सवय आहे. त्या नोट्सचा चांगला उपयोग होतो. अधोरेखित असल्याने, कमी वेळात अधिक अभ्यास होतो.

०८) परीक्षेचा निकाल प्राप्त झाल्यानंतर आपल्या भावना काय होत्या?

💢 ध्येयपूर्तीचा आनंद मिळतो.

▪️ नदीला किनारा असतो म्हणून तिची शोभा असते.

▪️ ऊत्तम रत्न जरी जवळ असले तरी, त्याला कोंदणात मढवल्याशिवाय, त्यास धारण करता येत नाहीं.

 तद्वतच, ज्ञानाचे मूल्यमापन हे परीक्षेने होते. म्हणून ज्ञान व परीक्षा यांचा जवळचा संबंध आहे. ज्ञान व प्रमाण पत्र, एकाशिवाय दुसरे अपूर्ण आहे,  असे मला वाटते.

▪️ बरेच वर्षापूर्वी, एका अबोध मुलीने मला प्रश्न केला होता. " गुरुजी ! तुम्ही एवढ्या आत्मविश्वासानी सांगताय ! तर तुम्ही कोणती परीक्षा दिली कां ? ". तिचे म्हणणे रास्त होते.  मी कोणतीहि परीक्षा दिलेली नव्हती. त्याचा मी सकारात्मक अर्थ घेतला. व परीक्षा द्यायची मनात खूणगाठ बांधली. पण, मी अकोल्याचा असल्याने, मला स्थानिक अशी सुविधा नव्हती. पुणे, इंदोर, नाशिक, उज्जैन असे कुठे तरी, सेंटर पहावे लागणार होते. त्यामुळे, तो विचार मनातल्या मनातच राहिला. पण, एक दिवस फेसबुकवर  " मोफत ऑनलाईन ज्योतिष्य शिक्षणाचे " आ. मॅडमचे नोटिफिकेशन वाचले. व लगेच फॉर्म भरला. " आले देवाजीच्या मना.. " या उक्तीचा अनुभव आला. ज्ञानगंगा या नोटिफिकेशच्या स्वरूपात, द्वारी अवतीर्ण झाली होती.

०९) व्यावसायिक पत्रिका सोडवीत असताना जातकांच्या बाबतीत आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाबद्दल आपण काय सांगाल?

▪️ जवळपास 26 वर्षे या क्षेत्रात असल्याने, आज मितीस 8755 जातकाची नांवे, माझ्या संग्रहात आहेत.

अनुभवहि तसा दांडगा आहे. वाईट अनुभव कमी व चांगले अनुभव जास्त म्हणून,  उत्साह टिकून आहे.

▪️ एक अत्यंत महत्वाचे सूत्र मी मानतो, जातक आपल्या अतिपरिचयाचा असेल, ओळखीचा असेल, तरीहि,  कुंडली जे दर्शवते,  तेच त्याला सांगायचे. मग ते त्याला कटू वाटेल, कां मधुर वाटेल ? हा विचार गौण आहे.  तो करूच नये.

अनुभव म्हणून, येथे प्रातिनिधिक स्वरूपात फक्त 4 अनुभव देत आहे.

⚛️ ही सर्वप्रथम जीवनात आव्हान ठरलेली पत्रिका आहे. 11 जुलै 2006 रोजी,  मुबंईत रेल्वेत बॉम्बस्फ़ोट झाले तेव्हा, रात्री मला फोनवर एका जातकाचा तपशील देण्यात आला व अर्ध्या तासात त्याचे कुशल मंगल सांगा, अशी कळकळीची सूचना मिळाली.  ती कुंडली अगोदर पाहिलेली नव्हती. अष्टमात रवि 29, गुरु 24, मंगल 2, प्लुटो 29 अंशावर होते . नीचेचा शनी चतुर्थातून कष्टातील चंद्रास पहात होता. गोचरीनेहि बुध 5, शनी 17, मंगळ 29 अंश युति असून, चंद्रावर शनीची दृष्टी होती.  वेळ कमी असल्याने, फार विचार करता येत नव्हता. बरेच संदर्भ पाहिले. अष्टम भावातील ग्रहाची फळे सर्वस्वी नकारात्मक आढळली.  मूळ रवि प्लुटो 29 अंशावर व गोचरीचा मंगळहि त्याच अंशावर,  तसेच, मूळ व गोचरीने चंद्रावर शनी दृष्टी या दोन बाबी खटकल्या. यावरून व्यक्ती हल्ली हयात नाहीं, असे संकेत प्राप्त झाल्याने. नकारात्मक उत्तर दिले. दुसरे दिवशी, दुपारी प्रेत मिळाल्याची माहिती मिळाली.

अंदाज खरा ठरला त्यामुळे, प्रसिद्धी मिळाली हे जरी खरे असले तरी, मी नंतर 8 दिवस, कोणतीहि कुंडली पहिली नाहीं. शेवटी आपणहि माणूस आहोत.  आनंद – दु:ख हे आपल्यालाहि लागू आहेतच.

⚛️ एका स्त्री पत्रिकेत, चंद्र गुरु कर्केत सप्तमात 29 अंशावर असून, सोबत 23 अंशावर रवि होता. या तिन्हीवर शनीची दृष्टी असल्याने, विवाह टिकणार नाहीं, हे फलित 1 महिन्यातच खरे झाले. मुलीचा घटस्फोट झाला.

⚛️ एका स्त्रीपत्रिकेत रवि - गुरु बलवान नव्हते. चंद्र - मंगळ - शुक्र दृष्टी / युति योगात असल्याने," ही मुलगी वयात आल्याबरोबर हिचे लग्न करून द्या " असा पालकांना सल्ला दिला. पुढे तिचे प्रेमप्रकरण झाले. प्रियकराला ती सतत निर्जन स्थळी भेटत असे. काही समाजकन्टकांनी ते हेरले. व संधी साधून,  तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर त्या दोघांसहि ठार मारून, त्यांची नग्न प्रेते रेल्वे रुळावर फेकली.  ही केस बरीच गाजली.

⚛️ एका स्त्रीपालकांना, तुमच्या मुलांचे प्रेमप्रकरणाचे योग सांगितले. त्यावर माझ्या समोर हातवारे करीत, त्यांची प्रतिक्रिया - " काय सांगता गुरुजी ! प्रेमप्रकरणासाठी तसे गट्स असावे लागतात. माझ्या मुलाच्या तोंडावरची तर माशीहि उडत नाहीं ". घरचे संस्कार व मुलाबद्दल, त्यांचा प्रचंड आत्मविश्वास बोलत होता. वर्षा दीड वर्षांनी त्याच बाई माझ्याकडे मुलाच्या प्रेयसीची पत्रिका घेऊन आल्या. तेव्हा," अहो ! आता माशी उडाली कां ?" असे सहजसुलभ  विचार माझ्या मनात आले. पण तसे बोलणे, सभ्य नव्हते म्हणून, शब्द गिळून टाकले.  आता त्यांची समस्या वेगळीच होती. प्रेमप्रकरण जातीबाह्य, ऑफिस परिचयातून झाले होते. मुलगी कडक मंगळाची होती. व मुलगा " करीन तर हिच्याशीच " असा हट्ट धरून बसला होता. त्यांचा तो एकुलता एक कुलदीपक होता. त्रिशंकू  स्थितीत त्या होत्या.  नेमके पुढे काय झाले, हे कळले नाहीं. कारण पुन्हा संपर्क आला नाहीं.

१०) ज्योतिषशास्त्र काळाची गरज.. याबद्दल आपले मत काय आहे?

💢 ज्योतिष्य शास्त्र हे अक्षर शास्त्र आहे.

आपल्याला भविष्यात कोणत्या क्षेत्रात सहजतेने यश मिळेल ? कोणत्या बाबतीत अडचणी, संघर्ष आहे ? याचे पूर्वनिदान करणारे शास्त्र असल्याने, तळागाळातील प्रत्येक व्यक्तीस, याची नितांत आवश्यकता आहे. व ती राहणारच.

फक्त जरूर आहे, खरा जन्म तपशिल मिळण्याची, प्रामाणिकपणे सखोल अभ्यास करण्याची व जे निदान येईल, ते स्पष्टपणे सांगण्याची. यात जो प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, तोच टिकेल. जो हे तत्व पाळणार नाहीं, तो स्वतः यशस्वी तर होणारच नाहीं पण, या शास्त्राच्या नावाला, कलंक लावण्यास कारणीभूत होईल. " दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये ". अथक परिश्रमाला पर्याय नाहीं. ही ब्रीदवाक्ये असली पाहिजेत. ज्यो. शास्त्राचा अभ्यास, हे सतीचे वाण आहे. हे विसरू नये.  

= पुंडलिक दाते, ज्योतिष्य अलंकार, अकोला. - 9421755299

ही मुलाखत भविष्य दर्पण मासिक नोव्हेंबर 2022 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली