गोष्ट अनुभवाची
गोष्ट अनुभवाची
प्रत्येक ज्योतिषाकडे, सहसा त्याने अभ्यासलेल्या कुंडल्यांचा, संग्रह असतोच. त्यातून त्याने जर, लग्नवार संग्रह केला असेल व त्यासंबंधीची टिपणांची पण नोंद ठेवली असेल. तर ती त्याला भविष्यात, निश्चित उपयोगाची ठरतात, असा माझा अनुभव आहे.
💢 प्रत्येक कुंडली ही वेगवेगळी असते. इतकेच काय, एका तारखेला, एकाच वेळेला, किंवा 2/3 मिनिटांच्या फरकाने, दोन जातकांचा जन्म झाला असेल, कदाचित जन्मस्थानेहि वेगवेगळी असतील, तर जन्म कुंडलीच्या लग्नाचे अंश व चंद्राचे अंश वगळल्यास, जन्म कुंडली सारखीच येते. दीर्घकालीन ग्रहांच्या कला विकलांमध्ये थोडा फार फरक पडतो.
जन्म कुंडलीतील ग्रह, व स्थाने तीच असल्यास, साधारणपणे, काही विशिष्ट घटनांच्या फळांच्या बाबतीत बरेचसे साधर्म्य दिसते.
नोव्हेंबर 2021 चा " ग्रहांकित " मासिकाचा अंक चाळत असताना, त्यात श्री विनायक ल.काशीकर यांचा " विवाह विलंब व भूमिका स्वराशीच्या अष्टमातील ग्रहांची " हा लेख वाचत असताना, पान क्रमांक 134 वर, मला एक मीन लग्नाची कुंडली दिसली. त्यामध्ये, लेखकाने जातकाचा विवाह 2011 मध्ये झाला व एका महिन्यातच घटस्फोट झाल्याचे लिहिले आहे.
नेमकी याच तारखेची, सकाळी 7:05 वेळेची कुंडली, माझ्या संग्रहात आहे. हा जातक माझा परिचयाचा असल्याने, याचेहि लग्न 2011 मध्येच झाले आहे.
परंतु, विवाहापूर्वी याचे प्रेम प्रकरण असून, घरच्या विरोधामुळे, ते बारगळलेले आहे. तसेच मुख्य विवाह होण्यापूर्वी, एक पसंत असलेला प्रस्ताव, अनपेक्षित कारणामुळे, रद्द झाला आहे. हल्ली दांपत्यसुखात कोणताहि वाद नाही.
▪️ लेखात दिलेल्या पत्रिकेवर मी लग्नबिंदू 23 अंशावर असून धनातील चंद्र 4 अंशावर आहे.
▪️ माझ्या संग्रहातील पत्रिका लग्नबिंदू 25 अंशावर दाखवत असून, चंद्र 3 अंशावर दाखवत आहे.
वरील दोन पत्रिकांचा अभ्यास केला असता, लेखकाने दिलेल्या पत्रिकेत, विवाहानंतर, जातकाला क्रूर फल मिळाले आहे. तर माझ्या संग्रहातील पत्रिकेत, अशीच नकारात्मक फळे, पण ती विवाहपूर्वी मिळालेली आहेत.
या दोन्ही पत्रिकेच्या स्थितीवरून, जातकाला विवाहाच्या संदर्भात, नकारात्मक फळे मिळणार होती, हे सिद्ध होते. पण एकास विवाहा नंतर क्रूर फले, तर दुसऱ्यास, विवाहपूर्वी दूषित फळे मिळाली, असे का झाले ? हा कुंडलीच्या सूक्ष्म अभ्यासाचा विषय होईल.
त्याचबरोबर, दोघांच्या जीवनात येणारे जोडीदार, माझ्या जातकाचे बाबत, प्रेयसी व प्रस्ताव बारगळलेली विवाहेच्छुक मुलगी, यांच्या ग्रहस्थितीचाहि शुभाशुभ परिणाम, मूळ जातकाच्या ग्रह स्थितीवर होणार, हे नाकारता येत नाही.
कारण पती-पत्नींचा सुसंवाद वा विसंवाद हा त्यांच्या ग्रहस्थितीवर पूर्णपणे आधारित असतो, हे कोणीहि मान्य करेल.
जन्म कुंडल्या जर, एक सारख्या असल्या तर, किंवा किमान काही ग्रहयोग सारखे असले तर, जीवनास कलाटणी देणाऱ्या बऱ्याचशा घटना, या तंतोतंत सारख्या नसल्या तरी, त्याचे परिणामात , नकारात्मकता / सकारात्मकता याबाबतीत मात्र, बरेचसे साधर्म्य आढळते.
प्रातिनिधिक स्वरूपात, सिंह लग्नाच्या, अजून दोन कुंडल्या देत आहे. खालील दोन्ही पत्रिका स्त्री जातकाच्या आहेत. तसेच, या दोन्ही जातिका नित्य परिचयाच्या असून, त्यांच्या शाळकरी वयापासून, मी या कुंडल्या पहात आहे. या दोन कुंडल्यात, जन्मतपशील वेगवेगळा असल्यामुळे, ग्रहस्थिती ही निश्चितच वेगवेगळी आहे पण, विवेचनाचा मुख्य दुवा म्हणजे, दोन्ही कुंडल्यात, सप्तमेश शनी असून, तो चतुर्थस्थानात, मंगळाचे वृश्चिक राशीत व प्रजापतीयुक्त आहे त्यामुळे , दोन्हीच्या विवाहात अडथळे, विलंब अशी निश्चित फळे मिळतील, हे मी सुरुवातीपासून भाकीत केले होते. त्यानंतरहि, पालक बरेचदा भेटत असल्याने, या विषयाची पुनरावृत्ती झालेली होती. या दोन्ही पत्रिकेत विवाह समारंभाचे सुमारास, नकारात्मक फळे मिळालेली आहेत. त्यानंतर मात्र, त्यांचे दांपत्य जीवन सुखी असून, कोणताहि वाद दिसत नाही.
या पत्रिकांची थोडक्यात माहिती पाहू.
💢 या जातिकेचा जन्म 11- 2- 85 चा असून, विवाह स्वामी शनी शत्रू राशीत 4 अंशावर विद्यमान आहे. त्याच्यासोबत प्रजापती हा विक्षिप्त व सनकी ग्रह 23 अंशावर क्रूर नक्षत्रात आहे. हे दोन्ही ग्रह, केतू व नेपच्यूनच्या पापकर्तरीत असून, शनी राहू षडाष्टक योगात आहेत. या जातिकेच्या साखरपुड्याचे दिवशी, एक निकटवर्ती नातेवाईक, अचानक अपघातात निधन पावला. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, मुलाकडील एक भाऊबंद, पुराच्या पाण्यात वाहून गेला. ऐन विवाहाचे एक दिवस अगोदर, नववधूचा हात पोळल्याने, लग्नसमारंभात तिच्या हाताला बँडेज होते. तसेच लग्नाच्या दिवशी, चटईत पाय अडकून, निकटवर्ती महिलेच्या हातात फ्रॅक्चर झाले.
आता ही दुसरी कुंडली पाहू.
या जातिकेचा जन्म 27-7-86 चा असून, इथेहि विवाह स्वामी शनी, वक्री अवस्थेत, 9 अंशात चतुर्थस्थानात, वृश्चिक या शत्रू राशीत असून, त्याचे सोबत असणारा प्रजापती हा 25 अंशावर, वक्री अवस्थेत, व क्रूर नक्षत्रात आहे. शनि व प्रजापती हे दोन्ही ग्रह, केतू व मंगळ नेपच्यून यांच्या पापकर्तरीत आहेत. चतुर्थस्थानाच्या षष्ठस्थानी राहू आहे. या जातिकेचे पालक, ज्योतिषावर दृढ विश्वास असणारे व माझ्याकडून अनेक वर्षे कुंडल्या पहात असल्याने, दरवेळी त्यांना भाकीताचा चांगला प्रत्यय आला होता. त्यामुळे माझे भाकीत चुकणार नाही, याची त्यांना मनोमन खात्री होती. शनि व प्रजापती युतीच्या बाबतीत, फळाचे स्वरूप सांगताना, एखाद्या वेळी काही अघटीत घडून, विवाहाच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात, असाहि मी उल्लेख केलेला होता. त्या आधारावर, वराच्या कुटुंबातील अतिशय वयोवृद्ध व्यक्ती, या अडथळ्यास कारणीभूत होऊ शकते, असा कयासहि त्यांनी बांधला होता.
💢 ज्योतिष शास्त्रावरील श्रद्धा किती दृढ असू शकते, हे मला या निमित्ताने नमूद करावयाचे आहे.
या जातिकेच्या विवाहापूर्वी 13 दिवस अगोदर, तिच्या भावी सासर्याचे, हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे, विवाहाची तारीख तर पुढे ढकलली गेलीच, पण विवाह समारंभातहि ताज्या दुःखाचे सावट जाणवले.
याच जातिकेच्या बाबतीत, या घटनेनंतर वराची पत्रिका दाखविण्यात आली त्या पत्रिकेत लग्नस्थानी वृश्चिकेचे शनी व प्रजापती युतीत होते. म्हणजे पती – पत्नीच्या संयुक्त ग्रहस्थितीचा, ती दुदैवी घटना, एक संकलित परिणाम होता.
💢 वरील दोन्ही कुंडल्यांमध्ये केवळ जन्म कुंडलीचाच विचार केला गेला आहे. ग्रहयोगांचा अभ्यास जर पक्का असेल, व जन्म तपशीलहि खरा असेल, तर मूळ जन्म कुंडली वरून केलेले भाकीतहि खूप परिणामकारक ठरते. हे निदर्शनास आणण्यासाठी, हा लेखन प्रपंच आहे.
💢 जर माझ्याकडे जन्म कुंडल्यांचा लग्नवार केलेला संग्रह नसता, तर दोन समान कुंडल्यांचे, समान ग्रहयोगाचे, जे मी वर विवेचन केले आहे, ते मी कदाचित करू शकलो नसतो.
💢 म्हणून प्रत्येक ज्योतिषाने, स्वतःच्या अनुभवानुसार, लग्नवार, कुंडली संग्रह करायला हवा, असे तळमळीने सांगावेसे वाटते.
💢हा लेख " भविष्य दर्पण मासिक, नोव्हेंबर 2022 च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
Comments
Post a Comment