राखावी बहुतांची अंतरे -धनयोग

          ⚛️राखावी बहुतांची अंतरे – धनयोग ⚛️


 जीवनात सर्व काही पैसाच आहे असं नाही पण त्याचबरोबर, पैशाशिवाय काहीही होत नाही. व्यक्ती तर श्रीमंत असेल तरच, तिला समाजात मान प्राप्त होतो." सर्वे गुण : कांचनमाश्रयते ", " पैशापाशी पैसा जातो ". नो मनी, पुसेना कोणी "अशा संकरीत भाषेतल्या म्हणीहि, पैशाचे महत्व पटवून देतात.

◾️ धनसंग्रह, वडिलोपार्जित धन, स्कॉलरशिप द्वारे मिळणारा पैसा, विद्याबक्षीसे, हे द्वितीय स्थानाचा स्वामी, व द्वितीयात असणारे ग्रह, यावरून पाहिले जाते.

◾️पण त्याचबरोबर, हे वाणीचेहि स्थान असल्याने, आपण संभाषणात वापरलेले शब्द, हे सुद्धा एक प्रकारचे धन होय. कारण, या शब्दधनामुळे, माणसे जोडली  जाऊ शकतात. शब्द हे मनातील भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. त्यामुळे, सुसंवाद वा कुसंवाद हा विषयहि तेवढाच महत्त्वाचा आहे, असे मी मानतो.

 ◾️धनस्थानात जर पापग्रह असतील, व धनेशहि अशुभस्थानात असेल तर, त्या जातकाची वाणी, धनात्मक, प्रभावशील राहत नाही.

 ग्रहांच्या कारकत्वानुसार, जर धनेश रवि धनस्थानातच असेल तर, जातकाचा आवाज खणखणीत असून, त्यात अधिकाराची जरब असते. हे कुटुंबस्थान असल्यानेहि, जातकाच्या बोलण्याचा, कुटुंबावर वचक असतो. धनस्थानात बलवान रवि असता , सरकारी खजिन्यातून धनप्राप्तीचे योग येतात. या धनस्थानातील शुभ रविमुळे, जातकाची इच्छा असल्यास, तो सुवर्ण संग्रह करू शकतो. घरात, आवश्यक तेवढे सोन्याचे दागिने असू शकतात. सर्वसाधारणपणे रविपासून बुध व शुक्र  हे अंतर्ग्रह  असल्यामुळे, मागच्या वा पुढच्या, तीन स्थानांपर्यंत असतात. बऱ्याचशा कुंडल्यात रवि-बुध, रवि-शुक्र, व रवि-बुध-शुक्र अशा युत्या दिसून येतात. 

◾️ धनस्थानात जर रवि व बुध असेल, तर जातक उत्तम वक्ता होतो. सभाधीटत्व, त्याचे ठिकाणी असते. रवि बुध शुक्र ही त्रयी, जर धनस्थानात असेल तर, त्या व्यक्तीच्या अंगी, काहीतरी कला असते. तो उत्तम कलाकार, नकलाकार असतो, त्याचे वक्तव्य नवरसपूर्ण असू शकते.

◾️ धनस्थानात जर शुभ स्थितीत चंद्र असेल, तर भाषा गोड व मृदू असते. 

◾️ द्वितीय स्थानात जर बलवान मंगळ असेल, तर हे लोक बोलताना, खूप घाई करतात. बोलण्यापूर्वी, ते त्याच्या परिणामाचा पूर्ण विचार करत नाहीत. मंगळाच्या गुणधर्माप्रमाणे भाषा जरा उग्रच असते. जर मंगळ बुधाची युती असेल, तर या लोकांना, अतिस्पष्ट व खोचक बोलणे, फार आवडते. यांची स्मरणशक्ती, गणित हे उत्तम असते, संगणकीय ज्ञानसुद्धा ते प्राप्त करू शकतात. पण एकटा मंगळ असता, धन जमा करण्यापेक्षा, खर्च करण्याकडे या मंगळाचा कल असतो. या जातकांनी  मनातले विचार, जसेच्या तसे मांडण्यापूर्वी, त्यातील उग्रता कमी करण्यासाठी, शब्दांची योग्य जुळवाजुळव करणे, त्यांच्यासाठी हितकर ठरते. परंतु, बहुधा ते त्यांना साधत नाही.

◾️ वाचास्थानी बलवान बुध असता, बुध हा वाणीचा कारक असल्याने, यांची भाषा उत्तम असून, विषयाची मांडणी उत्तम असते. त्यांच्या संवादाला विनोदाची झालर असू शकते. यांच्या ठायी प्रत्यूत्पन्नमती असते. आपल्या बोलण्याने, ते दुसऱ्यावर छाप पाडू शकतात .

◾️ धनस्थानात जर बलवान गुरु महाराज असते, तर यांचे बोलणे गोड, व सुसंस्कारीत, विद्वत्तापूर्ण असते, आपल्या संवादात वेगवेगळी सुभाषिते, वचने ते चपखलपणे वापरतात . द्वितीय स्थान हे अर्थ त्रिकोणातील एक स्थान असल्याने, गुरुदृष्टीने अर्थत्रिकोण  बलवान होतो. त्यामुळे, उपजीविकेचा प्रश्न मिटतो. गुरु पितवर्णीय ग्रह असल्यामुळे, जातकाची इच्छा असल्यास, तो सुवर्णसंग्रह करू शकतो.

◾️ धनस्थानात जर शुक्र असेल, तर डोळ्यांचा आकार खूप सुंदर असतो, भाषा गोड, मधाळ, व मोहित करणारी असते, यांची आकाशवाणी वृत्त निवेदक, टेलिफोन ऑपरेटर .या क्षेत्रात चलती असू शकते. द्वितीय स्थान हे मुखस्थान असल्याने, जर या शुक्रास मंगळाची साथ असेल, तर आवाजात गेयता असते. हे लोक उत्तम गायक असू शकतात. त्यात शुक्र शनी जर नवपंचम योगात असतील. तर " सोनेपे सुहागा " तालबद्धता, नादमधुरता  अधिक मनोवेधक असते. शुक्र श्वेतवर्णीय ग्रह असल्यामुळे, यांचा धनसंग्रह उत्तम असतो. जातकाची इच्छा असल्यास, घरात दोन-चार चांदीची भांडी सापडतातच.

◾️ धनस्थानात शनी असता, खूप कमी व गरज भासल्यासच, असे जातक संभाषणात भाग घेतात. भाषा कायदेशीर असते. बोलण्यात विचाराची परिपक्वता, व संथपणा दिसतो.

 परंतु, या शनीच्या संसर्गात, जर मंगळ असेल तर, वाणीचे स्वरूप पालटून, भाषा संघर्षप्रिय होते.

◾️ धनस्थानात राहू -केतू हर्षल, नेपच्यून यापैकी ग्रह असता, हे पापग्रह असल्याने, तेवढी शुभ फळे देत नाहीत. राहूमुळे, भाषा कधी कधी राकट, असते. हर्षल नेपचूनहि आपल्या गुणधर्माप्रमाणे, संवादकौशल्यात उणीव आणतात.

◾️ कोणताहि ग्रह, जर धनस्थानात बलवान असून, त्यास शनी,राहू,मंगळ, प्रजापती, नेपच्यून यापैकी, एखादा ग्रह पहात असेल, तर त्याच्या शुभफळात न्यूनता निर्माण होते. त्यामुळे, धनातील ग्रहांचा कोणत्या ग्रहांशी दृष्टीयोग होत आहे तसेच, धनेशाची अवस्था काय आहे? यावर, त्याचा फलादेश अवलंबून असतो.

◾️ धनेश जर कष्टस्थानात असेल, तर एखादे वेळी कर्ज काढावे लागेल. कर्ज योग्य कारणासाठी, वा अयोग्य कारणासाठी, ते त्या ग्रहाच्या गुणधर्मावरून ठरते.

◾️ धनेश अष्टमात असता, वारसाहक्काने धन मिळण्याची  शक्यता वाढते. कारण, एका धनस्थानाचा स्वामी, दुसऱ्या धनस्थानात जातो.



 धनेश जर व्ययात असेल, तर खर्चावर नियंत्रण राहत नाही. तसेच, या व्यक्तीचे वाणीवरहि नियंत्रण राहत नाही. धनेश व्ययात असणे, हा सर्वार्थाने " दारिद्र्य योग " आहे. आर्थिक दृष्टीने विचार करता,  यात खर्चिक वृत्ती वाढते. पण, भाषा कौशल्याचा विचार करता, हे जातक बोलताना,  दुसऱ्यास काय वाटेल ? याची मुळीच फिकीर करीत नाहीत. त्यांना " फाटक्या तोंडाचे " म्हटले तरी चालेल. त्यांच्या अशा अवगुणयुक्त बोलण्यामुळे, त्यांचा जनसंग्रह कमी होतो. अशा जातकांना, मित्र देखील बोटावर मोजण्यासारखे असतात. फटकळ स्वभाव असल्यामुळे, कोणी त्यांच्या वाऱ्याला उभे राहत नाहीत . या योगामुळे, हाताशी पैसा असेल तरच, तो खर्च होईल. परंतु, बोलण्याचे बाबतीत, तसे नाही. मनुष्य वाटेल तेव्हा बोलू शकतो. म्हणूनच " उचलली जीभ, लावली टाळ्याला " अशा म्हणी पडल्या आहेत.  त्यामुळे, हा दारिद्र्ययोग, प्रत्यक्ष धनव्ययाचे बाबतीत अशुभ फल देणारा असला तरी, संवाद कौशल्याच्या बाबतीत मात्र हा पुरेपूर अशुभ फल देतो. " राखावी बहुतांची अंतरे " यांना दुसऱ्याचे अंतर, मन राखता येत नाही, परिणामी, लोक यांच्याशी अंतर ठेवून वागतात.

धनस्थानाची ही दुसरी बाजू , तेवढीच महत्वाची आहे.

               हा लेख " भविष्य दर्पण " मासिक, में 2023 च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.


                                                                        - पुंडलिक दाते, ज्यो. अलंकार -942755299


Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली