⚛️ शिक्षण योग ⚛️

" एषाम् न विद्या न तपो न दानम् !ज्ञानं  न शीलं न गुणो न धर्म : !!स: मृत्युलोके भुविभारभूत:!मनुष्य रुपेण मृग: श्चरंति !!  "

 शिक्षणाचे मानवी जीवनात किती महत्त्व आहे हे वरील सुभाषितातून स्पष्ट होते. जोपर्यंत हिऱ्याला पैलू पाडले जात नाहीत, तोपर्यंत त्याची इतरांना किंमत कळत नाही. तद्वतच शिक्षणाचे आहे. शिक्षणामुळे मनुष्याचा पुनर्जन्म होतो, असे म्हटले तरी चालेल. शिक्षणामुळे संस्कार घडतात. समाजात आपले, एक बहुआयामी व्यक्तित्व म्हणून, शिक्षणाद्वारे व्यक्ती, आपले स्थान निर्माण करू शकते.

💢 जसजशी मानवाची प्रगती होत गेली, तसतशी शिक्षणाची अनेक दालने खुले झालीत व शिक्षणाचे क्षेत्र विस्तारले. 14 विद्या व 64 कला ही मोजणी आता कालबाह्य झालेली आहे. ⚛️ आपल्या पाल्याच्या हितासाठी जागरूक असलेल्या  पालकांना, आपला मुलाला शिक्षणाची कोणती शाखा योग्य ठरेल? असा प्रश्न नेहमीच सतावत असतो.◾️ काही पालक मुलाचा एटीट्यूड, त्याची आवड, त्याची क्षमता, स्वतःचे आर्थिक पाठबळ  याचा विचार करून आपला निर्णय घेतात.◾️ तर काही पालक आपले स्वतःचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून, त्यांना हव्या असलेल्या क्षेत्रात, शिक्षणासाठी मुलांना बाध्य करतात.◾️ परंतु ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, पाल्यास, शिक्षणासाठी कोणते क्षेत्र योग्य ठरेल ? कोणत्या क्षेत्रात त्याच यश मिळेल ? या दृष्टीने प्रभाविरीत्या मार्गदर्शन केले जाऊ शकते.

 किमान आपल्या भारतीय मनाची बांधणी " शिक्षण हेच उपजीविकेचे साधन होय " अशी पूर्वापार झालेली आहे. त्यामुळे, ज्याक्षेत्रात अधिक मानसन्मान, प्रतिष्ठा, पैसा  मिळतो, अशा क्षेत्राची निवड करण्याची, त्यांची आंतरिक अभिलाषा असते. मुलाचा पिंड जर त्या प्रकारचा असेल, त्याच्या कुंडलीतील ग्रहमान, त्या शिक्षणात व त्या शिक्षणावर आधारित पेशास अनुकूल असतील तर, त्या मुलांना यश मिळते व पालकांचे स्वप्न पूर्ण होते. अशा पाल्यांना, त्या शिक्षण शाखेविषयी , उत्कंठा, रुची व यशाबद्दल आत्मविश्वास असतो. ◾️परंतु पाल्याचे ग्रहमान जर यापेक्षा वेगळे काही सांगत असतील, तरीपण, पालकांच्या आग्रहास्तव, त्यांनी शिक्षणाची दिशा निवडली असेल, तर मात्र, त्यांना त्या शिक्षणाच्या शाखेसंबंधी तेवढा जिव्हाळा, आत्मविश्वास, रुची राहत नाही. इच्छेविरुद्ध  शिक्षण, एक प्रकारे बोजड होते. त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. व त्याचा सल त्यांच्या मनात राहतो. त्रिशंकू सम असणारी ही स्थिती, त्यांच्या, उर्वरित संपूर्ण जीवनावर परिणाम करणारी ठरते.

💢 हे सर्व टाळण्यासाठी जर पालकांनी कुंडलीचा आधार घेतला तर, त्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन मिळू शकते. पाल्याच्या परिश्रमास योग्य दिशा दाखवण्याचे काम,त्याच्या कुंडलीतील ग्रहस्थिती करते.

 सर्वसाधारणपणे ग्रहांचा विचार केल्यास, प्रथम, पंचम, नवम या स्थानानी निर्माण होणारा त्रिकोण, धर्मत्रिकोण, हा व्यक्तित्व विकासदर्शक आहे. प्रथमस्थान हे स्वतः जातकाचे असल्याने, त्यावरून त्याच्या कर्तव्य क्षमतेचा बोध होतो. पंचमस्थान हे माध्यमिक शिक्षणाचे असल्याने, तसेच, ते यशाचेहि स्थान असल्याने, शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण, या काळात जातक पौगंड अवस्था ते तारुण्य या अवस्थेत असतो. ही संवेदनशील अवस्था आहे. त्यानंतर उच्च शिक्षण, कीर्ती, लौकिक, भाग्यदर्शक नवमस्थान या त्रिकोणात मोडते. ही तिन्ही स्थाने व्यक्तित्वविकास दर्शवतात. जर या तीन स्थानांपैकी कुठल्याही स्थानात गुरु महाराज असले, ते राशीबली व मित्रराशीत असून, त्यांच्यावर कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नसली, नवांशातहि ते उत्तम स्थितीत असतील तर ते विवेक, सदाचार, सात्विकता, सखोल ज्ञानाचे कारक असल्याने, अशी व्यक्ती ज्ञानपीपासू, उच्चविद्याविभूषित, असते. विद्वत्ता हाच त्या व्यक्तीचा खरा दागिना असतो. ◾️ गुरु महाराजांचे हे एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे की, ते ज्या स्थानात असतात, त्यापासून पंचम, सप्तम व नवमस्थानावर ते पूर्ण दृष्टीने पाहतात. त्यांच्या या दृष्टीस “ अमृत दृष्टी ” असे म्हणतात.

धर्म त्रिकोणातील कोणत्याही स्थानात बलवान गुरु महाराज असतील तर त्यांची, धर्म त्रिकोणातील इतर दोन स्थानांवर दृष्टी पडते. त्यामुळे व्यक्तीचा व्यक्तित्व विकास, शिक्षणात उत्तम प्रकारे यश, व्यक्तित्वाद्वारे लौकिक व भाग्य प्राप्त होते .

म्हणून मनुष्याचा विकास होतो तसतशी शिक्षण क्षेत्राची नवीन दालने तयार होत असली तरी, प्रत्येक क्षेत्रात सखोल ज्ञानाची जरूर असल्याने, धर्म त्रिकोणात जर गुरु प्रभावी असेलं तर, त्या व्यक्तीचे शिक्षण उत्तम तऱ्हेने पूर्ण होते.


◾️ हे गुरु महाराज जर अर्थत्रिकोणात असतील व वर सांगितल्याप्रमाणे, शुद्ध स्वरूपात असतील तर धनस्थान, नोकरी देणारे उपचय स्थान, व धनउत्पादक कर्मस्थान हे तिन्ही बलवान होतात. त्यामुळे व्यक्तीचे जीवन, हे आर्थिक दृष्ट्या संपन्न राहील, याची ग्वाही देता येते. बरेचदा यथा- तथा शिक्षण असलेल्या व्यक्तीही आर्थिक दृष्ट्या खूप संपन्न असतात. अशा लोकांच्या पत्रिकेत गुरु महाराज या अर्थत्रिकोणात असू शकतात.◾️ पराक्रम,विवाह व लाभ या तीन स्थानात गुरु महाराज, शुद्ध स्वरूपात  असल्यास, तृतीयात असता, सप्तमावर दृष्टी असल्याने, स्वतंत्र व्यवसायासाठी उत्तम ठरते. नवमस्थानावरील त्यांची दृष्टी, भाग्यस्थान बलवान करते. तसेच लाभ स्थानावरील दृष्टी, आर्थिक लाभासाठी धनात्मक प्रभाव देते.

 ◾️मोक्ष त्रिकोणात गुरु महाराज असता, ते चतुर्थात असतील तर दशमास पूर्ण दृष्टीने पाहतात त्यामुळे, कर्म स्थानास त्याचा फायदा मिळतो. अष्टमात गुरु महाराज असता, आकस्मिक धनलाभ, संशोधनक्षेत्र,व व्ययात असता आध्यात्मिक प्रगती, धार्मिक तीर्थयात्रा परदेशगमन या संधी उपलब्ध होतात.

⚛️ गुरु महाराज शिक्षणाचे कारक असल्याने, कुंडलीतील त्यांची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. ते धनस्थान, पंचमस्थान, भाग्यस्थान कर्मस्थान याचे कारक ग्रह आहेत.

⚛️ शिक्षणाच्या दृष्टीने कुंडलीतील दुसरा महत्त्वाचा ग्रह  बुध होय. बुध वाणीचा, प्रत्युत्पन्नमतीचा कारक असल्याने, उत्तम प्रतिपादन शैली, वाक्पटूत्व, संवाद कौशल्य, लेखन चातुर्य, गणितातील गती,  भाषा चातुर्य, व्यवहारशीलता, व्यापार कुशलता  बुधा वरून पाहिली जाते.

⚛️ कुठलेही शिक्षण हे आपल्या नोकरी व्यवसायासाठी पुढील भवितव्यासाठी पायाभूत काम करते, अशी प्रत्येकाचीच धारणा असल्याने, पाल्य त्याच्या भविष्यात नोकरी करेल? का स्वतंत्र उद्योग करेल? नोकरी उद्योगाचे क्षेत्र कोणते असेल? याचा जर आपण दशमस्थान,दशमातील ग्रह, दशम स्थानाची पूर्ण स्थिती पाहून विचार केला,दशमस्थान व पंचमस्थान यांच्या अंदाजाची  सांगड घालून, जर आपण शिक्षणाच्या क्षेत्राची निवड केली, तर ती अधिक बिनचूक ठरेल.

◾️ यासाठी आपल्याला कुंडलीतील सर्व ग्रहांचे कारकत्व व त्यांचा व दशमस्थानाचा संबंध याचा बारकाईने विचार करावा लागेल.

⚛️ रवि राजसत्ता, अधिकार, ज्ञान, राज गौरव, प्रखर आत्मविश्वास, व सर्व ग्रहांचा राजा असल्याने, केंद्र सरकारचा कारक समजला जातो. कुंडलीत रवि उत्तम असता, सरकारी नोकरी, राजदरबारी मान, समाजातील सन्माननीय धंदे, यात व्यक्तीची प्रगती होते.

⚛️ चंद्र मनाचा कारक असल्याने, यावरून जातकाच्या मानसिक स्थितीचा बोध होतो. चंद्रास अमात्यकारक मानतात. त्यामुळे अशी व्यक्ती स्वायत्त मंडळे , राज्य सरकार, भरपूर जनसंपर्क असणाऱ्या नोकऱ्या, भ्रमंती असणाऱ्या नोकऱ्या, प्रवाही पदार्थांशी संबंधित नोकऱ्या, मनोविकार तज्ञ  या चंद्राच्या अखत्यारीत येतात.

⚛️ मंगळ हा इंजीनियरिंग क्षेत्र, धाडस, शौर्य कणखरपणा, क्रूर व्यवसायाचा कारक आहे

 त्यामुळे, सुरक्षा विभाग, सैन्यदल, पोलीस डिपार्टमेंट,अग्निशामक दल, सर्जन, डॉक्टर विद्युत मंडळ, रेल्वे, गणवेशधारी नोकऱ्या या सर्व मंगळाच्या अखत्यारित येतात.

⚛️ बुध हा व्यापाराचा कारक असून अंकगणित दलाली, वक्तृत्वक्षमतेवर आधारित व्यवसाय, जसे- शिक्षक, वकील. संदेश दळणवळण आकाशवाणी, समाचारपत्र, टेलीकम्युनिकेशन, नाक कान घसा तज्ञ, बधीरीकरण तज्ञ,  हे क्षेत्रे बुधाच्या अखत्यारीत येतात.

⚛️ शुक्र हा राजसी , उपभोगवादी  ग्रह आहे, संगीत, कला, सौंदर्यदृष्टी याचा कारक ग्रह आहे. हा स्त्री ग्रह असल्याने, स्त्रियांना लागणाऱ्या वस्त्र प्रावरणासहित, सगळ्या प्रकारच्या वस्तू, ब्युटी पार्लर, कॉस्मेटिक सर्जरी, सुगंधी अत्तरे, जड- जवाहिरे, कोल्ड्रिंक, पर्यटन संस्था, चित्रपट सृष्टी कलेशी संबंधित सर्व प्रकारचे व्यवसाय, शुक्राच्या अखत्यारीत येतात.

⚛️ शनि महाराज विश्वाचे न्यायाधीश आहेत. ते कर्म कठोर असल्याने, अतिशय कष्टाची शारीरिक धावपळीची, दीर्घकालीन मेहनत लागणारी अशी सर्व क्षेत्रे, कायदा व वकिली न्याय क्षेत्र, पुरातत्व विभाग, जुन्या सामानांची देवघेव , मोठे कारखानदार व शेती करणारे, खान काम करणारे, रेती, सिमेंट यासारख्या अवजड वस्तूंची संबंधित  उद्योग करणारे, रात्रपाळी कामगार, तेल व्यावसायिक अशी क्षेत्रे शनीच्या व्यवसायात येतात.

⚛️ राहू राजकारण, फोटोग्राफी, कॉम्प्युटर ग्राफिक्स, पैसे व्याजाने देणे, जुगार गृहे, दारू दुकाने, विषारी औषधांची दुकाने, जादू विद्या याचा कारक आहे.

⚛️ हर्षल हा आधुनिक संशोधनाशी संबंधित, यंत्राशी संबंधित कामे, यंत्र दुरुस्त करणे, संशोधनात्मक वृत्तीचा ग्रह आहे.

⚛️ नेपच्यून हा भ्रम निर्माण करणारा, मादक पदार्थाची संबंधित, व्यवसायात पूरक ठरतो. हा अंत प्रेरणाचा कारक असल्याने शुक्राचा राशीत धर्म त्रिकोणी असता व्यक्ती उत्तम कवी होते. दशमत उत्तम नेपचून असता गुप्त पोलीस, वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, सॅनिटरी इन्स्पेक्टर, डिस्टीलरी इंडस्ट्री या क्षेत्रात उदय होऊ शकतो.

 ◾️अनेक कुंडल्यांची परीक्षणे करून, अनेक विचारवंतांनी, कोणत्या ग्रहाच्या युत्या, व्यक्तीस कोणत्या शिक्षण शाखेकडे आकर्षित करतात? याचे ठोकताळे तयार केलेले आहेत.

 जसे कुंडलीत शनी व मंगळ हे कुठेही एकत्र असले तर कदाचित शिक्षणात अवरोध होईल परंतु ही व्यक्ती इंजिनिअर क्षेत्राकडे जाण्याची शक्यता असते.

◾️ ज्यांच्या कुंडलीत बुध आणि मंगळ यांची युती अथवा प्रभावी दृष्टी योग असेल असे जातक आय टी क्षेत्रात, काम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात असतात.

◾️ कुंडलित मकरेचा मंगळ असून तो दशमाशी संबंधित असेल तर, असे जातक युनिफॉर्म असणाऱ्या नोकरीत असतात हा कुलदीपक योग म्हटला जातो.

◾️ कुंडलीत चंद्र मंगळ एकत्र असता, ती व्यक्ती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, चार्टर्ड अकाउंटंट अशा क्षेत्रात वळू शकते.

◾️ दशमात बलवान शनी असता, ती व्यक्ती राजकारणी वृत्तीची असते. न्यायक्षेत्र, कायदा व राजकारण यात तिचा उदय होतो.

 असे अजून कितीतरी योग सांगता येतील. परंतु विस्तार भयास्तव इथेच पूर्णविराम देतो.

हा लेख भविष्य दर्पण मासिक जून 23 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.


= पुंडलिक दाते, ज्यो. अलंकार,-9421755299


Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली