बुध -मंगळाचे योग

                    💢   बुध मंगळ व त्यांचे योग 💢





         ग्रह मंडळात एकूण 12 ग्रह असून, त्यात काही ग्रह एकमेकांचे मित्र अधिमित्र, तर काही ग्रह एकमेकांचे शत्रू, अधिशत्रू आहेत. ग्रहांच्या परस्परातील संबंधावर, संपूर्ण कुंडली,  ज्योतिष शास्त्राची संकल्पना उभारलेली आहे.

        ग्रहांच्या परस्परातील शत्रुत्वाचा विचार केला असता, त्यामध्ये रवि -शनी, बुध -मंगळ, मंगळ- हर्षल, शनि -मंगळ, शनि- चंद्र, शनी -हर्षल या ग्रहांचे युतियोग वा दृष्टीयोग अत्यंत तीव्र फळे देताना आढळतात.

        त्यात ते अंशात्मक योगात व क्रूर नक्षत्रात असल्यास, अशुभ फलांची तीव्रता आणखीनच वाढते.



◾️ आज आपण बुध व मंगळ यांच्या युति व दृष्टीयोगाचा, मनुष्य जीवनावर कसा परिणाम होतो ? हे काही कुंडल्यांच्या आधारे पाहणार आहोत.


◾️ मंगळ बुध युति व दृष्टीयोगामध्ये साधारणपणे,⚛️ व्यक्तीची स्मरणशक्ती उत्तम असते. ⚛️ गणित विषयात त्याची प्रगती असते. ⚛️ संगणक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये ती व्यक्ती प्रभुत्व मिळू शकते. अर्थात, शिक्षणाची स्थाने व गुरु बलवान हवेतच.⚛️ व्यक्तीस रविबल व गुरुबल असता, अशी व्यक्ती ध्येयवादी असू शकते. व या योगामुळे मिळणाऱ्या शक्तीचा, विधायक कार्याकडे उपयोग होऊ शकतो. ही बुध मंगळ योगाची, शुभ बाजू होय.

◾️ याउलट, जर रविबल- गुरुबल नसेल, व हा योग, कोणत्याहि शुभग्रहाच्या दृष्टीत नसेल,वा त्यास इतर अशुभ ग्रहाची साथ असेल तर या योगामुळे, बरीचशी अशुभ फळे मिळतात.

◾️ बुध वाणीचा कारक असून, तो रक्त व जखमांचा कारक  असलेल्या मंगळाच्या सानिध्यात असल्यामुळे , ती व्यक्ती अतिशय परखड, स्पष्टवक्ति , व वर्मावर बोट ठेवून बोलणारी होते. तिच्या बोलण्यामुळे, मनाला जखमा होऊ शकतात. साहजिकच या दुर्गुणामुळे, त्या व्यक्तीचा जनसंग्रह कमी होतो. पती-पत्नी यांच्यापैकी एकाच्या पत्रिकेत वा दोघांच्या पत्रिकेत, असे योग असले तर, सतत वाग्युद्ध होण्याची संभावना असते. व त्यातून दुरावा निर्माण होतो.

◾️ निसर्ग कुंडलीत, बुध तृतीयस्थानाचा कारक असल्यामुळे, जर बुध, मंगळाच्या सानिध्यात असेल तर, मंगळाच्या प्रभावामुळे, बुधाची सारासार विचारशक्ती कमी होते. त्या व्यक्तीच्या हातून, बेदरकारपणामुळे, क्षणिक मोहापायी, गंभीर चुका होऊ शकतात. त्या व्यक्तीच्या ठिकाणी, बेदरकारपणा वाढतो , सामाजिक भीती नष्ट होण्याची शक्यता असते.

 ◾️जर रविबल व गुरुबल नसेल, तर आत्मबल, स्वाभिमान, विवेक, सात्विकता यांचा अभाव निर्माण होतो. अशी व्यक्ती आपले इप्सित पूर्ण करण्यासाठी, कुठल्याहि थराचा, गैरमार्गाचा, अवलंब करू शकते.

◾️ ही व्यक्ती अतिशय जिद्दी असते, हट्टी असते. आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी, ती बरेचदा टोकाची भूमिका घेते. आडवे मार्ग चोखाळते.

◾️ विवाह याचा खरा अर्थ, एकमेकास समजून उमजून घेणे, विसंवाद टाळून, होता होईतो, सुसंवादीत्व कसे राहील ?, असा प्रयत्न करणे, या तत्त्वांचा यांना नेमका विसर पडतो

◾️ सारासार विचाराचा अभाव असल्यामुळे, बरेचदा अशा व्यक्तींना सामाजिक नामुश्कि  सहन करावी लागते.

◾️कधी कधी, चारित्र्याला कलंक लागल्यामुळे, जीवन नकोसे वाटते. किंवा काही अवैध बाबी घडून गेल्यास, नंतर पश्चातापाची पाळी येते. व त्यातून पश्चात बुद्धी, आत्मघाताची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते.

◾️या योगास इतर  कुग्रहाची साथ असल्यास, व्यक्ती जीवनातून उठते.

◾️एखाद्या वेळी ती आत्मघात करेल किंवा चारित्र्य भ्रष्ट झाल्याने, तिची सामाजिक जीवनात, किंमत शून्य होईल . म्हणजेच ती व्यक्ती जिवंत असली तरी, तिला समाजात पूर्वी इतका, मान सन्मान मिळत नाही.याचे शल्य तिला बोचत राहिल .

◾️ कन्या व मिथुन ही बुधाची लग्ने आहेत, या दोन्ही लग्नास, मंगळ अकारक होतो.

💢 तुलनात्मकदृष्ट्या पाहता, मिथुन लग्नापेक्षा कन्या लग्नास, बुध-मंगळाचे योग, अतिशय क्रूर फळे देतात. त्याचे कारण असे की, मिथुन लग्नास, मंगळ लाभेश असून, कष्टेश आहे.

◾️ त्या तुलनेत, कन्या लग्नास मंगळ तृतीयेश असून,  ( अष्टमाचे अष्टमस्थान ) तो अष्टमेशहि आहे.

◾️अष्टमातील मेष राशी, ही मंगळाची मूलत्रिकोणराशी असल्याने, कन्या लग्नास मिथूनेच्या तुलनेत, मंगळ अधिक परिणामकारक, अशुभ फळे देतो.

◾️ बुध मंगळाची युती वा दृष्टीयोग, मिथुन व कन्या लग्नास, लग्नेश + तृतीयेश+ अष्टमेश यांच्यात झालेला दृष्टी/ युतियोग असल्याने, या बुध मंगळ योगाची, अतिशय क्रूर फळे मिळतात. लग्नेश, तृतीयेश व अष्टमेश यांचा कुंडलित, येन केन प्रकारेण संबंध असणे, दीर्घायुष्याच्या दृष्टीने चांगले नसते.

◾️ म्हणून मिथुन, कन्या, मेष, व वृश्चिक लग्न असता, सर्वप्रथम बुध व मंगळाचे कुंडलीत कसे संबंध आहेत , ते प्राधान्याने पहावे. 


⚛️ कुंडल्यांच्या माध्यमातून, बुध -मंगळ योगाचाच केवळ, प्रारंभिक परिणाम पाहण्याच्या दृष्टीने  हा प्रयत्न असल्याने, इथे केवळ योगाचा विचार केला गेला आहे. ग्रहांची नक्षत्रगतच स्थिती, नवांशातील बलाबल, अष्टक वर्गाची मीमांसा यांचा विचार केल्या गेलेला नाही. ( अधिक सखोल अभ्यासासाठी, तसा विचार करणे मात्र क्रमप्राप्त असते.)


     या योगाचा प्रथम गुणधर्म 💢 हट्टीपणा 💢

 कुंडली क्र.- 1

या कुंडलित कर्क लग्न असून, विवाहेश शनी कष्टस्थानात, हर्षल नेपच्यूननी युक्त आहे. यापैकी शनि व हर्षल हे मूळ नक्षत्रात, अंशात्मक युतीत आहेत. त्यामुळे पती-पत्नीत सुसंवाद राहणार नाही, हे स्पष्ट होते. अष्टमातील शुक्र-बुधावर, शनी मंगळाची दृष्टी असल्यामुळे, संसारिक तेढ वाढतच गेलेली दिसत आहे. म्हणून, पत्नी, पतीस घटस्फोट देणार नाही, अशी जिद्द करून बसलेली आहे. मंगळ बुध दृष्टीयोग, व्यक्तीस हट्टी बनवितो.या योगामुळे, सूडबुद्धी निर्माण होऊ शकते.

कुंडली क्र.-2.

◾लग्नस्थानातील शुक्र मंगळाने प्रेमप्रकरणाचा योग घडवून, आपले कर्तव्य बजावले आहे. ◾️लग्नस्थानातील बुध-मंगळ योग, वडिलांचा विरोध न  जुमानता, विवाहास प्रवृत्त करणारा आहे. ⚛️ परंतु कुंडलीतील रवि-शुक्र-बुध योग हा “ विरहयोग “ असून, ⚛️रवि मंगळ युतीयोग, व्यक्तीचा स्वभाव तापट करतो.⚛️ पंचमातील शत्रू राशीतील शनि, हर्षलसह असल्याने, या धाडसाचे शुभ परिणाम निघतीलच, असे नाही.⚛️ जोडीदाराच्या कुंडलीत, जर अशीच नकारात्मक स्थिती असेल , तर विवाहसुखाची परिणती सुखात्मक होणार नाही.⚛️याचे खरे उत्तर, काळच देऊ शकेल.

कुंडली क्र.-3

◾️पंचमेश गुरुवर, सप्तमेश शनीची दृष्टी असल्यामुळे तसेच, ◾️लग्नस्थानी शुक्रमंगळ युती असल्यामुळे, प्रेमप्रकरण वा ओळखीच्या ठिकाणी, संबंध निर्माण झाला.⚛️ परंतु पंचमातील शनि महाराज, प्रणयस्थानी असले तरी, ते न्यायनिष्ठुर, कर्म प्रधान असल्याने, प्रेमविवाह घडू देत नाही. ⚛️ त्यातून शनी 14° वर व नेपच्यून 16 अंशावर असल्यामुळे, अधिक फसवणूक गोंधळ होणार.⚛️ सप्तमातील राहू, शनीच्या दृष्टीत असल्यामुळे, नकारात्मक परिणामात वाढ झाली आहे. जातकास नकार अपेक्षित नसावा. 💢 त्याचा अपेक्षाभंग झाल्यामुळे, बुधमंगळ युती योगामुळे, त्याने टोकाची भूमिका घेतली. “ मी आता विवाहच करणार नाही “, असा नकारात्मक निश्चय त्याने केला.

कुंडलि क्र.-4

या कुंडलीतील ◾️शुक्र नेपच्यून नवपंचम योग, ◾️पंचमेश शनी व लाभेश चंद्र सप्तमस्थानात, व ◾️भाग्यातील शुक्रमंगळ, हे प्रेमविवाहाचे योग दाखवतात. ⚛️परंतु पंचमातील वक्रि हर्षल-नेपच्यून, हे प्रेमात फसवणूक करणारे आहेत. कारण, “ प्रेम एक जुगार “, अशी या ग्रहाची, पंचमात भूमिका असते.

 ⚛️ चंद्र व राहू अंशात्मक दृष्टी योगात असल्यामुळे, ते मनावर नकारात्मक प्रभाव देतात.⚛️ शनी राहू दृष्टीत असल्याने, जोडीदार शाखाभेद, जातीभेद असणारा असावा. त्यामुळेच , घरच्यांचा प्रखर विरोध असावा. 💢परंतु बुध मंगळ अंशात्मक युतीमुळे, जातिकेने, “ करीन लग्न तर त्याच्याशीच ! ”, असा संकल्प जाहीर केला असावा. 

कुंडली क्र -5

◾️या कुंडलीत शनी गुरु अंशात्मक दृष्टीयोग, हा ओळखीचा किंवा प्रेमप्रकरणाचा संबंध दाखवीत असला तरी,⚛️ वैवाहिक सुखाचा कारक शुक्र, राहू-हर्षल-नेपच्यूनच्या दृष्टीत असल्याने, दूषित आहे. ⚛️ सप्तमातील चंद्र, शनीच्या दृष्टीत  असल्याने, नैराश्य निर्माण करणारा योग निर्माण झाला आहे.⚛️ चंद्रावरील गुरुची दृष्टी, “ विरहयोग “ दर्शविते. त्यामुळे, हा विवाह अयशस्वी होऊन, जातिका परित्यक्ता आहे.⚛️  हे मध्यमवर्गीय कुटुंब असून, घटस्फोट घ्यावयाचा असल्यास,” जोडीदाराने मला साडेतीन कोटी रुपये द्यावेत,” अशी अवास्तव मागणी, जातिकेने केली आहे. 💢 कुंडलीतील बुध मंगळाचा अन्योन्य योग, हा अशी दुराग्रही भूमिका देणारा आहे.

 हा लेख भविष्य दर्पण, जुलै 2023 मध्ये प्रकाशित झाला आहे.

= पुंडलिक दाते, ज्यो. अलंकार,-9421755299


Comments

Popular posts from this blog

द्विभार्या योग

अष्टमस्थान व 64 वा नवांश

अभ्यासार्थ कुंडली