ग्रहदर्शन -अपघाताचे
⚛️ ग्रह दर्शन -अपघाताचे ⚛️
आपल्या जन्मस्थ ग्रहस्थितीच्या आधारावर, आपल्या जीवनात नेमके काय होणार ? या उत्कंठेचे शमन होते. शिक्षण, आरोग्य, मातृ- पितृ -बंधु -संततीसुख, विवाहसुख, आर्थिक स्थिती, परदेशगमनयोग, प्रसिद्धियोग अशा अनेक विविध बाबी, आपल्याला कुंडलीतून पाहता येतात.
" शरीर माध्यम, खलु धर्म साधनम् !" या उक्तीनुसार, आपल्याला आरोग्य आहे, तर सर्व सुखे आहेत. म्हणून आरोग्य, आजार, ऑपरेशन, अपघात अशा गंभीर बाबीहि कुंडलीच्या माध्यमातून पाहता येतात. आजारातहि, विविध आजार आहेत. त्यासाठीहि अनेक ग्रहयोग कारणीभूत असतात. त्यापैकी " अपघात या एका मर्यादित विषयाचा, स्थूल मानाने, आपण या लेखात विचार करणार आहोत.
ही एका जातकाची जन्म कुंडली असून, याची जन्मतारीख 26 जुलै 1977, जन्म वेळ सकाळी- 06:30 मिनिटांनी, व जन्मस्थळ नाशिक आहे.
या कुंडलित, कर्क लग्न उदित झाले असून, कुंडलीचे अकारक ग्रह शनीमहाराज, क्रूर अशा आश्लेषा नक्षत्रात, अस्तंगत अवस्थेत, शत्रुग्रह रवि सोबत आहे. ◾️ रवि -शनि, जरी अंशात्मक युतीत नसले तरी, शनी क्रूर नक्षत्रात असल्यामुळे, कुठेतरी हाड -दुखी,पाठ -दुखी किंवा हाडांची मोडतोड होणार, हे प्रथम दर्शनी लक्षात येते. ◾️ शनीच्या तृतीयात राहू असून, शनि 24 अंशावर, व राहू 25 अंशावर असल्यामुळे, शनिचा हा "अंशात्मक" दृष्टीयोग होतो. व अंशात्मक दृष्टीयोग, हे केव्हाहि पूर्ण ताकदीने फळ देत असतात. मग ते फळ शुभ असो, अथवा अशुभ. शनि व राहू यांची मैत्री असल्यामुळे, व शनी या कुंडलीचा अकारक ग्रह असल्यामुळे, हा दृष्टीयोग, गोचरीने, किंवा त्याच्या दशा -उपदशेत, अशुभ फळ देणार, असा प्राथमिक अंदाज येतो.
◾️ तृतीयस्थानाचा विचार केला असता, तृतीयेश बुध, द्वितीयात- तृतीयाच्या व्यस्थानात, व " मघा " या क्रूर नक्षत्रात असून, मंगळाच्या दृष्टीत आहे. क्रूर नक्षत्रातील ग्रह, शारीरिक पीडा देताना आढळतात. हे निदान सहसा चुकत नाही. ◾️तृतीयस्थान, हे उजव्या हाताचे निदर्शक असून, दूरसंचार, दळणवळण क्षेत्रे, ही तृतीयस्थानाशी संबंधित असतात.
◾️ अपघात- आजार याविषयीचा, विशेष विचार करताना, जर एखादा ग्रह 64 व्या नवांशात असेल, अथवा 22 व्या देशक्राणात असेल, तर ती स्थिती, पीडाकारक ठरते.
◾️ या जातकाची जन्म कुंडली, माझ्या कुंडली संग्रहात, अगोदरच होती. एवढ्यात कळले की, या जातकाचा अपघात झाला आहे. या अपघातात, त्याचा डावा पाय व डावा हात, फ्रॅक्चर झाला आहे. डाव्या हातात मोबाईल असल्यामुळे, तोल सावरणे कठीण गेले. परिणामी, अपघात झाला व मोबाईलहि आदळल्यामुळे, स्क्रीन फुटून, तो बंद पडला .
🔼 जेव्हा जातकाची, मूळ कुंडली आपल्याकडे असते. तसेच काही विशिष्ट घटना झाल्यास, व त्याचे विवरणहि उपलब्ध असल्यास, नेमके कोणत्या ग्रह स्थितीमुळे असे झाले ? हे पाहण्याची, स्वाभाविक इच्छा होते.
🔼 त्यानुसार, अपघातकालीन कुंडली पाहिली. ही कुंडली कुंभ लग्नाची असून, लग्नस्थानात शनी महाराज होते . मूळ जन्मकुंडलीत शनीमहाराज, अष्टमाचे स्वामी आहेत, हे विशेष होय.
🔼 त्यानंतर, जातकाचे मूळ लग्न कर्क असल्यामुळे, अपघातकालीन ग्रह घेऊन, गोचर कुंडली तयार केली. ◾️ या गोचर कुंडलीत लग्नेश चंद्र, सप्तमात निर्बल राशीत असून, अष्टमेश, शनी महाराज अष्टमात, आपल्या मूलत्रिकोण राशीत आहेत. गोचरीने, लग्नापेक्षा अष्टमेश बलवान असणे, ही अशुभ स्थिती, मनाला जरा खटकते. ◾️ गोचरीने, शनी मंगळ दृष्टीयोग होत आहे. हा योग अपघातदर्शक, अपघातास प्रेरणा देणारा आहे. ◾️ अष्टमातून शनी महाराजांची तिसरी दृष्टी, गुरुवर पडते. मूळ कुंडलीत, गुरु महाराज कष्टस्थानाचे स्वामी असून, व्ययभावात आहेत. त्यामुळे, या काळात, आरोग्यावर खर्च होणार. ◾️ तसेच, गोचरीने शनिमहाराजांची, दशमातील राहूवर दृष्टी पडते. मूळ कुंडलीत शनी-राहू "अंशात्मक " दृष्टीयोग आहे. त्यामुळे, अशुभ फलांची तीव्रता, या योगामुळे वाढली आहे. ◾️ शनीची, प्रजापती या विक्षिप्त, आकस्मिक अडचणी आणणाऱ्या ग्रहावर पडणारी दृष्टी, ही सुद्धा अशुभाची सूचना देते.
◾️ मूळ कुंडलीत, तृतीयेश बुध, याहि वेळेस, मंगळा बरोबर असून, शनीच्या दृष्टीत आहे. मूळ कुंडलीत, तृतीयस्थान हे उजव्या बाजूचे, व लाभस्थान, हे डाव्या बाजूचे मानले जाते. मूळ कुंडलीचा लाभेश शुक्र, हा पण गोचरीने, शनीच्या दृष्टीयोगात आला आहे. त्यामुळे, उजव्या हातास पीडा निर्माण झाली.
◾️मूळ कुंडलीतील, शनी -राहू अंशात्मक दृष्टीयोग तसेच, मूळ तृतीयेश बुध दूषित असल्यामुळे, तृतीय स्थान व बुध, यावरून, टेली कम्युनिकेशन पहात असल्यामुळे, मोबाईल फुटून नुकसान झाले. ◾️मूळ कुंडलीतील डाव्या हाताचा निदर्शक शुक्र, हा पण शनी -मंगळाच्या सानिध्यात असल्यामुळे, डावा हात फ्रॅक्चर झाला. ◾️मूळ कष्टेश गुरुवर, शनीची दृष्टी असल्यामुळे, आरोग्यावर भरमसाठ खर्च होणार कारण, मूळ कुंडलीत गुरु व्ययस्थानात आहे.◾️ पायास, घोट्याखाली फॅक्चर असल्यामुळे, मूळ कुंडलीचा व्ययेश बुध, मुळातच क्रूर नक्षत्रात असून, मंगळाच्या दृष्टीत असल्यामुळे, डाव्या पायास दुखापत झाली.
◾️ अष्टकवर्गाचा विचार केला असता, जीवन कारक रविने ज्या भावास, सर्वात कमी गुण दिले असतील, त्या भावावरून, वा भावेशावरून शनीचे भ्रमण होत असता, त्या संबंधित अवयवास आजार, अपघात, पीडा होण्याचा संभव असतो. सर्वाष्टकात रविने कन्या राशीस, म्हणजेच तृतीय भावास, सर्वात कमी, फक्त 2 असे गुण दिले आहेत. म्हणजेच तृतीयभाव, व भावस्वामी, आरोग्याच्या दृष्टीने कमजोर झाला आहे. बुध व्ययेश व तृतीयेश असल्याने, पायास दुखापत, व मोबाईलचे नुकसान झाले. या बाबीस, अष्टकवर्गावरूनहि दूजोरा मिळतो.
🔼 शरीर स्वास्थ्याबाबत, जेव्हा काही अशा घटना घडतात तेव्हा, मूळ कुंडलीचा 64 वा नवांश, तसेच मूळ देशक्राण कुंडलीतील 22 वा देशक्राण यातून, कोण्या अकारक किंवा पापग्रहांचे भ्रमण आहे का ? हा विचार फार महत्त्वाचा असतो.
◾️ जातकाच्या अपघाताच्या वेळेच्या कुंडलित, प्लुटो मकर राशीत असून, तो 4 अंशावर आहे. तत्कालीन नवांश कुंडली पाहिली असता, त्यात प्लुटो कुंभ राशीत आहे, व जातकाच्या मूळ कुंडलीचा 64 वा अंश कुंभ आहे. प्लुटो हा पापग्रह असून, अनपेक्षित घटनांचा कारक असल्याने, तो अपघातासाठी सकारात्मक ठरतो.
◾️ जातकाच्या जन्मवेळेनुसार, त्याची देशक्राण कुंडली पाहिली असता, त्याचा 22 वा देशक्राण मिथुन राशीचा येतो. अपघात काळाच्या वेळची, देशक्राण कुंडली पाहिली असता, गोचरीने शनी महाराज, कुंभ राशीत असून, ते 11 अंशावर असल्याने, ते मिथुनेच्या देशक्राणात येतात.
मूळ कुंडलीचे अकारक शनी महाराज, गोचरीनेहि अष्टमात असून, ते तत्कालीन मिथुनेच्या 22 व्या देशक्रांणात आहेत. यामुळे, ही दुर्घटना घडण्यास, शनि महाराज पण सकारात्मक होते, हे स्पष्ट होते.
या घटनेवरून, जन्मकालीन कुंडलीचा 64 वा नवांश, व 22 वा देश्क्राण, किती महत्त्वाचे आहेत, हे लक्षात येते.
🔼 अर्थात, एखादी दुर्घटना झाली असता, मूळ कुंडली व तत्कालीन विवरण माहित असेल तर, अशुभ स्थितीचा मागोवा घेणे, तेवढे कठीण वाटत नाही. त्या मानाने, भावी जीवनातील दुर्घटनांचे भाकीत काढणे, तेवढे सुटसुटीत व सोपे नसते.
◾️ ग्रहांचे कारकत्व, त्यांचे गुणधर्म, कुंडलीतील त्यांची योजना, परस्परांशी झालेले योग, मात्र आपल्याला, सतत काहीतरी संकेत देत असतात.
= पुंडलिक दाते, ज्यो. विद्या वाचस्पती, -9421755299
Comments
Post a Comment