कथा -64 व्या नवांशाची
💠आपल्या जन्माचा तपशील, म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मस्थळ हा जर सुनिश्चित असेल तर,जन्म कुंडलीत, आपल्या जन्मवेळी, आकाशातील ग्रहांची राशीनिहाय काय स्थिती होती, हे आपल्याला कळते. व त्यावरून, आपल्याला भविष्यात काय घडेल, याचा स्थूल अंदाज ज्योतिषाकडून वर्तविला जातो.
💠" स्थूल अंदाज" हा शब्द एवढ्याच साठी मी वापरला आहे की,ज्योतिष्य हे खूप गहन शास्त्र आहे. व जन्म कुंडली ही त्याची प्रथम पायरी आहे. जन्म कुंडलीतील ग्रह हे कसे फळ देऊ शकतात,? त्यांचे बळ पाहण्यासाठी नवाश कुंडली विशेष महत्त्वाची ठरते. जन्म कुंडलीच्या जोडीला, जर नवाश कुंडलीचा आधार घेतला तर, केलेले अंदाज हे बरेचसे वास्तवदर्शी असतात. त्यामुळे, जन्म कुंडली बरोबरच, नवाश कुंडली पण पहाणे फार जरुरी असते.
💠 नवाश कुंडलीचा 64 वा नवाश, हा फार घातक मानला जातो. हा 64 वा नवांश, नवांश कुंडलीच्या अष्टमस्थानाचा प्रथम नवांश असतो. अष्टमस्थान हे अशुभ व मृत्यूस्थान मानले आहे. त्यामुळे, आपल्या मृत्यूतुल्य संकटाच्या वेळी, अथवा आपण अपघातग्रस्त असताना, किंवा,आपले एखादे क्रिटिकल स्वरूपाचे ऑपरेशन होत असताना, गोचरीने येणारा एखादा ग्रह,जर 64 व्या नवांशात येणाऱ्या राशीत असेल तर, तो संकटात वाढ करतो. कदाचित, आपले ऑपरेशन अयशस्वी होऊ शकते. अशावेळी जर अपघात गंभीर असेल तर, जगण्याची आशा पण कमी होते.
💠 जेव्हा, अशी एखादी आणीबाणीची केस येते. व जातकाच्या हितचिंतकांकडून, जातकाची ग्रहस्थिती काय सांगते? अशी विचारणा होते,तेव्हाच ज्योतिषी अपघात कालीन कुंडलीचा, ऑपरेशन कालीन कुंडलीचा व तत्कालीन नमांश कुंडलीचा विचार करतात.
💠 तरीपण अनुभव या दृष्टीने,जर त्या जातकाचा आपल्याला जन्म तपशील माहित असल्यास, त्याचप्रमाणे अशुभ घटना केव्हा घडली हे माहीत असल्यास, ज्योतिषाच्या माध्यमातून, अशा घटनांचा अभ्यास करण्याची अभ्यासू वृत्ती तयार होते. ◾ कारण ज्योतिष शास्त्रीय नियम, व्यवहारात किती खरे उतरतात, याचा अनुभव घेतल्याशिवाय, फल विवेचन करताना, लागणारा आत्मविश्वास पक्का होत नाही.
या संदर्भात आलेला एक अनुभव इथे सादर करावासा वाटतो.
दि. 21 एप्रिल 2025 रोजी, एका ओळखीच्या जातका संबंधित अचानक मृत्यू संदेश प्राप्त झाला. तरुण जातका संबंधी "अकस्मात निधन "एवढाच तो संदेश असल्यामुळे, दुःखद आश्चर्य झाले. त्या जातकाचा जन्म तपशील माझ्याकडे होता. माझी उत्कंठा जागृत झाल्यामुळे, मी ती लगेच कुंडली काढली. जी कर्क लग्नाची कुंडली असून, कुंडलित रवि- शनी परस्परांशंतर योगात व द्वितीय अष्टमस्थानात होते. दोघांची एकमेकावर दृष्टी होती. त्यामुळे गंभीर अपघात झाला असावा, असा एक संकेत निर्माण झाला. चतुर्थात प्रजापती असून, त्यावर शनीची दृष्टी असल्याने, हृदयविकाराची पण शक्यता जाणवत होती . चतुर्थेश शुक्र, राहूच्या दृष्टीत होता.कष्टेश गुरु व्ययस्थानात होते. शनीची चंद्रावर अंशात्मक दृष्टी होती. त्यामुळे प्रथमदर्शनी, आकस्मिक गंभीर अपघात झाला असावा, अथवा हृदयविकार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज निर्माण झाला.
जातकाच्या महायात्रेत गेलो असता, एकाएकी असे कसे झाले?, याची इतरांकडून विचारपूस केली. कारण, अशा वेळेला, जातकाचे निकटस्थ नातेवाईक, काही बोलण्याच्या मनस्थितीत नसतात. व फार चौकशी करण्याची, ती वेळ पण नसते.
◾ मिळालेल्या माहितीप्रमाणे जातक शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी, पोहावयास गेला होता. या वेळेला एप्रिल महिना भयंकर उकाड्याचा होता व तापमान पण खूप होते. संध्याकाळच्या वेळेला, जातकास ताप व उलट्या सुरुवात व्हायला झाली. त्यावर डॉक्टरी उपचारही झाले. परंतु तब्येत मात्र झपाट्याने खालावतच गेली. दुर्दैवाने, दुसरे दिवशी रविवार होता. रविवारी सर्व इस्पितळे, सहसा बंद असतात. क्रिटिकल कंडिशन असताना, इतर दिवशी ज्या विशेष सुविधा सहजपणे उपलब्ध होतात, त्यात रविवारी थोडा विलंब अडचणी अडथळे येतात. जातकाची तब्येत अधिक खालावतच गेली. श्वास लागला. ब्लड प्रेशर कमी झाले. दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी, सकाळी सुमारे आठ वाजता, जातकाचे दुःखद निधन झाले. वरील माहितीवरून, जातक जबर उष्माघाताचा बळी ठरला, हे लक्षात आले.
◼️ घरी आल्यानंतर, पुन्हा ती कुंडली पाहिली. जन्मकालीन नवाश कुंडलीचा विचार केला. 64 व्या नवाशात रवि व मंगळ हे मिथुन राशीत होते. रवि उष्णता, प्रकाश, हृदय, दृष्टी, स्वाभिमान, पिता याचा कारक आपण मानतो. तर मंगळ, उष्णतेचा कारक आहे. रवि व मंगळ हे दोन्ही, अग्नी तत्वाचे ग्रह आहेत. व 64 व्या नमांशात, मिथुन राशी आली आहे.
💠 त्यामुळे, जातक ज्या दिवशी मृत्यू पावला, त्यावेळची कुंडली काढली. ती मीन लग्नाची कुंडली होती. जातकाचे मूळ जन्मलग्न कर्क असल्यामुळे, कर्क लग्न समजून ग्रह विचारात घेतले ◾ लग्नस्थानी कर्केचा मंगळ, सात अंशावर असून, त्याची निर्बल चंद्रावर अंशात्मक दृष्टी होती.( जातक आजारी पडला तेव्हा,चंद्र धनु राशीत होता म्हणजे मूळ कुंडलीच्या कष्ट स्थानात होता ) रवि-चंद्र- मंगळ अंशात्मक केंद्रयोगात होते. मूळ जन्म कुंडलित असणारा चतुर्थेश शुक्र, शनीच्या दृष्टियोगात असून, बुध- शुक्र- शनी- राहू -नेपच्यून यांची खूप अंशात्मक जवळीक होती. मूळ कुंडलित असलेला शनी- प्रजापती दृष्टीयोग याही कुंडलित अवतीर्ण होता.◾ "मृत्यूकालीन नवांश कुंडलित, मिथुन राशीत रवि होता ". जन्म कालीन नवाश कुंडलित असलेला, मिथुन राशीचा रवि, मृत्यू कालीन नवाश कुंडलीत सुद्धा, मिथुन राशीतच आलेला होता. उष्णता हा रविचा अंगभूत गुण असल्यामुळे, हा उष्माघाताचा आजार, जातकाच्या मृत्यूचे कारण ठरला. हे नवाश कुंडली वरून स्पष्ट होते. 64 व्या नवाशात असलेला ग्रह, संकटकाली किती भीषण परिणाम देतो, याचा या घटनेवरून प्रत्यय येतो.
= पुंडलिक दाते, ज्योतिष रत्न,
अकोला -9421755299
Comments
Post a Comment